सोमवार, 19 जनवरी 2026

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

'माती मागतेय पेनकिलर': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा


कवी: सागर जाधव जोपुळकर

पाठराखण : पी. विठ्ठल

        सागर जाधव यांचा 'माती मागतेय पेनकिलरहा कवितासंग्रह म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नसून, जागतिकीकरणाच्या रेट्यात उद्ध्वस्त होणाऱ्या ग्रामीण जीवनाचे आणि शेतीसंस्कृतीचे एक दाहक दस्तऐवजीकरण आहे. पी. विठ्ठल यांनी म्हटल्याप्रमाणे, हा संग्रह पोस्ट-मॉडर्न ग्रामीण जाणिवांचा आणि मध्यमवर्गीय अस्वस्थतेचा एक व्याकुळ दस्तऐवज आहे.

          कवितासंग्रहाचे शीर्षक 'माती मागतेय पेनकिलर' हेच मुळी आधुनिक शेतीची शोकांतिका स्पष्ट करते. माती जी सर्जनशील आहे, जिला आपण 'काळी आई' म्हणतो, ती आज इतकी 'अशक्त' झाली आहे की तिला जगण्यासाठी रसायनांच्या वेदनाशामकांची (पेनकिलर) गरज भासत आहे. कवी म्हणतो"केमिकलचा पाजला ओव्हरडोज, अशक्त झालंय वाफ्याचं पोट". मातीच्या पोटात आता अन्नाऐवजी फॉस्फरस, युरिया आणि सुपर फॉस्फेटचा वास येत आहे. ही मातीची वेदना केवळ भौतिक नसून ती शेतकऱ्याच्या आत्मिक मरणाचे प्रतीक आहे.

         शेतकऱ्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे 'कर्ज'. 'देणं' या कवितेत कवीने बँकेच्या कर्जाचा डोंगर आणि त्यापायी होणारी मातीची झीज अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. बँकेचे ऋण फेडता फेडता माती झिजली, पण देणं फिटलं नाही. हंबरणारी गाय खाटकाला विकावी लागली. शेवटी हातामध्ये केवळ १६० रुपये उरले, जे 'एंडरेलचा' (विषारी कीटकनाशक) डबा घेण्यापुरतेच पुरते सुद्धा नाहीत. कवितेच्या या ओळ शेतकऱ्याच्या आत्महत्येपूर्वीच्या अगतिकतेवर क्रूर भाष्य करणाऱ्या आहेत.

​​        'तुकडीकरण' आणि 'अ‍ॅम्युनिटी नगरमध्ये' या कवितांतून कवीने जमिनीच्या तुकड्या तुकड्यांत विभागल्या जाणाऱ्या आणि विकल्या जाणाऱ्या वास्तवाचा समाचार घेतला आहे. तुकडीकरणदुष्काळाने आणि व्यवस्थेने जमिनीचे तुकडे केले आहेत. अ‍ॅम्युनिटी नगरामध्ये शेतात पीक घेण्याऐवजी आता 'प्लॉट्स' पाडले जात आहेत. कवीला अस्वस्थता वाटते कारण ज्या जमिनीवर बाजरी उगवायला हवी होती, तिथे आता 'सिमेंटचा दगड' आणि 'अ‍ॅम्युनिटीची नोंद' होत आहे. कालचा वतनदार आज आपल्याच मातीवर 'लँड लॉर्ड'च्या हाताखालील मजूर किंवा वॉचमन झाला आहे.

    शेतकरी केवळ आर्थिकदृष्ट्या खचलेला नाही, तर त्याचे घरदार आणि नातेसंबंधही उद्ध्वस्त झाले आहेत. 'घरदार झालं' या कवितेत कवी म्हणतो की, जमिनीच्या वादातून भावबंदकीत भिंती उभ्या राहिल्या. अमिषापायी नात्यांचे तुकडे पडले आणि मनाचा 'स्फोट' झाला. रक्ताच्या नात्यात आलेली व्यवहारी वृत्ती कवीला अधिक वेदना देते. नात्यांची होणारी ही पडझड थांबावी आणि हरवलेली मानवी मूल्ये जपली जावी अशी तळमळ कवितेतून तो व्यक्त करतो आहे.

        कवीने देवाला आणि प्रस्थापित व्यवस्थेला अत्यंत रोकठोक प्रश्न विचारले आहेत. तफावतया कवितेत 'वरचा देव' (ईश्वर) आणि 'खालचा देव' (शेतकरी जो जगाचा पोशिंदा आहे) यांच्यातील तफावत मांडली आहे. जगाचा बाप असूनही शेतकऱ्याच्या आयुष्यात 'बंदा रुपया' का येत नाही, हा प्रश्न व्यवस्थेच्या तोंडावर मारलेली चपराक आहे.

           तुमची शपथ मालकही कविता गुलामीच्या मानसिकतेवर आणि वर्चस्ववादावर भाष्य करते. कवी म्हणतो की, मालकाच्या मर्जीनुसार जगताना स्वतःचे स्वातंत्र्य हरवून गेले आहे.

    कवीने बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणावरही भाष्य केले आहे. 'ढोंगाचा गाभारा' मध्ये कवी म्हणतो की, आजचे व्यासपीठ आणि संस्कृती ही केवळ ढोंग झाली आहे. संतांची शिकवण आणि अभंग बाजूला राहून 'आयटम साँग' आणि आधुनिक पाखंडाला महत्त्व आले आहे. जनाईचे जाते आता 'इलेक्ट्रिक' झाले आहे आणि ओव्या 'रेडिओ'वर ऐकू येत आहेत, म्हणजे श्रमाची संस्कृती यांत्रिकतेने गिळून टाकली आहे.

    सागर जाधव यांची काव्यभाषा ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी 'पोस्ट-मॉडर्न' ग्रामीण प्रतिमांचा वापर केला आहे. "हृदयाचं धडधडणं मोटारीच्या स्टार्टरसारखं बंद पडलंय". "सबसिडीवानी रेंगाळणं". "झिरो डिजिटचा ऑप्शन". अशा तांत्रिक आणि आधुनिक प्रतिमांमधून ते शेतकऱ्याची अगतिकता मांडताना दिसतात. त्यांच्या कवितेच्या भाषेचा बाज आणि नवीन प्रतिमासृष्टी नक्कीच वाखाणण्याजोगी आहेत.

        'माती मागतेय पेनकिलरहा केवळ कवितांचा संग्रह नसून तो एक 'क्रंदन' आहे. माती, शेती आणि शेतकरी यांच्यातील अतूट नाते जेव्हा अर्थकारणामुळे आणि रसायनांमुळे विषारी होते, तेव्हा त्यातून उडणाऱ्या ठिणग्या म्हणजे या कविता आहेत. सागर जाधव यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि टोकदारपणे हे वास्तव कवितांच्या माध्यमातून समोर ठेवले आहे.

