शुक्रवार, 26 मार्च 2021

‘तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट





'वैयक्तिक- कौटुंबिक अनुभवांचे सहज सुंदर, वस्तुनिष्ठ व समृद्ध चित्रण'

‘तीर्थरूप’ वनवासी जीवनाची गोष्ट'

कादंबरी हा साधना व तपश्चर्येचा भाग असतो. कादंबरी लिहिण्यासाठी तुलनेने अधिक मेहनत, एकाग्रता आणि कसोटी लागते. कादंबरी लेखनात एकाच वेळी विविध व्यक्तिरेखा विशिष्ट पद्धतीने व वैविध्यपूर्ण प्रकारे हाताळाव्या लागतात. घटना- प्रसंग यांचे योग्य क्रम राखताना काही ठळक गोष्टी, निवडक घटना अधोरेखित कराव्या लागतात. हे करताना आशयानुसार लेखनाची शैलीही सांभाळावी लागते. विशेषतः पहिल्यांदाच कादंबरी लिहिणाऱ्या हातांसाठी कादंबरीच्या या विविध घटकांमध्ये समतोल साधणे अधिक आव्हानात्मक ठरते. ‘निर्णय’ कथासंग्रहाने मराठी साहित्यात स्वतःची विशिष्ट ओळख निर्माण करणारे नाशिक येथील कथाकार संजय गोराडे हे एक जाणकार साहित्यिक- संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. साहित्य व सांस्कृतिक उपक्रमांत विविध भूमिकांतून आणि सातत्याने वावरणारे मितभाषी लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. ते ‘तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट’ या पहिल्या कादंबरीतून मराठी वाचकांसमोर एका नव्या पद्धतीने व्यक्त होऊ पाहत आहेत.

 आत्मकथनात्मक स्वरूपाच्या या कादंबरीत त्यांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग नेमकेपणाने रेखाटले आहेत. मानवी आयुष्य कधीही एखाद्या रेषेसारखे साधे किंवा सरळ नसते. त्यात असंख्य खाच- खळगे, चढ- उतार, सुख- दुःखे असतात, किंबहुना या सगळ्यांमुळेच मानवी आयुष्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. माणूस म्हणून ज्या- त्या टप्प्यावर आपली जडणघडण होते. या पार्श्वभूमीवर मानवी जगण्यातील विविध आव्हानांची- त्यातील चढ- उतारांची व मानवी नातेसंबंधांतील आपले- परकेपणाची जाणीव ही कादंबरी आपल्याला नेमकेपणाने करवून देते. कळत्या वयापासून आयुष्याची चौरेचाळीस पाने उलटताना आलेले बरे- वाईट अनुभव लेखक म्हणून संजय गोराडे स्वतःशी प्रामाणिक राहात कौशल्याने कादंबरीत नोंदवतात. त्यामुळे त्यांनी मांडलेले वैयक्तिक अनुभव हे एकीकडे वाचकाला ‘वाचनानंद’ देतात त्यासोबतच ते वैयक्तिक न राहता समूहाचे अनुभव बनत ‘सार्वत्रिक’ ठरतात. 

 लेखकाचे व त्याच्या भावंडांचे बालसुलभ वर्तन, वडिलांचे गैरजबाबदार वागणे- बारा गावचा मुंजा बनून भटकणे, स्वतःच्या संसाराची वाताहत होणे, लेखकाची आई (ब)वर काम आणि नातेसंबंध जपण्याचा दुहेरी ताण येणे, अतिश्रम- अतिताण यातून निर्माण झालेल्या अल्प- आजारात आईचे निधन होणे, आजीने वार्धक्य बाजूला सारत कंबर कसणे, पोटच्या पोरांप्रमाणे या लेकरांना सांभाळणे, आईविना पोरं म्हणून शेजारीपाजारी व नातेवाईकांकडून लाड होणे, शाळेत शिक्षण घेणे, अभ्यासात आघाडीवर असणे, तीन विषय नापास होऊनही वर्गात पहिला नंबर मिळविणे, कुमारवयात मुलीबद्दल नैसर्गिक आकर्षण उत्पन्न होणे, त्यातून सुटका होणे, मुक्या प्राण्याला जीव लावत एक बेवारस कुत्रे पाळणे, त्याच्यासोबत  भावानुबंध निर्माण होणे, जाणीव होत घराची जबाबदारी उचलणे, मोठे भाऊ आप्पांच्या धाक व शिस्तीत वाढणे, आय.टी.आय. करुन नोकरी स्वीकारणे, लग्न आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारणे, त्या उत्तम प्रकारे पार पाडणे, वेगवेगळी आजारपण यावर मात करत कुटुंबाचा डोलारा सांभाळणे आणि विशेष म्हणजे हे करताना जन्मदात्या बापाने आपल्यासाठी काहीही केलेले नसताना आपली जबाबदारी/ कर्तव्य म्हणून शेवटपर्यंत त्यांची जबाबदारी पेलणे, या सगळ्यांत आपल्यातील साहित्यप्रेम आणि सामाजिक जाणीव जपत शक्य ते योगदान देणे असा हा जीवनप्रवास सूत्रबद्ध पद्धतीने येथे चित्रित केलेला आहे. 

साधारण १७ प्रकरणांमध्ये या कादंबरीची रचना गोराडे यांनी केलेली आहे. पहिल्या प्रकरणात मातृछत्र हरपण्याची आणि लेखक जीवनाची दिशा बदलण्याची संवेदनशील घटना घडते. लेखक अवघा चार वर्षांचा असताना आई (ब)च्या मायेला पारखा होतो. जिवंत असताना नवऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे कुंकवाला कुणी नावे ठेवू नये म्हणून ती अहोरात्र राबते. कुटुंबाला एकत्र बांधत घराची जबाबदारी वयाच्या चौदाव्या वर्षी (लग्न झाल्यापासून) अंगाखांद्यावर घेते. सासु- सासरे आणि दीर यांच्या सहकार्यामुळे परिस्थितीशी लढत राहते. मात्र ज्याच्या भरवशावर ती उंबरा ओलांडून आली होती तो नवरा स्वतः काडीचेही काम न करता अहोरात्र राबणाऱ्या बायकोला मात्र काडीचीही किंमत देत नसल्याने नाराजही होते. नवऱ्याच्या जुगार- गांजाच्या व्यसनामुळे व उटारेट्या करत फिरण्यामुळे संपूर्ण गोराडे कुटुंबाला त्रास होतो. ‘ब’ला समाजाकडून मानहानी सहन करावी लागते. घरात उपासमारही घडते. नवरा कुणाचेच ऐकत नाही म्हणून ‘ब’ त्याला समजावण्याचा प्रयत्न करते; ; तेव्हा तो तिला बेदम मारतो. सततच्या ताणतणावाने, अतिकष्टाने ‘ब’ खचत जाते. तिचे अचानक निधन होते. चुलता- चुलती, आजी- आजोबा, मामा- मामी, शेजारी- पाजारी आईवेगळ्या या मुलांना जीव लावतात, याचे वर्णन कादंबरीच्या सुरुवातीला येते. मनाच्या कोपऱ्यातील हळवी बाजू व निवडक घटना- प्रसंगांमुळे कादंबरीची सुरुवात वेधक व लक्षणीय ठरते.

