मंगलवार, 16 मार्च 2021

उंबरगुज (ललितसंग्रह)


उंबरगुज (ललितसंग्रह)

नंत चौधरी एक मितभाषी व्यक्तिमत्त्व, तसे म्हणायला ते मितभाषी आहेत, कारण मितभाषी माणसं वास्तविक पाहता मनोमन स्वतःशी खूप बोलत असतात, सतत ती स्वतःशी संवाद साधत असतात, अशी स्वतःशी संवाद साधणारी माणसं खूप संवेदनशील व चिंतन करणारी असतात. ती छोट्याछोट्या गोष्टीत स्वतःला त्याच्या ठिकाणी पाहत भोवतालचं विश्व समजून घेत असतात. प्रत्येक सजीव निर्जीवासोबत गुजगोष्टी करत असतात. त्याचाच आविष्कार म्हणजे लेखक अनंत चौधरी यांचा ललितसंग्रह ‘उंबरगुज’ होय. 
माळावर, रानात, जाळीत पोसलेल्या पिकलेल्या फळांचं हितगुज स्पष्ट करणारा ‘उंबरगुज’ पुस्तकातील पहिलाच ललितलेख रसरसीत फळांची ओळख सांगणारा आहे. करवंद, उंबरं, आळवांनी, तोरणांनी अशा गारसलेल्या पिकलेल्या फळांचा आस्वाद घेण्याची इच्छा लेखकाच्या शब्दांनी जागृत केली तर नवल वाटू नये. तेवढी ताकद ललितलेख वाचताना लेखकाच्या प्रतिभासंपन्न लेखनीत नक्कीच असल्याचे जाणवते. विविध फळझाडांबरोबर उंबरगुज ललितलेखात उल्लेखलेलं उंबराचं झाड त्यांच्या विशेष आस्थेचे राहिले आहे. पिकलेल्या उंबराचा दरवळत असलेला उंबरवास, उंबराच्या झाडाखाली सगळीकडे पसरलेला उंबरसडा, लाल मुंग्याची उंबराच्या झाडावर वरखाली ये-जा, मधेच थांबून दोन मुंग्या आपसात एकमेकींशी उंबराविषयी गुजगोष्टी करत असाव्या असं लेखकाला वाटणं, खरंच... लेखकाच्या नजरेने टिपलेल्या छोट्याछोट्या गोष्टी त्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवतात. काय बोलत असाव्या मुंग्या ! दोन मुंग्या एकमेकींजवळ थांबून नक्कीच कसली तरी देवाणघेवाण करत असाव्यात. अपघात झाला तरी मदतीचा हात न देणार्‍या काळात किड्यामुंग्याच्या भावविश्वाचा विचार करणारा लेखक किती कोमल मनाचा आहे हे संग्रहातील पुढील लेख वाचतानाही प्रकार्षाने जाणवते. त्यांना उंबर आजोबा तर मुंग्या नाती वाटतात. नातीप्रमाणे मुंग्या हळू आवाजात बोलत आहे, तर उंबर आजोबाप्रमाणे त्यांच्या गुजगोष्टी कान लावून ऐकत आहे, असं आस्था जडलेलं उंबराचं जीर्ण झालेलं झाड पाहून लेखकाच्या बालपणीच्या आठवणी आजही ताज्या होतात. बालपणी उपभोगलेली फळभाराची श्रीमंती, रानवैभव, फळणे, फुलणे, पिकणे सारंसारं आज नाहीसे झालेलं आहे, आज प्रगतीच्या नावाखाली सरार्स झाडांवर कुर्हाड चालविली जाते. चाखलेला फळाफुलांचा गंध-वासाला कायमचे मुकले जाण्याची भीती अखेर लेखक व्यक्त करतात. 
‘मामाची गुरं’ या लेखात लेखक शिकण्यासाठी म्हणून मामाच्या गावी आलेले आहे, बालवयात मामाच्या गावी शिक्षणाच्या बदल्यात काय-काय कामे करावी लागत असे, त्या आठवणींना त्यांनी या लेखात उजाळा दिला आहे. बालपणी शिकावं म्हणून शाळेत पाटीदप्तर कमी आणि गुरांमागे काठी-घोंगडेच जास्त घेऊन लागत असे. कधी-कधी नको वाटत असे त्यांना ते जीवन. गोठ्यातील शेणसडा काढणे, रानात गुरे चारायला घेऊन जाणे, थकलेलं जनावर हाकालणे, उधळलेलं जनावर वळून आणणे, यामुळे त्यांची फजिती होत ते रडकूंडीला येत असे. परंतु जनावरं वळत-वळतच शिक्षण घ्यावं लागणार आहे वस्तुस्थिथी कळल्यावर मात्र ते अजिबात तक्रार न मामाची गुरं वळतानाचे अनेक गंमतीदार अनुभव सांगतात, त्यातच त्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षाही जीवनाचे अनमोल ज्ञान मिळते. त्याचेच फळ ते आज शहरातील संमृद्ध जीवन जगत आहे. बालपणीच्या त्या आठवणी लिहिताना मात्र लेखकाला तेच दिवस सुगीचे वाटतात. कारण तेव्हाची रानावनाची गोडी, रानातील गाणी, पक्षांची दाद, निसर्गाची भरभरून साद, झाडा-झुडपाची, वन औषधाची ओळख, पायवाट तुडवणं, बागडणं सारं सारं आता दुरापास्त झाले आहे. म्हणून लेखकाला आजचे सुखसीन जीवन बालपणीच्या जीवनाइतके संमृद्ध वाटत नाही.  
