सोमवार, 15 मार्च 2021

निर्णय (कथासंग्रह)


वाचकाचे प्रबोधन करणारा 'निर्णय' कथासंग्रह

“निर्णय” म्हणजे एक धाडसच होय.
प्रत्येकाला आयुष्यात पदोपदी वेगवेगळे निर्णय हे घ्यावेच लागतात. काही निर्णय आपल्याला सुखावून जातात तर काही दुखावून जातात. काही निर्णय आपल्याला सफल करतात, तर कधी कधी घेतलेले निर्णय विफलही करतात. परंतु माणसाला आयुष्यात निर्णय घेणे अपरिहार्यच आहे हे नक्की. निर्णय घेतांना शक्यतो आपण तो आपल्या सदविवेकबुद्धीला पटेल असाच घेत असतो. अर्थातच ज्या परिस्थितीत तो निर्णय घेत असतो त्यात त्या परिस्थितीचे योग्य ते विश्लेषण केलेलं असतच. कधी कधी एखाद्या निर्णयावर येण्यासाठी तेवढा वेळही हाती नसतो आणि असलाच तर त्यावेळेस काही सुचेलच असेही नसते. पण निर्णय तर घ्यावाच लागतो. चांगला अथवा वाईट, जो काही असेल तो निर्णय घ्यावाच लागतो आणि नियतीचा तसाच रेटाही असतो. एक मात्र नक्की की, आपण घेतलेले निर्णय जर पूर्वग्रहदुषित नसतील आणि आपल्या सदविवेकबुद्धीला पटलेले असतील व तितक्यात अंतर्मनाने घेतलेले असतील तर ते निर्णय कधीच चुकत नाहीत. त्या त्या काळात ते घेतलेले निर्णय हे योग्यच असतात. कालांतराने जर का ते आपल्याला अयोग्य अथवा चुकीचे वाटत असतील तर तो त्या निर्णयाकडे पूर्वगृहदुषित होऊन बघण्यातला दोष आहे असे मला तरी वाटते.
तुम्हीं म्हणाला की अहो कामठे एवढे तत्वज्ञान कशाला पाजळताय ! जे काही असेल ते जरा स्पष्टच सांगा ना ! अगदी बरोबर ओळखलंत मित्रांनो. त्याचं कारण ही अगदी तसचं आहे. १९ ऑक्टोबर २०१९ ला चपराकच्या साहित्य महोत्सव २०१९ मध्ये चपराक दिवाळी अंकाबरोबरच अजून आठ पुस्तकांचे डॉ. प्र. चिं. शेजवलकर सर आणि पंडित वसंतराव गाडगीळ ह्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यात नाशिकचे लेखक श्री. संजय गोराडे ह्यांच्या “निर्णय” ह्या कथासंग्रहाचेही प्रकाशन झाले. नुकताच हा कथासंग्रह मी वाचला आणि त्यावर माझे मनोगत व्यक्त करण्याची सुप्त इच्छा झाली म्हणून हा लेख प्रपंच.
“कोणत्याही घटनेबाबत, धोरणांबाबत आयुष्यात ज्याला निणर्य घेता येतो त्याची यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते” असे एक वाक्य चपराक प्रकाशन चे संपादक श्री. घनश्याम पाटील सरांचे ह्या पुस्तकाची पाठराखण (ब्लर्ब) वर वाचले आणि ह्या पुस्तकाबद्दलची उत्कंठा वाढली.
त्यात ह्या पुस्तकाला “वाचकांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या कथा” अशी अतिशय समर्पक प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक आणि संशोधक, लेखक श्री. संजय सोनावणी ह्यांची लाभली आहे म्हटल्यावर ह्या पुस्तकाचे साहित्यमूल्य निश्चितच वाखाणण्याजोगे असणार ह्यात शंकाच नव्हती.
ह्या कथासंग्रहात एकूण आठ कथा अशा काही प्रसंगावर अथवा घटनांवर आधारित आहेत की ज्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात कधी ना कधी घडतच असतात किंवा आपल्या आसपास तरी घडलेल्या असतात. ह्या कथानकातून लेखक संजय गोराडे वाचकांना अतिशय समर्थपणे त्यांच्या लेखन शैलीने भारावून टाकून अगदी कथेत समरस करून टाकतात. ह्या कथा वाचतांना आपण इतके एकरूप होऊन जातो की काही काळ तो प्रसंग अथवा ती घटना आपल्याच बाबतीत घडलेली आहे असे वाटते. कथा वाचता वाचता एकवेळ तर असे वाटते की मी जर ह्या जागी असतो ना तर असाच काहीसा निर्णय घेतला असता ! वगैरे वगैरे. त्यांमुळेच ह्याचे सर्व श्रेय संजय गोराडे ह्यांना निर्विवादपणे द्यायला हवे.