 कादंबरीची सामर्थ्ये व उणीवांबाबत बोलायचे तर; या कादंबरीचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे सहजसुंदर मांडणी आणि वाचकाला खिळवून ठेवणारी आकर्षक भाषाशैली. लेखकाचा जीवनप्रवास मांडताना निवडलेल्या घटना नेमक्या आणि बोलक्या आहेत. . माणसाच्या जडणघडणीत त्याचा भूतकाळ आणि भोवताल या दोन महत्त्वाच्या बाजू असतात. या दोन्ही पातळ्यांमध्ये समतोल साधल्यामुळे कथानक गतिशील राहते. वाचनीय ठरते. मानवी नातेसंबंधाबाबत आस्था, साधे- सरळपणाने जगाकडे पाहणारा लेखक माणसातील आपुलकी आणि दुरावा अशा दोन्ही टोकांचे दर्शन कादंबरीतून नेमकेपणानेे घडवितो. आयुष्य कधीही साधेसरळ नसते त्यातील चढ- उतार यांची नेमकेपणाने मांडणी कादंबरीत जागोजागी येते. 

 साहित्य माणसाला अनुभूती देते, जाणीव देते, दिशा देते आणि समृद्धही करते या निकषावर ही कादंबरी प्रवाही आणि प्रभावी ठरते. कथानक फुलविण्यासाठी लेखक कुठेही तांत्रिकता- क्लृप्त्या वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही. जे आहे ते साधे सरळ मांडण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी अजून रंजकता वगैरे आणता आली असती पण ती कटाक्षाने टाळून जसे आहे ते अधिकाधिक वास्तव आणि तेही सरळ पद्धतीने मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. निखळता आणि प्रामाणिकता हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. कलाकृती म्हणून सजवण्यापेक्षा माणूस म्हणून आलेले अनुभव अधिकाधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडल्याने कादंबरी वाचनीय, रंजक, प्रत्ययकारी आणि हृदयस्पर्शी ठरते. एका सर्वसामान्य कुटुंबाची, वनवासी जीवनाची शब्दांकित कहाणी म्हणून ‘तीर्थरूप’ ही आत्मकथनात्मक कादंबरी महत्त्वपूर्ण आहे.

डॉ. राहुल अशोक पाटील
समीक्षक - संशोधक - स्तंभलेखक


कादंबरी - तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट
लेखक - संजय द. गोराडे
प्रस्तावना - डॉ. राहुल अशोक पाटील
प्रकाशन - घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे.
मूल्य - 250/-

https://shop.chaprak.com/product/tirthrup-vanwasi-jivnachi-gosht/ 

एक क्लिकवर मिळवा, चपराकच्या संकेतस्थळावर 'तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट' कादंबरी

गुरुवार, 25 मार्च 2021

अंतरीचे रंग (वैचारिक ललितसंग्रह)


अंतरीचे रंग : सकारात्मकतेतून परिवर्तन घडविणारे पुस्तक 

एक पुरुष शिकला तर तो एकटाच सुशिक्षित होतो, पण स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. आज एकविसाव्या शतकात स्त्री शिकून सज्ञान झाली आहे. माणूस म्हणून ज्ञात झालेल्या स्वातंत्र्याविषयी व घटनेने बहाल केलेल्या अधिकारांविषयी ती सजग झाली आहे. तिला अंतरीच्या दडलेल्या भावविश्वातील असंख्य पैलू उलगडून दाखवायचे आहे, परंतु ते अंतरीचे पैलू उलगडून दाखवत असताना त्याचे रंग बेरंग होत तर नाही ना ! याचा नेमका सूतोवाच ‘अंतरीचे रंग’ या पुस्तकात लेखिका सुरेखा बोऱ्हाडे यांनी केले आहे.

चपराक प्रकाशित व सुरेखा बोऱ्हाडे लिखित ‘अंतरीचे रंग’ वैचारिक काहीसा ललित लेखसंग्रह आहे, यात आजच्या बदलत्या काळानुसार स्त्रियांनी केलेली प्रगती, प्रगती करत असताना उंचावलेल्या कक्षा आणि कक्षा उंचावत असताना घ्यावयाची दक्षता यावर नेमके भाष्य केले आहे. तसेच पुरुषी अहंकाराला इजा न पोहोचवता पुरुष वर्गाला स्त्रीचा आत्मसन्मान जपण्याचे हलकेफुलके मार्गदर्शन केले आहे. या लेखसंग्रहात दैनदिन जीवनातील स्त्रीविषयक वेगवेगळे लेख असून सकारात्मकतेतून परिवर्तन घडविणारे आहे. 

‘सेवा परमोधर्म’ या लेखाने पुस्तकाची सुरुवात होते. सुश्रुषा, सेवा, संगोपन ; जे स्त्रीचे उपजत गुण आहे. खरंतर ती वात्सल्याची साक्षात मूर्ती आहे. प्रेम, जिव्हाळा, संवेदनशीलता तिच्या ठायी नैसगिकच असते. म्हणून नर्सिंगसारख्या क्षेत्रात स्त्रियांची नेमणूक केली जाते. पेशंटचे स्पंजिंग करणे, पॉट बदलणे, स्वच्छता करणे, योग्य औषधे-इंजेक्शन देणे, रोग्याचे खाणे-पिणे या सर्व गोष्ट स्त्रिया किळस वा द्वेष न करता आपलेपणाने करतात. ज्या खूप जिकिरीच्या, कठीण, चिकाटीच्या व जोखमीच्या असतात. सेवा देण्यामागे पैसे कमवणे हा हेतू असला तरी कर्तव्य बजावताना तो कधीच प्रथम स्थानी नसतो. प्रथम स्थानी नेहमी त्यांची सेवा असते ; जी प्रामाणिक असते. म्हणून या क्षेत्रात नर्सोबा म्हणून कधीही पुरुष नेमले जात नाही वा आढळतही नाही. स्त्रीची सेवाभावी वृत्ती हीच तिची शक्ती आहे. तिच्या या सेवाभावी वृत्तीचा आदर करण्याचे लेखिकेने या लेखात सूचित केले आहे. 