    हा संग्रह वाचताना आपण केवळ अस्वस्थ होत नाही, तर आपण ज्या व्यवस्थेचे भाग आहोत त्या व्यवस्थेबद्दल आपल्याला अपराधीपणाची जाणीव होते. मातीला 'पेनकिलर' नको तर 'सन्मानाने जगण्याचा आधार' हवा आहे, हाच संदेश कवीने यातून दिला आहे. या संग्रहातील कवितांचा विस्तार हा केवळ गावापुरता नसून तो जागतिक संकटाचा एक स्थानिक चेहरा मांडणारा आहे. त्यांच्याकडून असेच भूमिका घेणारे वास्तववादी लेखन घडत राहो ही सदिच्छा व शुभेच्छा !

आस्वादक

संजय द. गोराडे (नाशिक)

मो. ९८५०६९१२१६ 

शुक्रवार, 7 जून 2024

जांभळीचा बांगला (बालकथासंग्रह)

जांभळीचा बंगला ; छान गोष्टींचा संग्रह

लहान मुलांना गोष्टी ऐकायला वाचायला खूप आवडतात. कारण गोष्टीतील घटनाक्रम त्यांनी कधीही न ऐकलेला असतो. त्यामुळे त्यांना पुढे काय होणार याची जिज्ञासा असते. म्हणून ते प्रत्येक गोष्ट मन लावून वाचतात व ऐकतात. त्यातून त्यांची कल्पनाशक्ती विकसित होत असते. मनोमन गोष्टीतील शेवटाविषयी अदांज बांधत ते त्यात रममाण होऊन जातात. लहान मुलांना असाच हलक्याफुलक्या छान छान गोष्टीत रममाण करणारा लेखिका वैशाली सूर्यवंशी यांचा ‘जांभळीचा बंगला’ बालकथासंग्रह आहे.  

लेखिका वैशाली सूर्यवंशी या प्राथमिक शिक्षिका आहे. बालविश्वात वावरताना त्यांना मुलांच्या आवडीनिवडीविषयी बारकाईने अभ्यास आहे. त्या अभ्यासातूनच त्या लहान मुलांसाठी सतत लेखन करत असतात. डॅनीच्या मिश्या आणि इतर गोष्टी व जांभळीचा बंगला असे दोन बालकथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. नकळत त्यांच्या आतले कोवळेपण उमलत लहान होते व साधेसाधे विषय त्यांच्या गोष्टीचे विषय बनत मुलांवर संवेदनशीलतेचे संस्कार करून जातात. 

‘जांभळीचा बंगला’ बालकथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत. पहिली कथा ‘हरण्या’ आहेत. त्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी आईवडील तुफान्या, वादळ्या, हरण्या ही आवडती जनावरे विकायचा निर्णय घेतात. मुलगा कार्तिक या निर्णयामुळे खूप कष्टी होतो. अशी ही प्राणीमात्राविषयी गोडी निर्माण करणारी कथा वाचून लहान मुलांनाही प्राण्यांविषयी लळा लागल्याशिवाय राहणार नाही. 

पुढची शीर्षककथा आहे, ‘जांभळीचा बंगला’.  ही साहसकथा आहे. या कथेत एक जांभळीचा बंगला आहे. त्या बंगल्यात भूत आहे म्हणून कोणीही त्या बंगल्यात जाण्याचं किंवा भोवती फिरकण्याचं धाडस करत नाही. भिवा आणि त्याचे मित्र आंबे पाडायचे म्हणून जांभळीच्या बंगल्याजवळ जातात, पुढे त्या मुलांचं काय होतं हे लेखिकेच्या शब्दात वाचणेच धारिष्ट्याचे ठरेल.  

तिसरी ‘लिली’ नावाची कथा आहे, दिव्यांग मुलांची धावण्याची स्पर्धा असते. लिलीने धावण्याची खूप तयारी केलेली असते. ती धावण्यात एक नंबर येऊन स्पर्धा जिंकते की ; स्पर्धा हरून माणसांची मने जिंकते हे कथा वाचल्यावरच कळणार आहे.  

दगड आणि बुलबुल, मैनूफुलपाखरू, मनूचा फुटबॉल, एका भांडणाची गंमत, सोनेरी बूट अशा लहान मुलांना आवडीच्या विविध विषयावरील आठ कथा आहे. लेखिकेने कुठलेही प्रयोगात्मक कलाटणी तंत्र कथेसाठी वापरलेले नाही. त्यांनी लहान मुलांच्या आकलन शक्तीचा विचार करत साधी सोपी कथा लिहिली आहे. जी लहान मुलांना झेपणारी आहे, साधं सोपं लिहिणं खरोखर सोपं काम नसतं. ते काम लेखिका वैशाली सूर्यवंशी लीलया पेललेले आहे. कथासंग्रहाला विजया वाड यांची छोटी पण मार्मिक प्रस्तावना आहे. कथासंग्रह दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. आतील मांडणी आणि कव्हर संतुक गोलेगावकर यांनी छान सजवले आहे,  एकूणच कथासंग्रह छान झालेला आहे, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी वाचावासा आहे, लेखिका वैशाली सूर्यवंशी यांच्या ‘जांभळीच्या बंगला’ कथासंग्रहास व पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा. 

आस्वादक 
लेखक संजय द. गोराडे (नाशिक)
मो. नं - ९८५०६९१२१६

सोमवार, 2 मई 2022

हंगामी (कथासंग्रह)


हंगामी : कामगाराच्या संघर्षमय जीवनाच्या कथा

भारत प्रगतीची अनेक शिखरे पार करत आहे, सर्वत्र विकासाचे वारे वाहत आहे, जगातील एक नंबरची महासत्ता बनण्याचे स्वप्न भारत पाहतो आहे, पण हे केवळ एक दिवास्वप्न आहे, खोलात विचार केला तर प्रगतीच्या नावाखाली सर्वत्र खाजगीकरण चालू आहे. कामावर कायम असणारे कामगारही देशोधडीला लावण्याचे षडयंत्र आखले जात आहे, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढते आहे, रोजंदारीवर तरुणांकडून कामे करून घेतली जात आहे. आस्थापनेत काम असेल तर कामावर यायचे ; काम नसेल तर घरीच बसायचे असे हंगामी तत्त्वावर कामे करून घेतली जात आहे. हीच आजच्या तरुणांची हंगामी कामगारांची व्यथा लेखक विलास पंचभाई यांनी ‘हंगामी’ कथासंग्रहात मांडली आहे.

लेखक विलास पंचभाई हे खाजगी आस्थापनेत काम करत आहे, त्यांनी हंगामी कामगारांचं जिणं काय असतं हे स्वतः अनुभवलं आहे. बालपणापासून ते एका आस्थापनेत कायम होण्यापर्यंतचा मोठा संघर्ष त्यांना करावा लागला आहे. खेड्यातील अतिशय हलाखीचे जीवन जगणारे लेखक कसेबसे स्वतःचे शिक्षण पूर्ण करतात. एक स्वप्न घेऊन खेड्यातून शहरात येतात. हंगामी कामगार ते कायम कामगारपर्यंतचा संघर्ष करतात. तो एकेक संघर्ष लेखकाने कथा रूपाने या कथासंग्रहात बेतला आहे.