“निर्णय” ही कथा तर आकस्मितपणे आयुष्याच्या एका टप्यावर आलेले अनोखे वळणच ! त्या वेळेस योग्य तो निर्णय घेतांना नात्यात आलेला ताण तणाव, संकोच, अपराधीपणाची भावना इत्यादी संजय गोराडे ह्यांनी अतिशय खुबीने लिहून वाचकांना अंतर्मुख केले आहे.
“बळीराजा” ही कथा तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची झालेली वाताहत व त्याला आत्महत्येला प्रवूत्त करणाऱ्या आपल्या समाज संस्थेला दिलेली एक चपराकच आहे. काळीज हेलावून टाकते ही कथा.
“संगत” ही कथा तर सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याला लागलेली एक कीडच व्यक्त करतांना समाज प्रबोधनही करून जाते.
“मोहमाया” ह्या कथेतून लेखकाने माणसाच्या अभिलाषी वृत्तीची अतिशय छान ओळख करून देवून अशा वृत्तीचे दुष्परिणाम दाखवून आयुष्यात निर्णय घेतांना किती गोष्टींचा विचार करायचा असतो हे सादोहरण दाखवले आहे.
“बीज” ह्या कथेतून लेखकाने अतिशय वेगळ्या समस्येवर प्रकाशझोत टाकून एक वेगळाच विषय वाचकांसमोर मांडला आहे व त्यावर विचार करायला भाग पाडले आहे.
“लोकल” ह्या कथेने कितीही कठोर माणूस असला तरी हळवा झाल्याशिवाय रहात नाही. इतकी भावविवश करणारी आणि अक्षरश: डोळ्यातून अश्रू वाहण्यास लावणारी ही कथा म्हणजे कितीही प्रतिकूल परिस्थितीत माणूस असला तरी जर का त्याचे कुटुंब त्याच्या बरोबर असेल तर तो कितीही कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकतो हे प्रतिबिंबित करण्यात संजय गोराडे ह्यांच्या लेखणीला निश्चितच यश आले आहे.
“कोन” ही कथा आयुष्यात आपल्या जोडीदाराला गृहीत धरून चालल्यावर ज्या काही समस्या उदभवतात त्यावर कसा तोडगा निघतो व योग्य तो निर्णय कसा घेतला जातो हे ही कथा वाचल्यावर कळते.
शेवटी, “बहुगुण” ही कथा “निर्णय” ह्या कथेशीच एकरूप होणारी आहे.
एकंदरीत संजय गोराडे ह्यांच्या सर्वच कथा अतिशय वाचनीय तर आहेतच परंतु त्या वाचकाला खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होतात त्याच बरोबर ह्या कथांमधून अप्रत्यक्षरीत्या एक प्रकारचे समाज प्रबोधनही होते आहे असे मला अतिशय प्रकर्षाने जाणवले.
श्री. अरविंद शेलार ह्यांचे अतिशय सुंदर व विषयाला साजेसे मुखपृष्ठ ह्या पुस्तकाला लाभले आहे.
श्री. संजय गोराडे ह्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेछ्या देतो. तसेच चपराक प्रकाशन चे सर्वेसर्वा श्री. घनश्याम पाटील सरांना ह्या उत्तम साहित्य संपदेबद्दल धन्यवाद देतो.

वाचकांनो हे पुस्तक जरूर विकत घ्या आणि वाचा व आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना, नातेवाईकांना भेट द्या. हे पुस्तक “चपराक”च्या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध आहे:
http://shop.chaprak.com/product/nirnay/ 

कथासंग्रह - निर्णय
प्रकाशक - “चपराक प्रकाशन” 
लेखक – संजय गोराडे 
मूल्य : रू १३०/- 

पुस्तक परिचय - लेखक रवींद्र कामटे (पुणे)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...