दुसरा लेख आहे, ‘माझी गाडी... माझा वेग...!’ स्त्री ग्रहावर जाऊन आली आहे असे असताना सामान्य कुटुंबातील स्त्रिया साधी टू व्हीलर चालवायला कचरतात. माणसांच्या व गाड्यांच्या गर्दीत कोणाला धक्का लागला तर, वाहतुकाचा नियम मोडला तर, किंवा स्त्री आहोत आपली फजिती झाली तर, अशा अनेक शंकाकुशंकांनी खचून जात त्या टू व्हीलर किंवा फोरव्हीलर चालविण्याचे धाडस करत नाही. खरंतर पुरुष वर्गाने स्त्रीला टू व्हीलर किंवा फोरव्हीलर चालविण्यास प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे त्यांच्यावरचा कामाचा ताण बराच हलका होणार आहे. शाळेत किंवा क्लासला मुलांना ने-आण करणे, बाजारहाट करणे, लग्नसभारंभास जाणे अशा अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या विभागल्या जाणार आहे. स्त्रीने पण स्वतःच्या विकासासाठी, स्वावलंबनासाठी व आत्मविश्वासासाठी टू व्हीलर किंवा फोरव्हीलर चालविण्यास पुढाकार घेतला पाहिजे. ड्रायव्हिंग करणे हा आजच्या युगातील स्त्री स्वातंत्र्याचा हक्क आहे याची लेखिकेने जाणीव या लेखात करून दिली आहे. सोबत ‘माझी गाडी... माझा वेग...!’ हा आत्मभानही ठेवायला सांगितला आहे. 

पुस्तकाच्या उत्तरार्धात ‘फॅशन’ या विषयावर लेख आहे. जो आजच्या तरुणाईने जरूर वाचायला हवा. सतत नवीन काहीतरी करण्याची उर्मी, वेगळेपणा दाखवण्याची हौस यात मुलांप्रमाणे मुलीही आघाडीवर आहेत. चित्रपटातील किंवा जाहिरातील हिरोईनने केलेली फॅशन, हेअरस्टाईल, मेकअप अशा ज्या ज्या फॅशन दाखवल्या जातात ; त्या त्या तरुणाई लगेच प्रत्यक्षात आणून मोकळे होते. परंतु त्या फॅशनचे अनुकरण करताना स्वतःला सुरक्षित वाटते आहे का ? फॅशनेबल राहण्याच्या किंवा दिसण्याच्या नादात आपले अस्तित्व धोक्यात येते आहे का ? याच्या नेमक्या टिप्स ‘फॅशन’ या लेखात लेखिकेने दिल्या आहेत. पाश्चात्य पोशाखांचे अंधानुकरण करण्यापेक्षा आपल्याच वातावरणाशी मिळतीजुळती फॅशन करण्याचा छान सल्लाही दिला आहे. शरीराचे सौंदर्य जपण्यापेक्षा मनाचे सौंदर्य जपण्यात त्यांनी चांगुलपणा मानायला सांगितला आहे. 

‘कन्यादान... दान की आदान ?’ शेवटचा लेख. कन्यादान या शब्दामागची चुकीची मानसिकता लेखिकेने या लेखात उलगडून सांगितली आहे. आजवर कन्यादानाला महादान म्हटले गेले आहे. ज्याप्रमाणे पैसे, धन, गाई दान करतो ; त्याप्रमाणे कन्येचे पण दान केले जाते. परंतु तो अधिकार पित्याला असतो का ? कारण अर्जित संपत्तीचे दान करण्याचा अधिकार व्यक्तीला असतो. आपली मुलगी नक्कीच अर्जित संपत्ती नाही. तिला दुसऱ्याला देऊन टाकणे ही भावना कुठेतरी कमीपणा, हीनपणा आणणारी आहे. तेव्हा पिता म्हणून आपण कन्येचे दान न करता आदान करायला हवे. अर्जुनाबरोबर सुभद्रेचा गांधर्वविवाहाच्या वेळी श्रीकृष्ण बलरामाला म्हणतात, ‘प्रदानमपी कन्याया : पशुवत को नुमन्यते ?’ पशुप्रमाणे कन्येचे दान करण्यास अनुमती नाही. तेव्हा कन्या ही सर्वार्थाने गृहलक्ष्मी असते. तिचा योग्य मान-सन्मान राखला गेला पाहिजे, असे या लेखात लेखिका जनजागृती करत रास्त संदेश देते. 

असे स्त्री जीवनावर आधारित विविध विषयांवर छत्तीस लेख ‘अंतरीचे रंग’ या पुस्तकात आहेत. स्त्रियांच्या जगण्यातील बारकावे, आनंद, अस्मिता, दुःख लेखिका सुरेखा बोऱ्हाडे यांनी सहज शैलीत नोंदले आहेत. लेखांची भाषा ओघवती व वाचकाला बांधून ठेवणारी आहे. लेख वाचताना त्यांचे निरीक्षण व अभ्यास अफाट असल्याचे दिसून येते. ‘अंतरीचे रंग’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्या स्त्रियांमध्ये मोलाचे परिवर्तन करून पाहत असल्याचे जाणते. जे वाचनांती स्त्रियांबरोबर पुरुषांमध्येही परिवर्तन घडविणारे आहेत. असे रोजच्या जगण्याविषयी मार्गदर्शक ठरणारे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे असे वाचक म्हणून मला वाटते. लेखिकेच्या हातून असेच समाज प्रबोधन करणारे लेखन घडो अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. 

