मंगलवार, 16 मार्च 2021

उजेड पेरत जातो (कवितासंग्रह)


अंधारलेल्या आयुष्यांना प्रकाशाचा किरण देऊ पाहणार्‍या कवी राज शेळके यांच्या ‘उजेड पेरत जातो’ काव्यसंग्रहातील कविता म्हणजे नैराश्याने ग्रासलेल्यांना जगण्याकरिता सकारात्मक संजीवनी देणार्‍या आहे. खचलेल्यांना आधार देऊ पाहणारा हा कवी एका कवितेत म्हणतो, 

ही जगण्याची कैसी शर्यत
चढावयाचे शंभर पर्वत
अन थकण्याची नाही सवलत
हिंमत जपून ठेवा

जगण्याच्या शर्यतीत सुखदुःखाचे असंख्य पर्वत पार करायचे आहे, तेव्हा थकून चालणार नाही, श्वास चालू आहे तोवर हिंमत जपून ठेव. हलक्या फुलक्या शब्दात वाचकाला सहज समजेल अशा भाषेत कवी आपले विचार किती अलवार मांडताना दिसतो. प्रतिकं आणि प्रतिमांचा भडिमार न करता सरळ रोजच्या जगण्याला कविताचा आकार देत जातो. 

भूतकाळाच्या समिधा टाकून
यज्ञ कधी धगधगला का ?
दुःखाच्या खपल्यांना काढून
कुणी सुखाने जगला का ?

घडून गेलेल्या घटनेच्या विनाकारण खपल्या काढत राहणे व मनात संतापाचा अग्निकुंड पेटत ठेवणे यामुळे माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. कवीने या कवितेच्या शेवटच्या कडव्यात छान संदेश दिला आहे, ‘अक्कल खोटी, फोल पुरावे, व्यवहाराची गल्लत, शून्यामधून शून्य निघाला, ना बाकी ना शिल्लक’, घडून गेलेल्या गोष्टीवर उगाचच पुरावे देत राहणे, चुकीची गोष्ट कशी खरी आहे ते सांगत राहणे, परंतु शेवटी पदरी काय पडते ? एका अहंकाराचे खोटे समाधान. अशाच पध्दतीने कवी राज शेळके यांच्या लेखनीतून प्रसवलेल्या विविध कविता म्हणजे अहंकाराचा बुरखा पांघरलेल्या माणसाला वास्तवाचा आरसा दाखवणार्‍या आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.   

शब्दाच्या पाणवठ्यावर
अर्थाचे होते येणे
कवितेची घागर भरता
दुःखाचे होते गाणे

असा हा कल्पनेत न रमणारा कवी आपल्या कवितेतून वास्तव मांडत जगाचं दुःख प्रामाणिकपणे शब्दबध्द करताना दिसतो. प्राप्त परिस्थितीत दुःखीकष्टी न होता त्याला तोंड कसे द्यायचे हेही तो सांगतो. दुःखाचा तट भरून आला की तो आपूसकच भावनिक होतो अन गहिवरल्या मनात शब्दांची गर्दी व्हावी तशी त्याची कवितेची घागर भरून येते, व त्याचे शब्द आपसूकच दुःखाचे गाणे होते. अशा या हळव्या मनाच्या कवीला अंत व उदय या दोन्ही गोष्टींची जाण आहे, त्यामुळे तो निव्वळ दुःख न मांडता त्यावर उपायही सुचवतो, सकारात्मक ऊर्जा देणार्‍या या कवितासंग्रहाच्या शीर्षक कवितेत कवी म्हणतो,  

अंधाराच्या काठावर मी
मशाल ठेवत जातो
उजेड पेरत जातो
मी उजेड पेरत जातो

असा हा ‘उजेड पेरत जातो’ कवितासंग्रह नक्कीच वाचकाचं जगणं हलकं करणारा आहे, तो लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनीच वाचावा असा आहे. कारण लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच देहात परकाया प्रवेश करत कवीने कविता गुंफल्या आहे असे वाटते ; नव्हे तसे म्हटले तरी निरर्थक वाटू नये. कारण त्यांनी प्रत्येक वयोगटाची भुमिका तितक्याच कवितेतून आत्मितीयेने उभी केली आहे. त्यांची कविता समजायला जितकी सोपी आहे ; तितकीच सत्याची कास धरणारी आहे. असा कवी राज शेळके यांचा ‘उजेड पेरत जातो’ काव्यसंग्रह वैशाली प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला आहे. आत्मशोध घ्यायला लावणारा हा कवितासंग्रह नक्कीच वाचकाचे आत्मभान जागे करणारा आहे इतकेच वाचक म्हणून मला वाटते. साहित्यिक वाटचालीसाठी कवी राज शेलके यांना खूप खूप शुभेच्छा... !


कवितासंग्रह - उजेड पेरत जातो
कवी - प्रा. राज शेळके
प्रकाशक - वैशाली प्रकाशन
मूल्य -

पुस्तक परिचय :- 
संजय द. गोराडे (नाशिक)
मो नं - 9850691216

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...