सोमवार, 19 जनवरी 2026

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

'माती मागतेय पेनकिलर': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा


कवी: सागर जाधव जोपुळकर

पाठराखण : पी. विठ्ठल

        सागर जाधव यांचा 'माती मागतेय पेनकिलरहा कवितासंग्रह म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून, जागतिकीकरणाच्या रेट्यात उद्ध्वस्त होणाऱ्या ग्रामीण जीवनाचे आणि शेतीसंस्कृतीचे एक दाहक दस्तऐवजीकरण आहे. पी. विठ्ठल यांनी म्हटल्याप्रमाणे, हा संग्रह पोस्ट-मॉडर्न ग्रामीण जाणिवांचा आणि मध्यमवर्गीय अस्वस्थतेचा एक व्याकुळ दस्तऐवज आहे.

          कवितासंग्रहाचे शीर्षक 'माती मागतेय पेनकिलर' हेच मुळी आधुनिक शेतीची शोकांतिका स्पष्ट करते. माती जी सर्जनशील आहे, जिला आपण 'काळी आई' म्हणतो, ती आज इतकी 'अशक्त' झाली आहे की तिला जगण्यासाठी रसायनांच्या वेदनाशामकांची (पेनकिलर) गरज भासत आहे. कवी म्हणतो"केमिकलचा पाजला ओव्हरडोज, अशक्त झालंय वाफ्याचं पोट". मातीच्या पोटात आता अन्नाऐवजी फॉस्फरस, युरिया आणि सुपर फॉस्फेटचा वास येत आहे. ही मातीची वेदना केवळ भौतिक नसून ती शेतकऱ्याच्या आत्मिक मरणाचे प्रतीक आहे.

         शेतकऱ्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे 'कर्ज'. 'देणं' या कवितेत कवीने बँकेच्या कर्जाचा डोंगर आणि त्यापायी होणारी मातीची झीज अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. बँकेचे ऋण फेडता फेडता माती झिजली, पण देणं फिटलं नाही. हंबरणारी गाय खाटकाला विकावी लागली. शेवटी हातामध्ये केवळ १६० रुपये उरले, जे 'एंडरेलचा' (विषारी कीटकनाशक) डबा घेण्यापुरतेच पुरते सुद्धा नाहीत. कवितेच्या या ओळ शेतकऱ्याच्या आत्महत्येपूर्वीच्या अगतिकतेवर क्रूर भाष्य करणाऱ्या आहेत.

​​        'तुकडीकरण' आणि 'अ‍ॅम्युनिटी नगरमध्ये' या कवितांतून कवीने जमिनीच्या तुकड्या तुकड्यांत विभागल्या जाणाऱ्या आणि विकल्या जाणाऱ्या वास्तवाचा समाचार घेतला आहे. तुकडीकरणदुष्काळाने आणि व्यवस्थेने जमिनीचे तुकडे केले आहेत. अ‍ॅम्युनिटी नगरामध्ये शेतात पीक घेण्याऐवजी आता 'प्लॉट्स' पाडले जात आहेत. कवीला अस्वस्थता वाटते कारण ज्या जमिनीवर बाजरी उगवायला हवी होती, तिथे आता 'सिमेंटचा दगड' आणि 'अ‍ॅम्युनिटीची नोंद' होत आहे. कालचा वतनदार आज आपल्याच मातीवर 'लँड लॉर्ड'च्या हाताखालील मजूर किंवा वॉचमन झाला आहे.

    शेतकरी केवळ आर्थिकदृष्ट्या खचलेला नाही, तर त्याचे घरदार आणि नातेसंबंधही उद्ध्वस्त झाले आहेत. 'घरदार झालं' या कवितेत कवी म्हणतो की, जमिनीच्या वादातून भावबंदकीत भिंती उभ्या राहिल्या. अमिषापायी नात्यांचे तुकडे पडले आणि मनाचा 'स्फोट' झाला. रक्ताच्या नात्यात आलेली व्यवहारी वृत्ती कवीला अधिक वेदना देते. नात्यांची होणारी ही पडझड थांबावी आणि हरवलेली मानवी मूल्ये जपली जावी अशी तळमळ कवितेतून तो व्यक्त करतो आहे.

        कवीने देवाला आणि प्रस्थापित व्यवस्थेला अत्यंत रोकठोक प्रश्न विचारले आहेत. तफावतया कवितेत 'वरचा देव' (ईश्वर) आणि 'खालचा देव' (शेतकरी जो जगाचा पोशिंदा आहे) यांच्यातील तफावत मांडली आहे. जगाचा बाप असूनही शेतकऱ्याच्या आयुष्यात 'बंदा रुपया' का येत नाही, हा प्रश्न व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली चपराक आहे.

           तुमची शपथ मालकही कविता गुलामीच्या मानसिकतेवर आणि वर्चस्ववादावर भाष्य करते. कवी म्हणतो की, मालकाच्या मर्जीनुसार जगताना स्वतःचे स्वातंत्र्य हरवून गेले आहे.

    कवीने बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणावरही भाष्य केले आहे. 'ढोंगाचा गाभारा' मध्ये कवी म्हणतो की, आजचे व्यासपीठ आणि संस्कृती ही केवळ ढोंग झाली आहे. संतांची शिकवण आणि अभंग बाजूला राहून 'आयटम साँग' आणि आधुनिक पाखंडाला महत्त्व आले आहे. जनाईचे जाते आता 'इलेक्ट्रिक' झाले आहे आणि ओव्या 'रेडिओ'वर ऐकू येत आहेत, म्हणजे श्रमाची संस्कृती यांत्रिकतेने गिळून टाकली आहे.

    सागर जाधव यांची काव्यभाषा ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी 'पोस्ट-मॉडर्न' ग्रामीण प्रतिमांचा वापर केला आहे. "हृदयाचं धडधडणं मोटारीच्या स्टार्टरसारखं बंद पडलंय". "सबसिडीवानी रेंगाळणं". "झिरो डिजिटचा ऑप्शन". अशा तांत्रिक आणि आधुनिक प्रतिमांमधून ते शेतकऱ्याची अगतिकता मांडताना दिसतात. त्यांच्या कवितेच्या भाषेचा बाज आणि नवीन प्रतिमासृष्टी नक्कीच वाखाणण्याजोगी आहेत.

        'माती मागतेय पेनकिलरहा केवळ कवितांचा संग्रह नसून तो एक 'क्रंदन' आहे. माती, शेती आणि शेतकरी यांच्यातील अतूट नाते जेव्हा अर्थकारणामुळे आणि रसायनांमुळे विषारी होते, तेव्हा त्यातून उडणाऱ्या ठिणग्या म्हणजे या कविता आहेत. सागर जाधव यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि टोकदारपणे हे वास्तव कवितांच्या माध्यमातून समोर ठेवले आहे.

    हा संग्रह वाचताना आपण केवळ अस्वस्थ होत नाही, तर आपण ज्या व्यवस्थेचे भाग आहोत त्या व्यवस्थेबद्दल आपल्याला अपराधीपणाची जाणीव होते. मातीला 'पेनकिलर' नको तर 'सन्मानाने जगण्याचा आधार' हवा आहे, हाच संदेश कवीने यातून दिला आहे. या संग्रहातील कवितांचा विस्तार हा केवळ गावापुरता नसून तो जागतिक संकटाचा एक स्थानिक चेहरा मांडणारा आहे. त्यांच्याकडून असेच भूमिका घेणारे वास्तववादी लेखन घडत राहो ही सदिच्छा व शुभेच्छा !

आस्वादक

संजय द. गोराडे (नाशिक)

मो. ९८५०६९१२१६ 

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...