अंतरीचे रंग (वैचारिक)
लेखिका सुरेखा बोऱ्हाडे
प्रकाशक घनश्याम पाटील (मो.७०५७२९२०९२)
चपराक प्रकाशन, पुणे
मूल्य - २००/-   
  
आस्वादक – लेखक संजय द. गोराडे (नाशिक) 
मो. नं – ९८५०६९१२१६      

          
       

गुरुवार, 18 मार्च 2021

कथा वास्तवातल्या (कथासंग्रह)


‘कथा वास्तवातल्या’ कथासंग्रह वाचताना लेखक प्रा. विजय काकडे छोट्याछोट्या घटनांकडे किती संवेदनशील नजरेने पाहतात याची प्रचिती येते. हलकेफुलके पण तितकेच मनाला भिडणारे विषय घेऊन लेखकाने वास्तवातल्या कथांना शब्दरूप देऊन कागदावर साकार केले आहेत. जे प्रसंग नित्य आपल्या अवतीभवती घडत असतात, पण त्याकडे आपण कधीच डोळे उघडे असूनही पाहत नाही, मात्र लेखक अशा घटनांकडे खूप गांभीर्याने पाहतात. घटना लहान असली तरी त्यात प्रबोधन करणारे खूप मोठे कथानक त्यांना गवसताना दिसते आहे. जे स्वतःमध्ये परिणामी समाजामध्ये परिवर्तन घडविणारे आहे. 
या कथासंग्रहात एकूण बाबीस कथा आहेत. सर्व कथांच्या घटना त्यांनी स्वतः अनुभवलेल्या व पाहिलेल्या आहेत, ज्या कल्पनेने किंवा लालीत्याने फुलवलेल्या नसून वास्तवातल्या कथा आहेत, म्हणून त्यांनी कथासंग्रहाला ‘कथा वास्तवातल्या’ हे शीर्षक दिले आहेत. जे कथासंग्रह वाचताना खूप सार्थ वाटते. आजकालची पिढी ही वास्तवात जगणारी पिढी आहे, त्यांना कल्पनेत जगायला बिलकुल आवडत नाही, याचं नेमकं भान असलेल्या लेखक प्रा. विजय काकडे यांनी आपल्या जीवनातील चांगल्या-वाईट वेगवेगळ्या घटना कथारूपाने उभ्या केल्या आहेत. ज्या वाचकाला आपल्याशा वाटणाऱ्या आहेत. 
‘आपली माणसं’ या कथेत सुखात गुळाला मुंग्या चिटकाव्या तशी माणसं चिटकतात, मात्र तीच दुःखात आपल्याकडे पाठ वळवतात, आर्थिक नाही तर साधा मानसिक आधार द्यायलासुद्धा पुढे येत नाही, तेव्हा कळते आपली माणसं कोणती आणि परकी माणसं कोणती ; मित्रावर ओढावलेल्या प्रसंगातून लेखकाने आजच्या आपमतलबी मानसिकतेचे नेमके दर्शन घडवले आहे.
‘सावित्री’ कथेत गरोदर सावित्रीला कोरोनाची लक्षणे दिसतात, पती संपत व त्याची आई तिला कुठलीही शहानिशा करता कोरोना पॉजिटिव्ह ठरवून मोकळे होतात व लगेच वाळीत टाकावे तसे विलग करतात, तिला खायला देत नाही की दवाखाना घेऊन जात नाही, परंतु दैवाचे फासे असे फिरतात की ; ती निगेटिव्ह व पती आणि सासू पॉजिटिव्ह निघतात. सावित्री मात्र नावाप्रमाणेच सावित्री असते, ती उलट पती आणि सासूची खूप शुश्रुषा व दवाखाना करते, अशी कोरोनावर आधारित ‘सावित्री’ नावाची खूप छान कथा वाचायला मिळते. लेखकाने या कथेला छान कलाटणी दिली आहे. 
‘ज्ञानेश्वरी’ कथेत ज्ञानेश्वरी नावाची एक हुशार विद्यार्थीनी आहे, ती एफ वाय बी एस सीला आहे, ती परीक्षेत फस्ट क्लासमध्ये पास होणार अशी कॉलेजाच्या शिक्षकांना आणि आईवडिलांना खात्री असते. पण अचानक अनपेक्षितपणे ती नापास होते. तो धक्का ज्ञानेश्वरीला सहन होत नाही आणि ती जे नको करायला हवे तेच करते. हा प्रकार निकालाच्या काळात सर्रास ऐकायला व पहायला मिळतो. अशा नैराश्यातून झालेल्या आत्महत्या पालकांप्रमाणे शिक्षकांनाही किती वेदना देणाऱ्या असतात हे ‘ज्ञानेश्वरी’ कथेतून लेखकाने सांगितले आहेत. 
‘कोविड १००’ ही एक विज्ञान कथा आहे, कोरोनाने सगळे जग बंदिस्त केलेले असताना दुसरीकडे लोक उपासमारीने मरत आहे, घराबाहेर पडले तर कोरोनाग्रस्त होऊन मरायचं आणि घरात थांबलं भुकेने मरायचं ; अशा सततच्या बातम्यांनी बालमनावर किती विपरीत परिणाम होतो हे या कथेतून लेखकाने खूप ताकदीने उभे केले आहेत, ही पुरस्कारप्राप्त कथा असून वाचकांच्या अंगावर रोमांच उभे करणारी आहे. 
खटारा गाडी, लेखकाची किंमत, छत्री, नानीचा निर्णय, मदिरेचा प्रवास, मनीषबाबू, कौटुंबिक सुख, पितृ अमावास्या अशा विविध विषयांवर या कथासंग्रहात बाबीस कथा आहेत, ज्या लेखकासह तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातल्या कथा आहेत. प्रत्येक कथेची मांडणी विषयाला धरून केलेली आहे, कुठेही पाल्हाळीकपणा आढळत नाही, प्रत्येक कथेतून लेखकाने सूचक असा वास्तवाची जाणीव करून देणारा बोध दिला आहे, जे लेखकाचे एक शक्तीस्थान वाटते, सोशल मिडीयावर या कथांना वाचकांनी भरभरू प्रेम दिले आहेत तेच आभासी जगातले प्रेम भासी जगात ‘कथा वास्तवातल्या’ या पुस्तकाला द्याल अशी मी अपेक्षा करतो व आवाहनही करतो, नक्कीच वाचकांच्या प्रेमाला खरा उतरणारा हा कथासंग्रह आहे, लेखक प्रा. विजय काकडे यांच्याकडून अशीच उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होत राहील अशा शुभेच्छा देतो.  धन्यवाद. 