‘सत्पात्री दान’ दान मिळालेल्या गायीची ही कथा आहे. गावाकडच्या आठवणीने लेखक कथासंग्रहाची सुरुवात करतात. ज्योती नावाची दान मिळालेली गाय घराला कशी बरकत आणते व तिच्या जाण्याने बरकत कशी हरवते वाचताना वाचक नक्कीच भावूक होतो.

‘शेजारधर्म’ कथा वाचताना तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना या म्हणीची प्रचिती येते. लेखकाचे वडील अण्णा व शेजारचे अप्पा यांचे वैर टोकाचे आहे, पण घरातील माणसांचा घरोबा तितकाच घट्ट आहे, असा हा शेजारधर्म जपताना लेखकाने टिपलेल्या व्यक्तिरेखा कौतुकास्पद आहे.

‘मायाडी’ कथेत लेखकाच्या आत्या बहिणीचे म्हणजे मायाचे एका आतंरजातीय मुलाशी प्रेम जुळते, परंतु जातीपातीत गुरफटलेल्या समाजाला ते मान्य होणे शक्यच नसते. घडून गेलेल्या चुकीची जाणीव होताच माघारी फिरलेल्या मायाची संघर्षमय हिमंत वाचकास नक्कीच थक्क करणारी आहे.

‘बदली’ कथेत लेखक बहिणीकडे शिकायला असतात. काही कारणावरून बहीण आणि वडिलांत वाद होतात. दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचे नुकसान, हुशार लेखकाच्या आयुष्याची दिशास कशी चुकून जाते ते या कथेत वाचायला मिळते.

शहरात स्थिरस्थावर झालेल्या लेखकाला गावाबद्दल आजही आस्था आहे, गावाकडच्या शिवलाल शेठची भज्यांची चव आजही त्यांच्या जिभेवर रेंगाळते आहे, ती आठवण वाचताना लेखक अनेर नदीच्या काठी वसलेल्या होळनाथे गावात वाचकालाही सहज ‘शिवलाल शेठची भजी’ चाखायला घेऊन जातात. ही कथा भज्यांइतकीच चविष्ट वाटते.

‘हंगामी’ या शीर्षक कथेत लेखक एका आस्थापनेत हंगामी तत्त्वावर काम करतात. सहा महिने काम करायचे सहा महिने घरी बसायचे. आयुष्याची ही परवड सहन न झाल्याने कंटाळून अजय नावाचा मित्र विष पिऊन आत्महत्या करतो, काही मित्र बेभरवशाची नोकरी सोडून गावी निघून जातात. मात्र लेखकाला आस्थापनेतील कायम कामगारांप्रमाणे आपणही कायम होऊ अशी आशा असते. म्हणून ते तब्बल आठ वर्ष हंगामी कामगाराचं जिणं जगतात. या काळातील त्यांची ससेहोलपट वाचताना नको ते कामगाराचे जिणे असा विचार मनात येतो. ही कथा औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक बेरोजागर तरुणांची प्रतिनिधित्व करणारी आहे.

आस्थापनेत कामाचा नियोजित हंगाम पूर्ण करून घरी बसलेला लेखकाचा मित्र रिकामा वेळ आहे म्हणून एका मुलीच्या प्रेमात पडतो. मात्र ते प्रेम मित्राच्या कसे अंगलट येते हे ‘प्रेम’ कथेत सांगितले आहे.

नाशिकमध्ये आल्यानंतर लेखकाला सर्वात मोठा आधार कुणी दिला असेल काळे गुरुजींनी. ते काळे गुरुजींना गुरुस्थानी मानतात. संकट कितीही मोठे असू द्या ; त्याला कसे सामोरे जायचे याचे धडे त्यांनी काळू गुरुजींकडून गिरवले आहे, मात्र त्यांचा शेवट खूपच विदारक झाल्याने ‘काळे गुरुजी’ कथा वाचताना मन खूपच कष्ट होते.

‘मागचे दार’ कथेतील लालित्य वाचताना लेखक भविष्यात खूप छान ललित कथा लिहितील यात शंका नाही. घराच्या मागच्या दाराविषयी इतके सारे ऋणानुबंध असू शकतात वाचल्यानंतर खरोखर वाचक मंत्रमुग्ध होतो.

शेवटची ‘प्रमोशन’ कथा आहे, आठ वर्षाचा हंगामी कामगाराचा वनवास भोगल्यानंतर आस्थापनाकडून कायम करण्याचे आश्वासन दिले जाते. कायम व्हावे म्हणून लेखक सण सभासभारंभात व आप्तमित्रांना देखील भेटण्याचे टाळतात, कारण दांड्या मारल्या तर हाताशी आलेलं प्रमोशन डिमोशनमध्ये बदलते की काय अशी धास्ती त्यांना असते. हा परीक्षेचा खडतर काळ वाचताना प्रत्येकाला तो आपलासा वाटतो. इतका तो वास्तवदर्शी साकारला आहे.


अशा एकूण ‘हंगामी’ कथासंग्रहात दहा कथा आहेत. बालपणापासून ते आस्थापनात कायम होईपर्यंतच्या संघर्षमय जीवनाच्या कथा लेखकाने या कथासंग्रहात चितारल्या आहे, प्रत्येक कथेतील त्यांचा अनुभव त्यांचा न राहता सार्वत्रिक व तितकाच महत्त्वाचा वाटतो. औद्योगिक क्षेत्रात आख्खी हायत खर्च करून कायम न झालेल्या कामगारांच्या प्रश्नांना या कथासंग्रहातून थोडीबहुत वाचा फोडली आहे असे वाटते. लेखकाचा हा पहिलाच कथासंग्रह असूनही पहिलारू असल्याचे कथा वाचताना अजिबात वाटत नाही. कथांची मांडणी साधीसोपी असल्यामुळे कथा व कथांतील पात्र वाचकाच्या स्मरणात राहतात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी वाचावा असा कथासंग्रह आहे, लेखक विलास पंचभाई यांच्या ‘हंगामी’ कथासंग्रहाचे वाचक भरभरून स्वागत करतील अशी आशा करतो व पुढील लेखनास शुभेच्छा देतो.

संजय द. गोराडे (नाशिक)

मो. नं - ९८५०६९१२१६

बुधवार, 20 अक्टूबर 2021

नात्यांचे सर्व्हिसिंग (कथासंग्रह)


नात्यांचे सर्व्हिसिंग

आज प्रत्येकाकडे दुचाकी किंवा चारचाकी यापैकी एक तरी वाहन आहे, स्वतःकडे असलेल्या वाहनाला माणसं खूप जीवापाड जपताना दिसतात. तीन हजार किलोमीटर वाहन चालले की ऑईल बदलतात, दहा हजार किलोमीटर फिरले की सर्व्हिसिंग करतात, थोडा जरी तिचा कुरकुर आवाज आला की लगेच फिटरला दाखवतात. कारण वाहनाकडे दुर्लक्ष केलं तर ते जीवावर बेतणारे असते. म्हणून प्रत्येक जण वेळच्यावेळी वाहनाची सर्व्हिसिंग करतात. तीच सतर्कता मात्र माणसाची माणसासोबत वागताना आढळत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून समज गैरसमज केले जातात. चांगली नाती तोडली जातात. पश्चाताप होतो, कधीकधी तर काही नाती जीवघेणीही ठरतात, तेव्हा वाटते, आपणही नात्यांचे सर्व्हिसिंग करायला हवे होते.


