सोमवार, 19 अप्रैल 2021

असंवेदनशीलतेचे दर्शन

असंवेदनशीलतेचे दर्शन  

कोरोना गेला असे वाटत असताना पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि सुधारत असलेलं माणसाचं जीवनमान पुन्हा विस्कळीत झाले. आज महाराष्ट्रात हजारोच्या संख्येने दिवसाला कोरोना रुग्ण सापडत आहे. सरकारी व खाजगी सर्व रुग्णालय कोरोनाग्रस्त रुग्णांनी खचाखच भरले आहे. बेड मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर रुग्णालयाच्या आवारात रुग्ण उपचार घेत आहे. लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही आहेत. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत दोनदोन दिवस थांबावे लागत आहे. एकीकडे असे भयावह चित्र असताना दुसरीकडचे चित्र मात्र असंवेदनशीलतेचा कळस करणारे पहायला मिळते आहे. त्यात पहिला नंबर लागतो डॉक्टरांचा, दुसरा नंबर राजकारण्याचा आणि तिसरा नंबर हलगर्जीपणाने वागणाऱ्या लोकांचा. 


धन्वंतरीचा वारसा चालणारे डॉक्टर आज कोरोना काळात खरोखर प्रामाणिक सेवा देत आहे ? कधीकाळी देव वाटणारे डॉक्टर आज का कुणास ठाऊक गिधाडाच्या अवलादीची वाटू लागली आहे. गिधाडे तरी मेलेली जनावरे खातात. डॉक्टर रुपी गिधाडे जिवंत माणसाला अर्धमेले करून त्याच्या टाळूवरचे लोणी खात आहे. इतकी कशी संवेदनशीलता मारून टाकली आहे ! मान्य आहे डॉक्टर जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देतात. म्हणून कसायाप्रमाणे रुग्णाचा गळा आर्थिक सुरीने कापणार ! मोठ्या अपेक्षेने रुग्ण हॉस्पिटलची पायरी चढतात. त्यांचा स्कोर आणि ऑक्सिजन सामान्य माणसांप्रमाणे असतो, परंतु ते कोरोनाने बाधित असतात. त्यांना जुजबी गोळ्या औषधे व मानसिक आधार दिला तरी ते बरे होणारे असतात. परंतु चालू आलेली शिकार जिवंत सोडतील ते डॉक्टर कसले. काही डॉक्टर चांगलेही असतील. पण गव्हात खडे नसून खड्यात गहू तसे आहेत. 

डॉक्टरांनी आपल्या सेवेचा धंदा केला आहे. आज दवाखान्यात रुग्ण अॅडमिट झाला की कमीतकमी एक लाख रुपये बिल निघते. मग त्या रुग्णाची बिल भरण्याची कुवत आहे की नाही याच्याशी अजिबात घेणेदेणे नसते. एक दिवसाचे रुग्णालयाचे चार्जेस कमीतकमी सात हजार रुपये आहेत. मेडिकलचा खर्च वेगळा. त्यात रेमडीसिवीरचे इंजेक्शन नसतानाही काही रुग्णालयात रुग्ण अॅडमिट करून घेतात आणि रेमडीसिवीरचे इंजेक्शन काळ्या बाजारातून आणायला सांगतात. वर काळ्या बाजारातून इंजेक्शन आणायचे संपर्क क्रमांकही तेच सुचवतात. आधीच परिस्थितीने हवालदिल वर्षापासून तग धरून आहे ; त्यात कोरोना होणं म्हणजे भिकेस लागण्यासारखे आहे. अशा प्रसंगी पैसाच सर्वस्व न मानता डॉक्टरांनी माणूसपणाला काळिमा फासणारी कृत्य कुठेतरी थांबवली पाहिजे, थोडेसे माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. कधीकाळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात एक कौटुंबिक विश्वासाचे नाते होते. सर्व सामान्यासाठी देव असलेल्या डॉक्टरांनी या विश्वासाचा घात करू नये इतके सांगणे.  


