गुरुवार, 18 मार्च 2021

कथा वास्तवातल्या (कथासंग्रह)


‘कथा वास्तवातल्या’ कथासंग्रह वाचताना लेखक प्रा. विजय काकडे छोट्याछोट्या घटनांकडे किती संवेदनशील नजरेने पाहतात याची प्रचिती येते. हलकेफुलके पण तितकेच मनाला भिडणारे विषय घेऊन लेखकाने वास्तवातल्या कथांना शब्दरूप देऊन कागदावर साकार केले आहेत. जे प्रसंग नित्य आपल्या अवतीभवती घडत असतात, पण त्याकडे आपण कधीच डोळे उघडे असूनही पाहत नाही, मात्र लेखक अशा घटनांकडे खूप गांभीर्याने पाहतात. घटना लहान असली तरी त्यात प्रबोधन करणारे खूप मोठे कथानक त्यांना गवसताना दिसते आहे. जे स्वतःमध्ये परिणामी समाजामध्ये परिवर्तन घडविणारे आहे. 
या कथासंग्रहात एकूण बाबीस कथा आहेत. सर्व कथांच्या घटना त्यांनी स्वतः अनुभवलेल्या व पाहिलेल्या आहेत, ज्या कल्पनेने किंवा लालीत्याने फुलवलेल्या नसून वास्तवातल्या कथा आहेत, म्हणून त्यांनी कथासंग्रहाला ‘कथा वास्तवातल्या’ हे शीर्षक दिले आहेत. जे कथासंग्रह वाचताना खूप सार्थ वाटते. आजकालची पिढी ही वास्तवात जगणारी पिढी आहे, त्यांना कल्पनेत जगायला बिलकुल आवडत नाही, याचं नेमकं भान असलेल्या लेखक प्रा. विजय काकडे यांनी आपल्या जीवनातील चांगल्या-वाईट वेगवेगळ्या घटना कथारूपाने उभ्या केल्या आहेत. ज्या वाचकाला आपल्याशा वाटणाऱ्या आहेत. 
‘आपली माणसं’ या कथेत सुखात गुळाला मुंग्या चिटकाव्या तशी माणसं चिटकतात, मात्र तीच दुःखात आपल्याकडे पाठ वळवतात, आर्थिक नाही तर साधा मानसिक आधार द्यायलासुद्धा पुढे येत नाही, तेव्हा कळते आपली माणसं कोणती आणि परकी माणसं कोणती ; मित्रावर ओढावलेल्या प्रसंगातून लेखकाने आजच्या आपमतलबी मानसिकतेचे नेमके दर्शन घडवले आहे.
‘सावित्री’ कथेत गरोदर सावित्रीला कोरोनाची लक्षणे दिसतात, पती संपत व त्याची आई तिला कुठलीही शहानिशा करता कोरोना पॉजिटिव्ह ठरवून मोकळे होतात व लगेच वाळीत टाकावे तसे विलग करतात, तिला खायला देत नाही की दवाखाना घेऊन जात नाही, परंतु दैवाचे फासे असे फिरतात की ; ती निगेटिव्ह व पती आणि सासू पॉजिटिव्ह निघतात. सावित्री मात्र नावाप्रमाणेच सावित्री असते, ती उलट पती आणि सासूची खूप शुश्रुषा व दवाखाना करते, अशी कोरोनावर आधारित ‘सावित्री’ नावाची खूप छान कथा वाचायला मिळते. लेखकाने या कथेला छान कलाटणी दिली आहे. 
‘ज्ञानेश्वरी’ कथेत ज्ञानेश्वरी नावाची एक हुशार विद्यार्थीनी आहे, ती एफ वाय बी एस सीला आहे, ती परीक्षेत फस्ट क्लासमध्ये पास होणार अशी कॉलेजाच्या शिक्षकांना आणि आईवडिलांना खात्री असते. पण अचानक अनपेक्षितपणे ती नापास होते. तो धक्का ज्ञानेश्वरीला सहन होत नाही आणि ती जे नको करायला हवे तेच करते. हा प्रकार निकालाच्या काळात सर्रास ऐकायला व पहायला मिळतो. अशा नैराश्यातून झालेल्या आत्महत्या पालकांप्रमाणे शिक्षकांनाही किती वेदना देणाऱ्या असतात हे ‘ज्ञानेश्वरी’ कथेतून लेखकाने सांगितले आहेत. 
‘कोविड १००’ ही एक विज्ञान कथा आहे, कोरोनाने सगळे जग बंदिस्त केलेले असताना दुसरीकडे लोक उपासमारीने मरत आहे, घराबाहेर पडले तर कोरोनाग्रस्त होऊन मरायचं आणि घरात थांबलं भुकेने मरायचं ; अशा सततच्या बातम्यांनी बालमनावर किती विपरीत परिणाम होतो हे या कथेतून लेखकाने खूप ताकदीने उभे केले आहेत, ही पुरस्कारप्राप्त कथा असून वाचकांच्या अंगावर रोमांच उभे करणारी आहे. 
खटारा गाडी, लेखकाची किंमत, छत्री, नानीचा निर्णय, मदिरेचा प्रवास, मनीषबाबू, कौटुंबिक सुख, पितृ अमावास्या अशा विविध विषयांवर या कथासंग्रहात बाबीस कथा आहेत, ज्या लेखकासह तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातल्या कथा आहेत. प्रत्येक कथेची मांडणी विषयाला धरून केलेली आहे, कुठेही पाल्हाळीकपणा आढळत नाही, प्रत्येक कथेतून लेखकाने सूचक असा वास्तवाची जाणीव करून देणारा बोध दिला आहे, जे लेखकाचे एक शक्तीस्थान वाटते, सोशल मिडीयावर या कथांना वाचकांनी भरभरू प्रेम दिले आहेत तेच आभासी जगातले प्रेम भासी जगात ‘कथा वास्तवातल्या’ या पुस्तकाला द्याल अशी मी अपेक्षा करतो व आवाहनही करतो, नक्कीच वाचकांच्या प्रेमाला खरा उतरणारा हा कथासंग्रह आहे, लेखक प्रा. विजय काकडे यांच्याकडून अशीच उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होत राहील अशा शुभेच्छा देतो.  धन्यवाद. 


कथासंग्रह - कथा वास्तवातल्या (भाग -१)
लेखक - प्रा. विजय काकडे
प्रस्तावना - संजय गोराडे (कथा/कादंबरी लेखक)
प्रकाशक - रंगतदार प्रकाशन
मूल्य - १५०/-

पुस्तक परिचय :-
संजय द. गोराडे (नाशिक) 
मो. नं - ९८५०६९१२१६      

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...