शब्दमल्हार प्रकाशित विश्वास ठाकूर लिखित ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ (कथासंग्रह) पुस्तक खऱ्या अर्थाने मानवी नात्यांचा शोध घेणारे आहे. या कथासंग्रहात ऐकून पंचवीस कथा आहे. लेखक बँकिंग क्षेत्राची असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या जीवनातील पंचवीस खरे अनुभव कथा रूपाने लिहिले आहेत. व्यवसायानिमित्त संपर्कात आलेल्या वेगवेगळ्या पंचवीस व्यक्ती व त्यांच्याविषयी चांगलेवाईट अनुभव-कथा वाचक म्हणून वाचताना पानोपानी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. एरवी संत, सज्जन व आपलासा वाटणारा माणूस प्रत्यक्षात किती वेगळा आहे हे कळते. खरंतर आज सगळं जग पैशामागे धावते आहे. पैसा असला की माणसं गुळाला मुंग्या चिटकव्या तसे चिटकतात. पैसा नसला की सारे जण तोंड फिरवतात. असा आपमतलबी माणूस लेखकाने नेमका रेखाटला आहे, माणसे गरजेपुरते जवळ येतात व काम झालं की विसरून जातात. मात्र लेखकाला त्या माणसांबद्दल बिलकुल आकस नाही, माणसं तोडायची नसतात ; जोडायची असतात ही लेखकाच्या ठायी सकारात्मकता आहे, त्यामुळेच ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत, तरीपण माणूस म्हणून मागे वळून पाहताना त्यांना वाटते, दुरावलेल्या नात्यांत कुठेतरी सर्व्हिसिंग व्हायला हवे होते.


सर्व्हिसिंग म्हणजे निर्माण झालेल्या गैरसमजावर मनमोकळी चर्चा असा लेखकाला अर्थ अपेक्षित आहे, कारण प्रत्येक समस्येवर मनात किंतु न ठेवता चर्चा केली मार्ग निघू शकतो. परंतु तसं न होता माणूस भावनेच्या गर्तेत फसत वेगळीच समस्या उभी करतो. मग नको त्या परिणामाला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंत्राची आपल्यापणाने सर्व्हिसिंग करणाऱ्या माणसांनी नात्यांची पण सर्व्हिसिंग तितक्याच जागरूकतेने करायला हवी हे समर्पकपणे लेखकाने या कथासंग्रहातून सूचित केले आहे.   


लेखकाने कथन केलेल्या अनुभव-कथा बँकिंग व्यवसायाशी संबधी असल्या तरी वाचक म्हणून आपल्याशा वाटतात. प्रत्येक कथेचा शेवट उत्कंठावर्धक आहे, विषयाला धरून प्रत्येक कथेची बांधणी केलेली आहे, कथा वास्तववादी असल्यामुळे कंटाळवाणे वाटत नाही. शब्द साधेसोपे आहे. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद कथांमध्ये आहे, त्यामुळे प्रथितयश कथाकाराला लाजवेल असा ‘नात्यांची सर्व्हिसिंग’ कथासंग्रह तयार झाला आहे. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ समजून आपल्या आयुष्यात पेचप्रसंग थोडेबहुत कमी करायचे असल्यास ‘नात्यांची सर्व्हिसिंग’ कथासंग्रह नक्की वाचला पाहिजे. लेखकाचा भविष्यकाळ उज्वल आहे. पुढील लेखनास शुभेच्छा.

पुस्तक - नात्यांचे सर्व्हिसिंग (कथासंग्रह)

लेखक - विश्वास जयदेव ठाकूर

प्रकाशक - शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक.

मूल्य - ९९/- 


आस्वादक – संजय द. गोराडे (नाशिक)

मो नं - ९८५०६९१२१६                    

 

बुधवार, 6 अक्टूबर 2021

गुलमोहराचं कुकू


‘गुलमोहराचं कुकू’

नाशिकचे युवा कवी प्रशांत केंदळे यांचा बहुचर्चित कवितासंग्रह ‘गुलमोहराचं कुकू’ वाचकास निसर्गाची सैर करत छान वाचनानंद देतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा कवितासंग्रह निसर्गाविषयी आपुलकी निर्माण करत माणसाच्या नकळत जाणिवा आणि नेणीवा जागृत करत सामाजिक भान देतो. निसर्गाची वेगवेगळी रूपके वापरून गुंफलेल्या कवितांमधून कवी सहज माणसातील माणूसपण जागे करतो व निसर्गाविषयी गोडी निर्माण करत आत्मचिंतन करायला भाग पाडतो.   

   ‘गुलमोहराचं कुकू’ कवितासंग्रह चार विभागात विभागलेला आहे. पहिला विभाग ‘माझ्या कवितेचा मळा’ शीर्षकाचा आहे. कवीच्या या कवितेच्या मळ्यात वाचक म्हणून फेरफटका मारताना कितीतरी कविता ओठावर अलगद सूर धरून गुणगुणाव्याशा वाटतात. निसर्गाचा संसर्ग झालेला कवी स्वतःच निसर्ग झाल्याचे पानोपानी कबूल करतो. त्याच्या देहातच निसर्ग भिनलेला असल्याने त्याची कविता निसर्गोद्गार काढत स्वतःचं वेगळेपण सिद्ध करते.

दिले कवितेने सारे

कवितेला काय देऊ

गात काळजाचे गाणे

देह सरणावर ठेवू

      कवितेमुळे जगण्याला एक वेगळीच संमृद्धता आली आहे. त्यामुळे शेवटच्या श्वास असेपर्यंत त्याला कवितेसाठी जगायचं आहे. कारण कवितेने कवी म्हणून दिलेला सन्मान त्याला जिवापेक्षा अनमोल वाटतो, म्हणून तो स्वतःला कवितेच्या शब्दपालखीचा भोई समजतो. शेतीमातीच्या प्रतिकांनी नटलेली प्रत्येक कविता कवी कुणब्याच्या रुपात खूपच छान पद्धतीने परिचय करून देतो.

पाण्यापरी विहिरीच्या खोल पाख्यातून यावी

कवितेने माझ्या शब्दांना गा संजीवनी यावी

           त्याच्या प्रत्येक कवितेचा शब्द विहिरीच्या खोल पाख्यातून पाणी झिरपावे तसे आहे. असे आत्मचिंतनातून योजलेले शब्द कवितेसाठी संजीवनी ठरतात. असा कुणबी रुपी कवी कवितेच्या मळ्यातून विठू मातीचा देह, गाव, पाडा, सुडी, तुकोबा, कुणब्या रे गड्या अशा एक से बढकर एक कविता वाचत वाचत वृक्षाच्या लळा लावत संग्रहाच्या दुसऱ्या भागात कधी आणून सोडतो कळत नाही.