कोरोनासारखी महामारी संबध जगावर ओढवली असताना सर्वात गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात केलं जात आहे. तीन पक्ष सत्ता टिकवण्यासाठी तर एक पक्ष सत्ता मिळविण्यासाठी भांडत आहे. कुणालाच महाराष्ट्राच्या जनतेशी घेणेदेणे नाही. यात दोघांचे भांडण तिसऱ्याचे नुकसान होते आहे. नहाग निरपराध जनता यांच्या भांडणात भरडली जात आहे. केंद्र सरकार म्हणते आम्ही लसी पाठवल्या आहेत, राज्य सरकार म्हणते आम्हाला लसी मिळाल्या नाहीत. कोण खोटं बोलतं आणि कोण खरं बोलतं तेच कळत नाहीये. आतापर्यंत सचिन वाझे प्रकरणावर राजकारण चालू होते ; आता रेमडीसिवीर इंजेक्शनवर राजकारण चालू केले आहे. सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष दोघे एकमेकांना बदनाम करत आम्ही कसे जनतेचे कैवारी आहोत हे दाखवत आहे. खरंतर संपूर्ण देशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत. अशा वेळी कोणतेही राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन व स्वतःचा पक्ष विसरून जनतेचा मदतीसाठी धावून यायला हवे होते. परंतु तसे न होता सर्व पक्ष कुरघोडी करण्यात मग्न आहे. 

यात सर्वात अग्रेसर विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्ष हा महाराष्ट्र सरकारचा विरोधक आहे की महाराष्ट्रातील जनतेचा तेच कळत नाहीये. इतक्या वर्षाच्या राजकारणात कधी नव्हे इतका भयंकर विरोधी पक्षनेता महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळाला आहे, सत्ता नाही म्हणून जनतेला वेठी धरण्याचं राजकारण अगदी नीच पातळीचे आहे, एकीकडे महाराष्ट्र सरकारला कुच्छकामी ठरवत आम्ही केंद्राकडून मदत आणू म्हणायचे, दुसरीकडे महाराष्ट्राला कशी कमीतकमी मदत मिळेल म्हणून पडद्यामागे राजकारण करायचे हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दुधखुळी नाही आहेत. कोरोनावर संजीवनी ठरणाऱ्या रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा करणाऱ्या राजेश डोकानियाला सोडवण्यासाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे विरोधी पक्ष नेते जनतेच्या मदतीसाठी धावून आले असते तर महाराष्ट्रातील जनतेला अडचणीच्या काळात धावून येणारे नायक वाटले असते. परंतु पाण्याविना मासा तशी सत्तेविना भाजपची स्थिती झाली आहे. त्यांच्यातील खलनायकाला जनतेचे हाल दिसेनासे झाले आहे. अर्थात विरोधी पक्षनेते केंद्राच्या सांगण्यावरून तसे वागत असावे अशी कुठेतरी शंका येते आहे, नाहीतर महाराष्ट्रीय म्हणून त्यांच्या काळजाला पाझर फुटायला हवा होता. परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहेत. ती सगळे उघड्या डोळ्यांनी पाहते. जनतेच्या हा तळतळाट सूडबुद्धीने वागण्याऱ्या राजकारण्यांना नक्की भोगावा लागेल. आता या घडीला निष्पक्ष जनतेच्या मदतीसाठी धावून येणारा देव ठरेल, परंतु तेवढी सदसदविवेकबुद्धी असायला हवी.      