कथासंग्रह - कथा वास्तवातल्या (भाग -१)
लेखक - प्रा. विजय काकडे
प्रस्तावना - संजय गोराडे (कथा/कादंबरी लेखक)
प्रकाशक - रंगतदार प्रकाशन
मूल्य - १५०/-

पुस्तक परिचय :-
संजय द. गोराडे (नाशिक) 
मो. नं - ९८५०६९१२१६      

मंगलवार, 16 मार्च 2021

उजेड पेरत जातो (कवितासंग्रह)


अंधारलेल्या आयुष्यांना प्रकाशाचा किरण देऊ पाहणार्‍या कवी राज शेळके यांच्या ‘उजेड पेरत जातो’ काव्यसंग्रहातील कविता म्हणजे नैराश्याने ग्रासलेल्यांना जगण्याकरिता सकारात्मक संजीवनी देणार्‍या आहे. खचलेल्यांना आधार देऊ पाहणारा हा कवी एका कवितेत म्हणतो, 

ही जगण्याची कैसी शर्यत
चढावयाचे शंभर पर्वत
अन थकण्याची नाही सवलत
हिंमत जपून ठेवा

जगण्याच्या शर्यतीत सुखदुःखाचे असंख्य पर्वत पार करायचे आहे, तेव्हा थकून चालणार नाही, श्वास चालू आहे तोवर हिंमत जपून ठेव. हलक्या फुलक्या शब्दात वाचकाला सहज समजेल अशा भाषेत कवी आपले विचार किती अलवार मांडताना दिसतो. प्रतिकं आणि प्रतिमांचा भडिमार न करता सरळ रोजच्या जगण्याला कविताचा आकार देत जातो. 

भूतकाळाच्या समिधा टाकून
यज्ञ कधी धगधगला का ?
दुःखाच्या खपल्यांना काढून
कुणी सुखाने जगला का ?

घडून गेलेल्या घटनेच्या विनाकारण खपल्या काढत राहणे व मनात संतापाचा अग्निकुंड पेटत ठेवणे यामुळे माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. कवीने या कवितेच्या शेवटच्या कडव्यात छान संदेश दिला आहे, ‘अक्कल खोटी, फोल पुरावे, व्यवहाराची गल्लत, शून्यामधून शून्य निघाला, ना बाकी ना शिल्लक’, घडून गेलेल्या गोष्टीवर उगाचच पुरावे देत राहणे, चुकीची गोष्ट कशी खरी आहे ते सांगत राहणे, परंतु शेवटी पदरी काय पडते ? एका अहंकाराचे खोटे समाधान. अशाच पध्दतीने कवी राज शेळके यांच्या लेखनीतून प्रसवलेल्या विविध कविता म्हणजे अहंकाराचा बुरखा पांघरलेल्या माणसाला वास्तवाचा आरसा दाखवणार्‍या आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.   

शब्दाच्या पाणवठ्यावर
अर्थाचे होते येणे
कवितेची घागर भरता
दुःखाचे होते गाणे

असा हा कल्पनेत न रमणारा कवी आपल्या कवितेतून वास्तव मांडत जगाचं दुःख प्रामाणिकपणे शब्दबध्द करताना दिसतो. प्राप्त परिस्थितीत दुःखीकष्टी न होता त्याला तोंड कसे द्यायचे हेही तो सांगतो. दुःखाचा तट भरून आला की तो आपूसकच भावनिक होतो अन गहिवरल्या मनात शब्दांची गर्दी व्हावी तशी त्याची कवितेची घागर भरून येते, व त्याचे शब्द आपसूकच दुःखाचे गाणे होते. अशा या हळव्या मनाच्या कवीला अंत व उदय या दोन्ही गोष्टींची जाण आहे, त्यामुळे तो निव्वळ दुःख न मांडता त्यावर उपायही सुचवतो, सकारात्मक ऊर्जा देणार्‍या या कवितासंग्रहाच्या शीर्षक कवितेत कवी म्हणतो,  

अंधाराच्या काठावर मी
मशाल ठेवत जातो
उजेड पेरत जातो
मी उजेड पेरत जातो

असा हा ‘उजेड पेरत जातो’ कवितासंग्रह नक्कीच वाचकाचं जगणं हलकं करणारा आहे, तो लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनीच वाचावा असा आहे. कारण लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच देहात परकाया प्रवेश करत कवीने कविता गुंफल्या आहे असे वाटते ; नव्हे तसे म्हटले तरी निरर्थक वाटू नये. कारण त्यांनी प्रत्येक वयोगटाची भुमिका तितक्याच कवितेतून आत्मितीयेने उभी केली आहे. त्यांची कविता समजायला जितकी सोपी आहे ; तितकीच सत्याची कास धरणारी आहे. असा कवी राज शेळके यांचा ‘उजेड पेरत जातो’ काव्यसंग्रह वैशाली प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला आहे. आत्मशोध घ्यायला लावणारा हा कवितासंग्रह नक्कीच वाचकाचे आत्मभान जागे करणारा आहे इतकेच वाचक म्हणून मला वाटते. साहित्यिक वाटचालीसाठी कवी राज शेलके यांना खूप खूप शुभेच्छा... !


कवितासंग्रह - उजेड पेरत जातो
कवी - प्रा. राज शेळके
प्रकाशक - वैशाली प्रकाशन
मूल्य -

पुस्तक परिचय :- 
संजय द. गोराडे (नाशिक)
मो नं - 9850691216

उंबरगुज (ललितसंग्रह)


उंबरगुज (ललितसंग्रह)