झाडाचं व्रत घेऊन शिकत जावं देणं

साऱ्या देहाला फुटावी हिरवी हिरवी पान

           झाडे माणसांना सावली, फळे, फुले, लाकूड व पक्ष्यांना निवारा देत असतात, त्याला फक्त देणं माहीत असतं, त्याचं हे समर्पणाचं व्रत आपण माणूस म्हणून शिकलं पाहिजे हे कवीने या कवितेतून सुंदर रीतीने मांडले आहे.

रोप रोप लावताना

वाटे लावतो पणती

हीच मातीची दिवाळी

हिरवी मिणमिणती

           ‘रोप लावताना’ या कवितेत कवीला लावलेली रोपं पणतीप्रमाणे भासतात. त्या दिवशी मातीला खऱ्या अर्थाने दिवाळी असल्यासारखे वाटते. जेव्हा याच रोपांची झाडे होतात ; तेव्हा मातीच्या स्वप्नातील पाऊस होतात तर वर्तमानातील श्वास होतात. अशी ही झाडं येणारा भविष्यकाळ उज्ज्वल ठेवायचा असेल तर जपायला हवी. बुजुर्ग, वैभव, झाड तुटताना अशा मोजक्या पण वेगवेगळ्या कवितांमधून कवीने वृक्षांची महती खूप मार्मिकपणे मांडलेली आहे.

          कवितासंग्रहाचा तिसरा विभाग ‘काळीजकळा’ आहे. या तिसऱ्या विभागात कवीने काळजातील नात्यांचा भावबंध उलगडून सांगितला आहे. काळजात काट्याप्रमाणे खुपणाऱ्या व फुलाप्रमाणे सुखवणाऱ्या नातेसंबधावर प्रकाश टाकला आहे. ‘माय’ या कवितेत कवी केंदळे यांनी मायबाप विषयक केलेलं वर्णन तर अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारे आहे.

वेडी बाभूळ वाढते साय खाऊन उन्हाची

वाटे मला माझी माय लेक तशीच रानाची

कवीने जाणीवपूर्वक मायेला योजिलेली वेड्या बाभळीची प्रतिमा खूप अर्थपूर्ण आहे. कारण बाभळीचं झाड कोणी ठरवून लावत नसते. ते स्वतःहून कुठेतरी बांधाला उगते व बिनापाण्याचे साय खाऊन वाढते. असं हे काटेरी जिणं नशिबी असलेल्या बाभळीत कवीला स्वतःची माय दिसते तर बाभळीच्या लाकडात घराचा आधार वाटणारा बाप मेढीसारखा भासतो. असं मुलांसाठी आयुष्याचं सरपण केलेल्या मायबापाला जपायलाही सांगायला कवी कवितेच्या शेवटी विसरलेला नाही. अशा नात्यांवर आधारलेल्या व निसर्गाच्या प्रतिकांनी फुलवलेल्या कविता वाचकाच्या काळजात खूप खोल स्पर्श करून जातात. ‘बाप लेकीची कहाणी’ या कवितेत बापाची लेकीबद्दल असलेला हळवा कोण मांडला आहे. ‘जन्म बाईचा असा’ या कवितेत बाई कुटुंबासाठी कशी रात्रंदिवस धुपते हे सांगितले आहे. आजी, सये, नाते, बांध, बाप कर्जात बुडला या कविता वाचक म्हणून वाचताना डोळे पान्हावतात.  

शेवटचा विभाग ‘ऊन झळा पाऊस कळा’ आहे, ऊन झळा सोसून व पाऊस कळा झेलून वाट्याला आलेल्या परिस्थिती या विभागात मांडली आहे. ‘ऊन वाढत जाताना’ या कवितेतील ‘ऊन वाढत जाताना आटत जातं तळं, मातीच्या आतडीचा कळू लागतो पीळ’ ओळी जीवनविषयक सल मांडत नभाला आळवणी करताना कवी दिसतो. ‘गुलमोहराचं कुकू’ या शीर्षक कवितेत कवी मातीसोबत पावसाला लगीन करायला सांगत भांगेत गुलमोहराचं कुकू भरत म्हणतो.

आता पावसा माताशी कर लगीन साजरं

गुलमोहराचं कुकू तिच्या भांगामधी भर

  पावस आणि मातीच्या लगीन सोहळा कवीने कवितेतून खूप छान मांडला आहे. बाभळीची पिवळी फुले म्हणजे कवीला हळद सोहळा वाटतो, वाळलेली पाने अक्षदा वाटतात. ऊन अंतरपाट वाटतो, अशी विविध रूपके वापरून कवितेतून उभा केलेला लगीन सोहळा खरोखर कवीच्या प्रतिभेचा उच्चांक आहे.  क्षणभर वाचक खरोखर या अनोख्या लगीन सोहळ्यात हरवून जातो. मात्र पाऊस आणि मातीचा संसार टिकला तर आपसूकच माणसाच्या जीवनात संमृद्धता येईल असे कवीला या कवितेतून अप्रत्यक्षपणे सुचवायचे असल्याचे जाणवते, अशा शेतीमातीशी सांगड घालत परिस्थितीबद्दल अवगत करून देणाऱ्या कविता वाचकाला नक्कीच अंतमुर्ख करायला लावणाऱ्या आहेत. अरे नभाळ्या, खाली भेगाळली भुई, जरा उघडीप झाल्यावर या कविता वाचकाला अक्षरश: सुन्न करतात व मनोमन परिवर्तन घडवून आणतात.


असा निसर्गाच्या प्रतिमा, प्रतीके व रूपके वापरून साकारलेला ‘गुलमोहराचं कुकू’ कवितासंग्रह खूप मोठे संचित मांडताना दिसतो. जे वाचकाचे आत्मभान जागे करणारे आहे, असा हा कवितेला श्वास मानणारा कवी प्रशांत केंदळे यांचा निसर्गाच्या शब्दकळांनी फुलवलेला कवितासंग्रह नक्कीच लहानापासून थोरांपर्यंत पसंतीस उतरणारा व दखलपात्र ठरणारा आहे. चपराक प्रकाशित असलेला ‘गुलमोहराचं कुकू’ कवितासंग्रह कवीच्या कवितेइतकाच अंतर्बाह्य सुंदर झालेला असून वाचक नक्कीच आवृत्यांवर आवृत्या संपवतील अशी आशा करतो व कवी प्रशांत केंदळे यांना पुढील लेखनास शुभेच्छा देतो. धन्यवाद.

 

आस्वादक - संजय द. गोराडे (नाशिक)

मो. नं  - ९८५०६९१२१६        

शुक्रवार, 28 मई 2021

देवमाणूस (बालकथा)


           देवमाणूस

“तेजस... उठ, किती वेळ अंथरुणावर अजगरासारखा पडून राहणार आहेस ?"