पुलावरून इतके सगळे पाणी वाहते आहे तरी जनतेचा हलगर्जीपणा मात्र कमी होताना दिसत नाहीये. जनतेची अवस्था गोष्टीतल्या वाघासारखी झाली आहे, एक वाघ माणसांच्या वस्तीत आला, तो वाघ पाहून माणसं सुरुवातीला खूप घाबरायची, परंतु तो वाघ कायमचाच माणसांच्या वस्तीत येऊन राहिल्याने त्यांची भीती कमी झाली. मग ते वाघाला शेजारी घेऊन झोपू लागले. परंतु वाघच तो, एकेकाला शक्तीने नव्हे युक्तीने गोडीत खाऊ लागला. हळूहळू सगळी वस्ती कमी झाली तरी माणसं म्हणत होती, ‘तो वाघ काही नाही करत रे !’ तशी सगळया महाराष्ट्रातील जनतेची गत झाली आहे, कोणीही कोरोनाला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. स्वतःच्या घरात जोपर्यंत कोरोना घुसत नाही व पैसे देऊन आक्कल विकत घेत नाही ; तोपर्यंत एकालाही शहाणपण सुचणार नाही. लॉकडाऊन असूनही लॉकडाऊन नसल्यासारखे लोक वागत आहे. आपलं कोणी गेलं नाही ना ! असा संकोचित विचार करून बेफिकरीने वागत आहे, परंतु असे हलगर्जीपणाने वागणे म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे आहे. विनाकारण स्वतःच्या चुकीने आपण डॉक्टर मोठे करत आहोत व आपली जमापुंजी त्यांच्या घशात घालत आहोत. अशा वेळी राजकारणी सोडा रक्ताचीही माणसं उभी राहत नाही. तेव्हा कोरोना कोणीही हलक्यात घेऊ नये हे कळकळीचे सांगणे आहे, नाहीतर गोष्टीतील वाघासारखा कोरोना आपला केव्हा घास घेईल कळणार नाही. तेव्हा स्वतःसह कुटुंबाला कोरोनापासून वाचवावे व सुरक्षात्मक काळजी घेत लसीकरण करून घ्यावे, सामान्य जणांसाठी हाच काय तो बुडत्या जहाजाला काडीचा आधार आहे, नाहीतर आपल्या चुकीची किमंत आपल्याला मोजावी लागेल....   

संजय द. गोराडे (नाशिक)
मो. नं – ९८५०६९१२१६                     
  

बुधवार, 14 अप्रैल 2021

लाल दिनांक (बाल कथासंग्रह)

संस्कार पेरणारा बाल कथासंग्रह : लाल दिनांक 
       लेखक - नागेश सू. शेवाळकर

लहान मुलाचं एक आगळंवेगळं विश्व असतं, जे माया लावतील ; ते त्यांना आपलेसे वाटतात. त्यांच्या मनात कधीच आपपरभाव नसतो. ते क्षणात रुसतात तर क्षणात गोड होतात. त्यांच्याकडे भन्नाट कल्पना असतात. त्या कल्पना वास्तवात उतरवणं कधीकधी वडीलधाऱ्यांसाठी अशक्यप्राय असतं. तरी त्या कल्पना अलवार जपत नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या, कौटुंबिक जिव्हाळ्यावर आधारित लहान मुलांचे विश्व उलगडून सांगणाऱ्या संस्कारक्षम कथा म्हणजे लेखक नागेश सू. शेवाळकर लिखित ‘लाल दिनांक’ कथासंग्रह होय. 

‘लाल दिनांक’ कथासंग्रहात पंधरा कथा आहेत. पहिली कथा ‘आमच्या मिस... आजी !” या कथेत स्माईल इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारा समीर शाळेतील हॉलीबॉल, फुटबॉल, रिंग, सायकल, घसरगुंडी, झोका, घोडा, कार या खेळांत रमत नाही. या अद्ययावत खेळांपेक्षा त्याला आजीने शिकवलेले जुने खेळ आवडतात. आजीने शिकवलेला ‘मामाचं पत्र हरवलं’ हा खेळ शिक्षक त्याच्याकडून समजून घेतात व मुलांना खेळायला लावतात. ‘मामाचं पत्र हरवलं’ हा खेळ बाकी मुलांनाही खूप आवडतो. जुन्या काळातील या खेळाबाबत मुलांची आवड पाहून मुख्याध्यापिका समीरच्या आजीलाच शिक्षिका म्हणून शाळेत नेमतात. त्या आजी मुलांना त्यांच्या काळातील लोप पावत चाललेले खेळ, संस्कारगीतं, बडबडगीतं शिकवतात. अशी जुन्या काळातील खेळांबाबत गोडवा निर्माण करणारी व वाचकास वेगळं काहीतरी सुचवणारी कथा आहे. 