नंत चौधरी एक मितभाषी व्यक्तिमत्त्व, तसे म्हणायला ते मितभाषी आहेत, कारण मितभाषी माणसं वास्तविक पाहता मनोमन स्वतःशी खूप बोलत असतात, सतत ती स्वतःशी संवाद साधत असतात, अशी स्वतःशी संवाद साधणारी माणसं खूप संवेदनशील व चिंतन करणारी असतात. ती छोट्याछोट्या गोष्टीत स्वतःला त्याच्या ठिकाणी पाहत भोवतालचं विश्व समजून घेत असतात. प्रत्येक सजीव निर्जीवासोबत गुजगोष्टी करत असतात. त्याचाच आविष्कार म्हणजे लेखक अनंत चौधरी यांचा ललितसंग्रह ‘उंबरगुज’ होय. 
माळावर, रानात, जाळीत पोसलेल्या पिकलेल्या फळांचं हितगुज स्पष्ट करणारा ‘उंबरगुज’ पुस्तकातील पहिलाच ललितलेख रसरसीत फळांची ओळख सांगणारा आहे. करवंद, उंबरं, आळवांनी, तोरणांनी अशा गारसलेल्या पिकलेल्या फळांचा आस्वाद घेण्याची इच्छा लेखकाच्या शब्दांनी जागृत केली तर नवल वाटू नये. तेवढी ताकद ललितलेख वाचताना लेखकाच्या प्रतिभासंपन्न लेखनीत नक्कीच असल्याचे जाणवते. विविध फळझाडांबरोबर उंबरगुज ललितलेखात उल्लेखलेलं उंबराचं झाड त्यांच्या विशेष आस्थेचे राहिले आहे. पिकलेल्या उंबराचा दरवळत असलेला उंबरवास, उंबराच्या झाडाखाली सगळीकडे पसरलेला उंबरसडा, लाल मुंग्याची उंबराच्या झाडावर वरखाली ये-जा, मधेच थांबून दोन मुंग्या आपसात एकमेकींशी उंबराविषयी गुजगोष्टी करत असाव्या असं लेखकाला वाटणं, खरंच... लेखकाच्या नजरेने टिपलेल्या छोट्याछोट्या गोष्टी त्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवतात. काय बोलत असाव्या मुंग्या ! दोन मुंग्या एकमेकींजवळ थांबून नक्कीच कसली तरी देवाणघेवाण करत असाव्यात. अपघात झाला तरी मदतीचा हात न देणार्‍या काळात किड्यामुंग्याच्या भावविश्वाचा विचार करणारा लेखक किती कोमल मनाचा आहे हे संग्रहातील पुढील लेख वाचतानाही प्रकार्षाने जाणवते. त्यांना उंबर आजोबा तर मुंग्या नाती वाटतात. नातीप्रमाणे मुंग्या हळू आवाजात बोलत आहे, तर उंबर आजोबाप्रमाणे त्यांच्या गुजगोष्टी कान लावून ऐकत आहे, असं आस्था जडलेलं उंबराचं जीर्ण झालेलं झाड पाहून लेखकाच्या बालपणीच्या आठवणी आजही ताज्या होतात. बालपणी उपभोगलेली फळभाराची श्रीमंती, रानवैभव, फळणे, फुलणे, पिकणे सारंसारं आज नाहीसे झालेलं आहे, आज प्रगतीच्या नावाखाली सरार्स झाडांवर कुर्हाड चालविली जाते. चाखलेला फळाफुलांचा गंध-वासाला कायमचे मुकले जाण्याची भीती अखेर लेखक व्यक्त करतात. 
‘मामाची गुरं’ या लेखात लेखक शिकण्यासाठी म्हणून मामाच्या गावी आलेले आहे, बालवयात मामाच्या गावी शिक्षणाच्या बदल्यात काय-काय कामे करावी लागत असे, त्या आठवणींना त्यांनी या लेखात उजाळा दिला आहे. बालपणी शिकावं म्हणून शाळेत पाटीदप्तर कमी आणि गुरांमागे काठी-घोंगडेच जास्त घेऊन लागत असे. कधी-कधी नको वाटत असे त्यांना ते जीवन. गोठ्यातील शेणसडा काढणे, रानात गुरे चारायला घेऊन जाणे, थकलेलं जनावर हाकालणे, उधळलेलं जनावर वळून आणणे, यामुळे त्यांची फजिती होत ते रडकूंडीला येत असे. परंतु जनावरं वळत-वळतच शिक्षण घ्यावं लागणार आहे वस्तुस्थिथी कळल्यावर मात्र ते अजिबात तक्रार न मामाची गुरं वळतानाचे अनेक गंमतीदार अनुभव सांगतात, त्यातच त्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षाही जीवनाचे अनमोल ज्ञान मिळते. त्याचेच फळ ते आज शहरातील संमृद्ध जीवन जगत आहे. बालपणीच्या त्या आठवणी लिहिताना मात्र लेखकाला तेच दिवस सुगीचे वाटतात. कारण तेव्हाची रानावनाची गोडी, रानातील गाणी, पक्षांची दाद, निसर्गाची भरभरून साद, झाडा-झुडपाची, वन औषधाची ओळख, पायवाट तुडवणं, बागडणं सारं सारं आता दुरापास्त झाले आहे. म्हणून लेखकाला आजचे सुखसीन जीवन बालपणीच्या जीवनाइतके संमृद्ध वाटत नाही.  
‘अंगण’ प्रत्येकाला आपलासा व भावणारा ललितलेख, जो प्रत्येकालाच स्वतःचे अंगण पारखे झाल्याची जाणीव करून देतो. घरापुढेचे अंगण ज्याच्या आपण इतक्या गहनतेने विचार करत नाही जितका घराचा करतो. घर बांधताना ते अमूक पध्दतीने असावं तमूक पध्दतीने असावं असा खूप अभ्यास व विचार केला जातो. पण अंगण... ज्याच्याविना घराला शोभा नाही ते मात्र अभ्यासाशिवाय तयार केले जाते. असं दुर्लक्षित असलेलं पण घराचं घरपण जपणारं अंगण लेखकाने त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनीतून सुबक व सुंदर रेखाटले आहे, जे लेखकाइतकेच प्रत्येकाच्या जीवनातील जिव्हाळ्याचे व महत्वाचे आहे. घरासमोरचे अंगण... जेथे बालपणी अंघोळीचा पाट थाटला जातो, खेळत लहानाचे मोठे होतो, गोट्या आणि कोयींचे डाव रंगतात, वयात आल्यावर अंगणात नजरानजर व इशारे केले जातात, बाहेरच्या मौल्यवान वस्तू घरात तर घरातील अडगळीच्या वस्तू अंगणात आणल्या जातात, भांडीकुंडी व कपडे धुण्यासाठी दगड अंगणात ठेवला जातो, धुतलेले कपडे, शेवया, कुराडया, पापड्या वाळत घालण्यासाठी अंगणच उपयोगाला येत असते. लग्नाचा मांडव व घरातील टोकाला गेलेलं भांडण अंगणातच उभे राहून केले जाते, असं इतर वेळी सावत्र असलेलं अंगण अप्रत्यक्षपणे किती महत्वाचं आहे हे लेखकाने खूप विस्ताराने व मार्मिक शब्दात सांगितले आहे, ‘घर आणि अंगण यात माणसाने जरी भेद केलेला असला तरी अंगणाला ठाऊक आहे, घरात जाणार्‍या प्रत्येक वस्तूंचा आणि माणसांचा मार्ग हा अंगणातून जातो, अंगणाला पाय लावूनच घरात पाऊल पडत असतं.’ असे अंगणाशी असलेले ॠणानुबंध लेखकाने छान शब्दात विशद केले आहे, अशा बदलत्या काळानुसार माणसाच्या मनाप्रमाणे संकोचित झालेले अंगण पुढील पिढीसाठी ‘अंगणाविना घर पारखे’ अशी भीती लेखकाप्रमाणे वाचकाच्याही मनाला शिवते. 
अनंत चौधरी लिखित ‘उंबरगुज’ हा पहिला ललितसंग्रह आहे, तरी त्यांच्या लिखाणात कुठलेही नवखेपणाचे लक्षणे आढळत नाही. उलट वाचकास प्रेरणादायी ठरणारे आहे, संग्रहात एकूण सोळा ललित लेख आहे. सगळे ललितलेख त्यांच्या गत आयुष्यातील स्मृतींसोबत आजच्या परिस्थितीशी सांगड घालताना तफावत दर्शवणारे आहे. बालपणी सोसलेलं, भोगालेलं, अनुभवलेलं खडतर आयुष्य तरीही आज जगत असलेल्या आयुष्यापेक्षा सरस असल्याची खंत ते प्रत्येक लेखाच्या अंती व्यक्त करतात. अंतर्मुख करणार्‍या अशा या ललितसंग्रहाला जेष्ठ साहित्यिक विवेकजी उगलमुगले व विजयकुमारजी मिठे यांची प्रस्थावना आहे. कादवाशिवार प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केलेला असून अरविंदजी शेलार यांचे मुखपृष्ठ आहे तर आतील अक्षरजुळणी दीपक दंडवते यांची आहे. दोन पिढ्यांमधील भेद स्पष्ट करत माणसांचं माणूसपण जागं करणारा ‘उंबरगुज’ नक्कीच सर्वांनी वाचावा असा आहे. त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा.  