आळसावलेला तेजस झटक्याने अंथरुणावर उठून बसला. त्याला आज शाळेलेत जायचे नव्हते. रोजरोज शाळेत जाण्याचा त्याला कंटाळा आला होता. परंतु विजूदादा अजगर म्हटल्याने त्याला राग आला होता. घुशानेच अंथरुणावरून उठत त्याने मोठ्या भावावर डोळे वटारले होते.  

“असं काय मारक्या बैलासारखं माझ्याकडे बघतोस ?” विजूने पुन्हा त्याला डिवचले होते. 

“आई पहाय ग, दादा मला काय म्हणतोय ?” चिडत तेजसने आईला त्याचे नाव सांगितले. 

“नको विजू... कशाला त्याचं नाव घेतोय !” स्वयंपाकघरातून आईने विजूला दटावले.  

तेजस तणतण पाय आपटत रागाने स्वयंपाक घरात निघून गेला. त्याच्या माघारी विजू मात्र तोंड दाबून खुदुखुदू हसत होता. त्याला छोट्या भावाला चिडवण्यात नेहमीच मौज वाटत असे. तेजस मोठ्या गटात होता ; तेव्हा चांगला दहा वाजेपर्यंत झोपत होता. परंतु पहिलीला गेल्यापासून लवकर उठायला तो भलते नाटकं करत होता. त्यामुळे विजू त्याची खोडी काढून त्याला जागवत असे. दुसरं खोडी काढण्याचे अजून एक कारण होते, तेजस दिसायला खूप गबदुला व गोबऱ्या गालाचा होता. रागवला की त्याचे गोरे गाल व नाकाचा शेंडा खूप लाल होत असे. त्यात त्याला मस्करी बिलकुल सहन होत नसे. तो चिडतो म्हणून विजू त्याला अधिकच चिडवत असे. 

बळेबळे शाळेत पाठवलेला तेजस बसमधून खाली उतरला. रांगेत तो पाठीवरचे दप्तर सांभाळत शाळेच्या वर्गात जात होता. इच्छा नव्हती तरी आईने शाळेत पाठवले म्हणून तो थोडा नाराज होता. जड पावलाने तो रांगेत वर्गात जात असताना मागून एक मुलगा विचित्र आवाजात ओरडला, “ये हाथीभाई, मुंगीभाईसारखा काय चालतोय, घोडेभाईसारखं चल ना !”

त्याच्यामागून रांगेत येणारी मुलं त्या चमत्कारिक आवाजाने खोखो हसू लागली होती. आधीच त्याच्या लठ्ठपणाला सर्व मुलं हाथीभाई म्हणून चिडवत होते. त्यात त्याला मुंगीभाई व घोडेभाई म्हणताच चांगलाच हश्या पिकला होता. त्याने रागात पाठीमागच्या मुलांकडे पाहिले. ते त्याला वाकुल्या दाखवून खिजवत होते. तो रागाने लालेलाल झाला होता, पण कुणालाच काही म्हणाला नाही. कारण त्याला माहीत होते, आपण चिडलो की ; आपले मित्र आपल्याला अजून जास्त चिडवतात. तो निमुटपणे वर्गाच्या दिशेने चालत राहिला.

आज तेजसचे अभ्यासात बिलकुल लक्ष लागत नव्हते. सकाळी-सकाळी विजूदादा त्याला अजगर व मारका बैल म्हणाला होता. शाळेत आल्यावर मित्रही हाथीभाई, मुंगीभाई, घोडेभाई असे कायकाय म्हणाले होते. त्याचं चांगलं ‘तेजस’ नाव होतं, परंतु सगळे जण आज त्याला का कुणास ठाऊक ; वेगवेगळ्या प्राण्याच्या नावाने हाका मारत होते व खिल्ली उडवत होते. आई सोडून कोणीच का आपल्याला तेजस म्हणत नाही म्हणून तो नाराज झाला होता.

“ये गाढवा, मी फळ्यावर शिकतोय, लक्ष कुठे आहे तुझे !”  

शिक्षक रागावताच विचारात गढलेला तेजस भानावर आला. गोंधळून त्याने शिक्षकांकडे पाहिले. ते त्याला फळ्याकडे लक्ष द्यायला सांगत होते. त्याची कावरीबावरी मुद्रा पाहून बाकी मुले खदाखदा हसू लागली. मित्र मुद्दामून खिजवण्यासाठी हसत आहे पाहून त्याने मान खाली घातली होती. सर्वजण आज ठरवून आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांच्या नावाने हिणवत आहे असे त्याला उगाचच वाटले होते.

मधली सुट्टी होताच तेजस शाळेच्या मोकळ्या मैदानात एकटाच एका कोपऱ्यात घरून आणलेला डब्बा खात बसला. मित्रांत जेवायला बसलो तर उगाच ते आपल्याला एखाद्या प्राण्याच्या नावाने चिडवतील अशी त्याला भीती वाटली होती. तेवढ्यात चौथीच्या वर्गातील एक अनोळखी मुलगा त्याच्याजवळ येत म्हणाला, “ये छोटू... तिकडे मुलांमध्ये जेवायला बस ना, इकडे काय एकटाच भित्र्या मांजरीसारखा जेवायला बसला आहेस !”

तेजसला एकटेच कोपऱ्यात जेवायला बसलेले पाहून त्या अनोळखी मुलाला सहानुभूती वाटली होती. म्हणून त्याने आपुलकीचा सल्ला दिला होता. परंतु त्याला तेजसच्या मनस्थितीची बिलकुल कल्पना नव्हती. मांजरीसोबत त्याची तुलना करताच तेजसला खूप राग आला होता, परंतु तो मुलगा खूप मोठा असल्याने त्याने त्याचा राग आतल्या आत गिळून टाकला होता. 

दुपारी शाळा सुटताच तेजस काहीसा नाराजीने घरी परतला होता. घरात पाऊल टाकताच त्याला हॉलमध्ये आई आणि वडील बसलेले दिसले. वडील त्याच्याकडे पाहून आनंदाने म्हणाले, “आला माझा वाघ शाळेतून, कसा गेला बाळा आजचा दिवस ?”

वडील पण वाघ म्हणताच तेजस रडकुंडीला आला होता. त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत तो सरळ आतल्या घरात निघून गेला. वडील रोजच त्याला कौतुकाने वाघ म्हणत असत, परंतु आजचे त्यांनी वाघ म्हटलेले त्याला आवडले नव्हते. 

शाळेतून आल्या-आल्या वडिलांच्या गळ्यात पडणारा तेजस सरळ आतल्या घरात निघून गेलेला आईला खटकले होते. त्याच्या त्या कृतीकडे ती अचंबित नजरेने पाहत राहिली होती. शाळेत काहीतरी बिनसले असल्याची तिला कल्पना आली. त्याच्या पाठोपाठ आतल्या खोलीत येत ती म्हणाली, “काय रे तेजू...काय झालं ?”