वास्तवाची जाण नसलेले मुलं कल्पनेच्या जगात विहार करणारी असतात. मग त्यांना गोष्टीतील परीलाही भेटण्याची इच्छा झाली तर नवल वाटू नये. परंतु या संग्रहात वाचण्यात आलेली ही ‘परीकथा’ ह्रदयाचा ठोका चुकवणारी आहे. प्रकाश नावाचा चार वर्षाचा मुलगा आईकडे परीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. त्याची आई त्याला वास्तवाची जाण करून न देता त्याच्या कल्पनेला आणखी पंख देण्याचे काम करते. पुढे प्रकाशला बहीण होते. तिचं नाव परी ठेवलं जातं. आपल्या घरात परीने जन्म घेतला म्हणून त्याला खूप आनंद होतो. परंतु ही परी कल्पनेतील परीप्रमाणे आकाशात उंच उडत नाही पाहून तो नाराज होतो. पुढे जो थरार घडतो तो अंगावर काटा आणणारा आहे. ही कथा वाचकाच्या कायम स्मरणात राहणारी आहे. 

सुट्टी म्हटलं की मुलांचा आनंदाचा दिवस. सुट्टीच्या दिवशी आईवडिलांनी अजिबात अभ्यास करायला सांगू असे त्यांना वाटते. मंगेश पाडगांवकराचं छान बालगीत आहे, ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय... शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय...!’ असेच ‘लाल दिनांक’ या शीर्षक कथेतील युवराजलाही शाळेत जावेसे वाटत नाही. तो दररोज कॅलेंडरवरील लाल तारखा पाहतो. लाल तारीख असली की शाळेला सुट्टी असते असा त्याचा समज असतो. शाळेत जायचा कंटाळा येतो म्हणून तो कॅलेंडरवरची तारीखच लाल पेनने रंगवतो. एका महिन्यात सुट्टीच्या लाल तारखाच नाही पाहून तो चक्क वडिलांना लाल तारखांचे कॅलेंडर आणायला लावतो. अशी गंमतीशीर शीर्षक कथा ‘लाल दिनांक’ वाचताना नकळत हसू येते.  

‘पंख मायेचे, वाढदिवस सचिनचा, श्यामची पत्रावळ, प्रोत्साहन, आठवण एका करामतीची, विश्वास जिंकला श्रावणबाळ, बक्षिसाची किमया, ओळखपत्र, पत्र बाप्पाचे, एक वाढदिवस असाही, नातू माझा भला’ अशा एकूण पंधरा कथा ‘लाल दिनांक’ कथासंग्रहात आहेत. लेखक नागेश सू. शेवाळकर यांनी बच्चेकंपनीचे भावविश्व नेमके चितारले आहे. यातील अधिकत्तर कथा आजी आणि नातू या नात्यांभोवती गुंफल्या गेल्या आहेत. त्यांच्या कथा कल्पनेत रमवणाऱ्या नसून भवतालचे वास्तव अवगत करून देणाऱ्या आहेत. ज्या छोट्यांना प्रेरणा व मोठ्यांनी छोट्यांशी कसं वागलं पाहिजे याचे भान देणाऱ्या आहेत. हा कथासंग्रह सोहम क्रिएशन अँण्ड पब्लिकेशन पुणे प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून मुखपृष्ठ अमेय देशपांडे यांचे आहे. असा हा संस्कार पेरणारा बाल कथासंग्रह नक्कीच वाचनीय झाला आहे असे वाचक म्हणून वाटते. लेखक नागेश सू. शेवाळकर सर यांना पुढील लेखनास शुभेच्छा. 


आस्वादक - संजय द. गोराडे (नाशिक)
मो. नं - ९८५०६९१२१६    

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...