ललितसंग्रह - उंबरगुज
लेखक - अनंत चौधरी
प्रकाशक - कादवा शिवार
मूल्य - 

************

पुस्तक परिचय :- 
संजय द. गोराडे (कादंबरी लेखक)
मो नं - ९८५०६९१२१६ 

एखाद्या शब्दासाठी (कवितासंग्रह)


‘एखादा श्वास निसटतो एखादे पान निखळते
एखाद्या शब्दासाठी एखादे स्वप्न अडकते....’

नुकताच प्रकाशित झालेला संतोष वाटपाडे लिखित ‘एखाद्या शब्दासाठी’ कवितासंग्रहातील वरील काव्यपंक्ती आहे. एखाद्या हिर्‍यातून चकचकत्या तेजाची असंख्य किरणं बाहेर पडावी  तशा संतोष वाटपाडे यांच्या काव्यसंग्रहातील कविता आहेत. वाचक ज्या दृष्टीने त्यांच्या कवितेकडे पाहिल ; तसा त्याला त्या दृष्टीने अर्थबोध होईल, काव्यसंग्रहाचे शीर्षक असलेल्या ‘एखाद्या शब्दासाठी’ या कवितेत कवी म्हणतो, ‘एखादा श्वास निसटतो एखादे पान निखळते’ एखाद्या हिरव्यागार वटवृक्षाचे एखादे पिवळे निखळून पडावे तसे या माणसांनी भरलेल्या जगात एखादा श्वास म्हणजे एखादा माणूस जग सोडून जातो तरी कुणाच्या खिजगणतीत नसते. क्षणभर दुःख करतात आणि विसरून जातात. 

‘एखाद्या शब्दासाठी एखादे स्वप्न अडकते....’ एखादा शब्द असा असतो ; ज्याने माणसांच्या स्वप्नांची पुर्तता होते, एखादा शब्द असा असतो ; ज्याने स्वप्नाची राखरांगोळी पण होऊ शकते. 

एखादा शब्द असा असतो ; ज्याने कवीला सहज कविता सुचते, आणि एखादा शब्द असा असतो ; कवीच्या कवी-मनात कवितेचे बीज रुजते मात्र स्फुरत काहीच नाही. शब्दांची ताकद माहीत असलेला असा हा कवी आपल्या कवितांमधून अफाट काहीतरी सांगू पाहतो आहे असे वाटते.

आयुष्य लाकडी मेणा
मी जन्मोजन्मी भोई
बदलावा खांदा केव्हा
मज अजून कळले नाही

संसाराच्या मोहमायेत अडकलेला माणसाला जीवनाविषयी एवढी आसक्ती निर्माण होते, तो इतका भौतिक सुखात जंजाळात गुरटफत जातो की, कुठं थांबलं पाहिजे हेच त्याला कळत नाही. आपण अडचण आहोत ; कपाळमोक्ष होतो तरी त्याला समजत नाही. तो फक्त धावत असतो. सुरुवातीला मौजेची वाटणारी वाट नंतर जीवघेणी ठरते तरी तो धावत असतो. कवीने आयुष्याला लाकडी मेणा म्हटलेलं आहे. हा लाकडी मेणा खांद्याचं कातडं सोलून काढतो तरी तो खाली ठेवायला तयार होत नाही, फक्त तो धावत असतो. माणसाच्या या आसक्तीवर कवीने ‘मेणा’ कवितेत छान भाष्य केले आहे. अशीच जीवन-मरणाचं गमक सांगणारी ‘जन्म एक ॠचा’ ही अभंग काव्य प्रकारातील रचना आहे, ‘सरणाच्या आत l जळते सरण l तसे रितेपण l लाभो आता ll’ माणसाच्या शरीरात जोवर आत्मा आहे, तोवर त्याला एक नाव आहे, पण आत्मा निघून गेला की लगेच लोकं त्याला बॉडी म्हणतात. ती बॉडी सरणावर ठेवतात, सरण पेटवले जाते, त्या सरणासोबत बॉडी पण जळत असते. आत्मा विरहीत त्या बॉडीला आता कुणाविषयीच लोभ, मोह, माया, मत्सर वाटत नाही. जिवंतपणी अहंमपणाने मिरवणारी ती बॉडी मरणानंतर अगदी रीती होऊन जळते आहे ; तसं रितेपण कवीला जिवंतपणी अपेक्षित आहे.