तेजस दप्तर पुस्तकाच्या कपाटात ठेवत नाराजीच्या सुरात उद्गारला, “आई, मी प्राण्यासारखा दिसतो का ग ?”

त्याच्या प्रश्नाने चकित होत आईने विचारलं, “का रे बाळा, तुला असं कोण काय म्हणालं ?” 

“सकाळी विजुदादा मला अजगर आणि मारका बैल म्हणाला, शाळेत गेलो तेव्हा मित्र हाथीभाई, मुंगीभाई आणि घोडाभाई म्हणत होते, वर्गात पण सर गाढव म्हणाले, मधल्या सुट्टीतही एक मुलगा भित्री मांजर म्हणाला, मी या सगळ्या प्राण्यांचा मिळून बनलो आहे का ग ?” निरागस तेजसने रडवेल्या स्वरात मनातली सल आईला विचारली.  

“नाही बाळा !” त्याच्या नाराजीचे कारण लगेच आईच्या लक्षात आले. प्रेमळ हात पाठीवर फिरवत ती त्याला म्हणाली, “तू तर माझा छान मुलगा आहेस !”

“मग मला का सर्वजण प्राण्यांच्या नावाने चिडवतात !” तेजसच्या बालमनाला प्रश्न पडला होता.  

“बेटा तू एक हुशार मुलगा आहेस, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस !” आईने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. 

“नाही आई, खरं सांग... मी त्यांच्यासारखा वागतो का ?” तेजसचे डोळे भरून आले होते. 

“त्याचं असं आहे बेटा !” त्याला दुखावलेलं पाहून आई समजावून सांगू लागली, “सकाळी आपण जास्त वेळ अंथरुणात झोपलो की ; त्याला अजगरासारखं झोपणं म्हणतात. कारण अजगर हा आळशी प्राणी आहे, तसंच मारका बैल, हत्ती, मुंगी, घोडा, मांजर यांच्याबद्दल आहे, जेव्हाही माणूस चुका करतो ; तेव्हा त्याला अशा प्राण्यांच्या नावाने टोकलं जातं !” 

“म्हणजे देवाने माणूस सगळ्या प्राण्यांचा मिळून बनवलाय का ग आई ?” तेजसच्या बालमनाला भलताच प्रश्न पडला होता.

“नाही बाळा, माणसाला देवाने खूप खास बनवलं आहे, पण हल्ली तो या प्राण्यांसारखा वागू लागला आहे, तो विसरून गेला आहे आपण माणूस आहोत ते, त्याने जर ठरवलं ना... तर तो माणसाचा देवमाणूससुद्धा होऊ शकतो !”

“आई... मग मला पण देवमाणूस व्हायचं आहे !” तेजस ठामपणे उद्गारला. 

त्याच्या डोळ्यात एक अलौकिक तेज चमकलेले आईला दिसले. समाधान पावल्यागत ती पुढे म्हणाली, “तर आजपासून अजगरासारखं अंथरुणात झोपून राहायचं नाही, कोणी काही बोललं तर मारक्या बैलासारखं पाहायचं नाही, सर्व कामे घोड्याच्या जलद वेगाने करायची ; मुंगीसारखे हळूहळू करायचे नाही आणि कोणतेही काम असू दे ; मांजरीसारखं घाबरायचं नाही, वाघासारखं पुढे होऊन करायचं, कारण जो प्राणी असतो त्याच्यात दुर्गुण असतात आणि जो माणूस असतो त्याच्यात सद्गुण असतात, सांग... तुला माणूस व्हायचं की प्राणी ?”

“माणूस... मी मोठा झालो की, छान माणूस बनेल !”

“माझा हुशार बाळ !” 

तेजस आनंदाने आईच्या गळ्यात पडला, कारण त्याच्यातील दुखावलेल्या माणसाला आनंद झाला होता. त्याने मनोमन ठरवून टाकले, ‘मोठा झाला झालो की ; मी असा माणूस बनेल, ज्याचा आईवडिलांना पण अभिमान वाटेल...!’  
***** 
© लेखक संजय द. गोराडे (नाशिक) 
मोबाईल :- ९८५०६९१२१६. 

सोमवार, 19 अप्रैल 2021

असंवेदनशीलतेचे दर्शन

असंवेदनशीलतेचे दर्शन  

कोरोना गेला असे वाटत असताना पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि सुधारत असलेलं माणसाचं जीवनमान पुन्हा विस्कळीत झाले. आज महाराष्ट्रात हजारोच्या संख्येने दिवसाला कोरोना रुग्ण सापडत आहे. सरकारी व खाजगी सर्व रुग्णालय कोरोनाग्रस्त रुग्णांनी खचाखच भरले आहे. बेड मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर रुग्णालयाच्या आवारात रुग्ण उपचार घेत आहे. लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही आहेत. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत दोनदोन दिवस थांबावे लागत आहे. एकीकडे असे भयावह चित्र असताना दुसरीकडचे चित्र मात्र असंवेदनशीलतेचा कळस करणारे पहायला मिळते आहे. त्यात पहिला नंबर लागतो डॉक्टरांचा, दुसरा नंबर राजकारण्याचा आणि तिसरा नंबर हलगर्जीपणाने वागणाऱ्या लोकांचा. 


धन्वंतरीचा वारसा चालणारे डॉक्टर आज कोरोना काळात खरोखर प्रामाणिक सेवा देत आहे ? कधीकाळी देव वाटणारे डॉक्टर आज का कुणास ठाऊक गिधाडाच्या अवलादीची वाटू लागली आहे. गिधाडे तरी मेलेली जनावरे खातात. डॉक्टर रुपी गिधाडे जिवंत माणसाला अर्धमेले करून त्याच्या टाळूवरचे लोणी खात आहे. इतकी कशी संवेदनशीलता मारून टाकली आहे ! मान्य आहे डॉक्टर जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देतात. म्हणून कसायाप्रमाणे रुग्णाचा गळा आर्थिक सुरीने कापणार ! मोठ्या अपेक्षेने रुग्ण हॉस्पिटलची पायरी चढतात. त्यांचा स्कोर आणि ऑक्सिजन सामान्य माणसांप्रमाणे असतो, परंतु ते कोरोनाने बाधित असतात. त्यांना जुजबी गोळ्या औषधे व मानसिक आधार दिला तरी ते बरे होणारे असतात. परंतु चालू आलेली शिकार जिवंत सोडतील ते डॉक्टर कसले. काही डॉक्टर चांगलेही असतील. पण गव्हात खडे नसून खड्यात गहू तसे आहेत. 