‘अंगण’ प्रत्येकाला आपलासा व भावणारा ललितलेख, जो प्रत्येकालाच स्वतःचे अंगण पारखे झाल्याची जाणीव करून देतो. घरापुढेचे अंगण ज्याच्या आपण इतक्या गहनतेने विचार करत नाही जितका घराचा करतो. घर बांधताना ते अमूक पध्दतीने असावं तमूक पध्दतीने असावं असा खूप अभ्यास व विचार केला जातो. पण अंगण... ज्याच्याविना घराला शोभा नाही ते मात्र अभ्यासाशिवाय तयार केले जाते. असं दुर्लक्षित असलेलं पण घराचं घरपण जपणारं अंगण लेखकाने त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनीतून सुबक व सुंदर रेखाटले आहे, जे लेखकाइतकेच प्रत्येकाच्या जीवनातील जिव्हाळ्याचे व महत्वाचे आहे. घरासमोरचे अंगण... जेथे बालपणी अंघोळीचा पाट थाटला जातो, खेळत लहानाचे मोठे होतो, गोट्या आणि कोयींचे डाव रंगतात, वयात आल्यावर अंगणात नजरानजर व इशारे केले जातात, बाहेरच्या मौल्यवान वस्तू घरात तर घरातील अडगळीच्या वस्तू अंगणात आणल्या जातात, भांडीकुंडी व कपडे धुण्यासाठी दगड अंगणात ठेवला जातो, धुतलेले कपडे, शेवया, कुराडया, पापड्या वाळत घालण्यासाठी अंगणच उपयोगाला येत असते. लग्नाचा मांडव व घरातील टोकाला गेलेलं भांडण अंगणातच उभे राहून केले जाते, असं इतर वेळी सावत्र असलेलं अंगण अप्रत्यक्षपणे किती महत्वाचं आहे हे लेखकाने खूप विस्ताराने व मार्मिक शब्दात सांगितले आहे, ‘घर आणि अंगण यात माणसाने जरी भेद केलेला असला तरी अंगणाला ठाऊक आहे, घरात जाणार्‍या प्रत्येक वस्तूंचा आणि माणसांचा मार्ग हा अंगणातून जातो, अंगणाला पाय लावूनच घरात पाऊल पडत असतं.’ असे अंगणाशी असलेले ॠणानुबंध लेखकाने छान शब्दात विशद केले आहे, अशा बदलत्या काळानुसार माणसाच्या मनाप्रमाणे संकोचित झालेले अंगण पुढील पिढीसाठी ‘अंगणाविना घर पारखे’ अशी भीती लेखकाप्रमाणे वाचकाच्याही मनाला शिवते. 
अनंत चौधरी लिखित ‘उंबरगुज’ हा पहिला ललितसंग्रह आहे, तरी त्यांच्या लिखाणात कुठलेही नवखेपणाचे लक्षणे आढळत नाही. उलट वाचकास प्रेरणादायी ठरणारे आहे, संग्रहात एकूण सोळा ललित लेख आहे. सगळे ललितलेख त्यांच्या गत आयुष्यातील स्मृतींसोबत आजच्या परिस्थितीशी सांगड घालताना तफावत दर्शवणारे आहे. बालपणी सोसलेलं, भोगालेलं, अनुभवलेलं खडतर आयुष्य तरीही आज जगत असलेल्या आयुष्यापेक्षा सरस असल्याची खंत ते प्रत्येक लेखाच्या अंती व्यक्त करतात. अंतर्मुख करणार्‍या अशा या ललितसंग्रहाला जेष्ठ साहित्यिक विवेकजी उगलमुगले व विजयकुमारजी मिठे यांची प्रस्थावना आहे. कादवाशिवार प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केलेला असून अरविंदजी शेलार यांचे मुखपृष्ठ आहे तर आतील अक्षरजुळणी दीपक दंडवते यांची आहे. दोन पिढ्यांमधील भेद स्पष्ट करत माणसांचं माणूसपण जागं करणारा ‘उंबरगुज’ नक्कीच सर्वांनी वाचावा असा आहे. त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा.  


ललितसंग्रह - उंबरगुज
लेखक - अनंत चौधरी
प्रकाशक - कादवा शिवार
मूल्य - 

************

पुस्तक परिचय :- 
संजय द. गोराडे (कादंबरी लेखक)
मो नं - ९८५०६९१२१६ 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...