डॉक्टरांनी आपल्या सेवेचा धंदा केला आहे. आज दवाखान्यात रुग्ण अॅडमिट झाला की कमीतकमी एक लाख रुपये बिल निघते. मग त्या रुग्णाची बिल भरण्याची कुवत आहे की नाही याच्याशी अजिबात घेणेदेणे नसते. एक दिवसाचे रुग्णालयाचे चार्जेस कमीतकमी सात हजार रुपये आहेत. मेडिकलचा खर्च वेगळा. त्यात रेमडीसिवीरचे इंजेक्शन नसतानाही काही रुग्णालयात रुग्ण अॅडमिट करून घेतात आणि रेमडीसिवीरचे इंजेक्शन काळ्या बाजारातून आणायला सांगतात. वर काळ्या बाजारातून इंजेक्शन आणायचे संपर्क क्रमांकही तेच सुचवतात. आधीच परिस्थितीने हवालदिल वर्षापासून तग धरून आहे ; त्यात कोरोना होणं म्हणजे भिकेस लागण्यासारखे आहे. अशा प्रसंगी पैसाच सर्वस्व न मानता डॉक्टरांनी माणूसपणाला काळिमा फासणारी कृत्य कुठेतरी थांबवली पाहिजे, थोडेसे माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. कधीकाळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात एक कौटुंबिक विश्वासाचे नाते होते. सर्व सामान्यासाठी देव असलेल्या डॉक्टरांनी या विश्वासाचा घात करू नये इतके सांगणे.  


कोरोनासारखी महामारी संबध जगावर ओढवली असताना सर्वात गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात केलं जात आहे. तीन पक्ष सत्ता टिकवण्यासाठी तर एक पक्ष सत्ता मिळविण्यासाठी भांडत आहे. कुणालाच महाराष्ट्राच्या जनतेशी घेणेदेणे नाही. यात दोघांचे भांडण तिसऱ्याचे नुकसान होते आहे. नहाग निरपराध जनता यांच्या भांडणात भरडली जात आहे. केंद्र सरकार म्हणते आम्ही लसी पाठवल्या आहेत, राज्य सरकार म्हणते आम्हाला लसी मिळाल्या नाहीत. कोण खोटं बोलतं आणि कोण खरं बोलतं तेच कळत नाहीये. आतापर्यंत सचिन वाझे प्रकरणावर राजकारण चालू होते ; आता रेमडीसिवीर इंजेक्शनवर राजकारण चालू केले आहे. सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष दोघे एकमेकांना बदनाम करत आम्ही कसे जनतेचे कैवारी आहोत हे दाखवत आहे. खरंतर संपूर्ण देशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत. अशा वेळी कोणतेही राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन व स्वतःचा पक्ष विसरून जनतेचा मदतीसाठी धावून यायला हवे होते. परंतु तसे न होता सर्व पक्ष कुरघोडी करण्यात मग्न आहे. 

यात सर्वात अग्रेसर विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्ष हा महाराष्ट्र सरकारचा विरोधक आहे की महाराष्ट्रातील जनतेचा तेच कळत नाहीये. इतक्या वर्षाच्या राजकारणात कधी नव्हे इतका भयंकर विरोधी पक्षनेता महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळाला आहे, सत्ता नाही म्हणून जनतेला वेठी धरण्याचं राजकारण अगदी नीच पातळीचे आहे, एकीकडे महाराष्ट्र सरकारला कुच्छकामी ठरवत आम्ही केंद्राकडून मदत आणू म्हणायचे, दुसरीकडे महाराष्ट्राला कशी कमीतकमी मदत मिळेल म्हणून पडद्यामागे राजकारण करायचे हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दुधखुळी नाही आहेत. कोरोनावर संजीवनी ठरणाऱ्या रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा करणाऱ्या राजेश डोकानियाला सोडवण्यासाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे विरोधी पक्ष नेते जनतेच्या मदतीसाठी धावून आले असते तर महाराष्ट्रातील जनतेला अडचणीच्या काळात धावून येणारे नायक वाटले असते. परंतु पाण्याविना मासा तशी सत्तेविना भाजपची स्थिती झाली आहे. त्यांच्यातील खलनायकाला जनतेचे हाल दिसेनासे झाले आहे. अर्थात विरोधी पक्षनेते केंद्राच्या सांगण्यावरून तसे वागत असावे अशी कुठेतरी शंका येते आहे, नाहीतर महाराष्ट्रीय म्हणून त्यांच्या काळजाला पाझर फुटायला हवा होता. परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहेत. ती सगळे उघड्या डोळ्यांनी पाहते. जनतेच्या हा तळतळाट सूडबुद्धीने वागण्याऱ्या राजकारण्यांना नक्की भोगावा लागेल. आता या घडीला निष्पक्ष जनतेच्या मदतीसाठी धावून येणारा देव ठरेल, परंतु तेवढी सदसदविवेकबुद्धी असायला हवी.      

पुलावरून इतके सगळे पाणी वाहते आहे तरी जनतेचा हलगर्जीपणा मात्र कमी होताना दिसत नाहीये. जनतेची अवस्था गोष्टीतल्या वाघासारखी झाली आहे, एक वाघ माणसांच्या वस्तीत आला, तो वाघ पाहून माणसं सुरुवातीला खूप घाबरायची, परंतु तो वाघ कायमचाच माणसांच्या वस्तीत येऊन राहिल्याने त्यांची भीती कमी झाली. मग ते वाघाला शेजारी घेऊन झोपू लागले. परंतु वाघच तो, एकेकाला शक्तीने नव्हे युक्तीने गोडीत खाऊ लागला. हळूहळू सगळी वस्ती कमी झाली तरी माणसं म्हणत होती, ‘तो वाघ काही नाही करत रे !’ तशी सगळया महाराष्ट्रातील जनतेची गत झाली आहे, कोणीही कोरोनाला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. स्वतःच्या घरात जोपर्यंत कोरोना घुसत नाही व पैसे देऊन आक्कल विकत घेत नाही ; तोपर्यंत एकालाही शहाणपण सुचणार नाही. लॉकडाऊन असूनही लॉकडाऊन नसल्यासारखे लोक वागत आहे. आपलं कोणी गेलं नाही ना ! असा संकोचित विचार करून बेफिकरीने वागत आहे, परंतु असे हलगर्जीपणाने वागणे म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे आहे. विनाकारण स्वतःच्या चुकीने आपण डॉक्टर मोठे करत आहोत व आपली जमापुंजी त्यांच्या घशात घालत आहोत. अशा वेळी राजकारणी सोडा रक्ताचीही माणसं उभी राहत नाही. तेव्हा कोरोना कोणीही हलक्यात घेऊ नये हे कळकळीचे सांगणे आहे, नाहीतर गोष्टीतील वाघासारखा कोरोना आपला केव्हा घास घेईल कळणार नाही. तेव्हा स्वतःसह कुटुंबाला कोरोनापासून वाचवावे व सुरक्षात्मक काळजी घेत लसीकरण करून घ्यावे, सामान्य जणांसाठी हाच काय तो बुडत्या जहाजाला काडीचा आधार आहे, नाहीतर आपल्या चुकीची किमंत आपल्याला मोजावी लागेल....   

संजय द. गोराडे (नाशिक)
मो. नं – ९८५०६९१२१६                     
  

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...