फाटलेल्या वाकळात म्हातारीची तगमग 
थकलेल्या काळजाने किती धरायचा तग
वाकळाच्या गाठोड्यात एक मणाचा पाचोळा
हात चाचपतो काठी पाणी झिरपते डोळा     
  
‘वाकळ’ ही कविता वाचल्यावर आपलाही शेवट उद्या असाच असणार आहे याची अनुभूती वाचकाला झाल्याशिवाय राहणार नाही. वार्धक्याचं जीणं किती भयंकर असतं याचं हुबेहूब चित्रण कवीने या कवितेत केले आहे. कविता वाचताना वार्धक्याचा पट जसाचा तसा डोळ्यासमोर साकारतो. कधीकाळी जिचं वजन पन्नास-साठ किलो असेल ती म्हातारी आता जेमतेम एक मणाच्या पाचोळ्यागत उरली आहे. किती अफाट शब्दसंपदा कवीजवळ आहे. घागर मे सागर दाखवण्याची ताकद कवीच्या ठायी आहे. प्रतिकं आणि प्रतिमाचा वापर कवितासंग्रहातील कवितेत अगदी लीलया केल्याचे आढळते. त्यामुळेच भोवतालचा प्रत्येक घटक किंवा घटना या कवीसाठी कविता बनली आहे. विविध विषय या काव्यसंग्रहात कवीने खूप छान हाताळले आहे. 

रघुवंशी राउळे जुनी गोदेच्या काठावरची 
रामकुंड स्पर्शण्यास जमते गर्दी घाटावरती 
जर्जर अस्थीपंजर काही वाटेवर बसलेले 
आयुष्याचे ओझे दिसते त्यांच्या डोक्यावरती  
                      
मग नाशिक कर्मभूमी असलेल्या कवीच्या नजरेतून ‘नाशिक’ हा विषय कसा सुटेल, नाशिकच्या नुसत्या गोदाकाठाचे वर्णन करायचे म्हटले तरी कमीतकमी एकशे सहा पान लागतील, पण या कवीने एकशे सहा शब्दात वाचकाला आपल्या काव्याद्वारे गोदावारीचे दर्शन घडवले आहे. गोदाकाठची राम मंदिरे, रामकुंड, सीतागुंफा, काळाराम मंदिर यांचा वेद घेत आजचे वास्तव ‘नाशिक’ या कवितेतून अचूक टिपले आहे. असा प्रतिभासंपन्न कवी एकाच विषयाला चिकटून न राहता अनेक विषयांना अगदी सहज  हाताळताना दिसतो आहे, तरीही कवी स्वतःविषयी लिहितो, 

लेखणी कुणाची असते हे मला माहिती नाही 
येतात कल्पना कोठुन हेसुद्धा ठाउक नाही 
ती जेव्हा हात पकडते कानात बोलते माझ्या 
येतात कागदावरती शब्दांच्या रांगा काही     
 
   छंद, वृत्त, अष्टाक्षरी, अभंग इतके सारे विविध साज परिधान करून कवीच्या लेखणीतून बहुरंगी व बहुढंगी कविता कागदावर साकारल्या आहे तरी कवी स्वतःला आश्वासकपणे कवी म्हणत नाही. यातूनच कवीची शोधक व अभ्यासक वृत्ती दिसून येते. ‘एखाद्या शब्दासाठी’ या कवितासंग्रहात एकूण एकोनव्वद कविता आहेत. त्या प्रेमरसासोबत समाजाला संदेश देणार्‍या तर आहेच ; पण जीवनाचं शाश्वात सत्यही उलगडणार्‍या आहे. प्रत्येक कवितेवर विस्ताराने लिहायचे ठरवले तरी दहा-दहा प्रबंध तयार होईल असे वाटते. अशा या कवितासंग्रहाचे प्रकाशक स्वयं प्रकाशन असून त्याचे अंतरंग व बाह्यरंग निलेश गायधनी सजवलेले आहे. ‘ही बाग कुणाची’ संतोष वाटपाडे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहापाठोपाठ आलेला हा दुसरा काव्यसंग्रह ‘एखाद्या शब्दासाठी’ नक्कीच लिहिणार्‍या हातांना प्रेरणा देणारा आहे. प्रत्येकाने त्यांचे कवितासंग्रह अभ्यास म्हणून वाचावेत व संग्रही ठेवावे असं मी आग्रहपूर्वक म्हणेन. अशा या हरहुन्नरी कवीला त्याच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 


कवितासंग्रह - एखाद्या शब्दासाठी
कवी - संतोष वाटपाडे
प्रकाशन - वैशाली प्रकाशन
किंमत - 225/-

पुस्तक परिचय :-
संजय द. गोराडे (पाथर्डीफाटा नाशिक)
मो. नं - ९८५०६९१२१६ 

चांदणभूल (ललित कथासंग्रह)


चांदणभूल (ललित कथासंग्रह)
       लेखक - विजयकुमार मिठे 

काशातील चंद्र चांदण्या यांच्या प्रेमात पडलेले विजयकुमार मिठे यांचा नुकताच प्रकाशित झालेला ललित कथासंग्रह ‘चांदणभूल’ वाचकास वाचण्याचा सहज मोह होईल असाच निर्माण झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कलेकलेने वाढत जाणारा कुणब्याचा कंदील असलेला चंद्र कागदावर उतरवताना ते अजिबात थकत नाही. आपल्या लेखनीद्वारे प्रसवणारा शब्द नि शब्द चंद्र प्रकाशासारखा  शीतल अनुभव देऊन जातो, प्रेयसी-प्रियकाराचा प्रसंग लिहितानाच चंद्र-चांदण्यांची आठवण होणार्‍या कवी-लेखकांना या ललित कथासंग्रहातून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रेयसीविनाही आकाशातील चंद्र-चांदण्यांची पडलेली भूल त्यांनी चांदणभूल या कथेत खूपच अलंकारिक व वेगवेगळ्या उपमा देत मांडली आहे. 
‘पुनवेचा चंद्र आईनं तव्यावर केलेल्या गोल गरगरीत भाकरीसारखा दिसायचा. त्याच्या शीतल प्रकाशापेक्षा त्याच्यावर काळे डाग कशाचे आहे, याचंच अधिक कुतूहल वाटायचे. आई आपल्या गोंडस बाळाला दृष्टीबाधा होऊ नये म्हणून काळी तिट लावते तशी चंद्राला कुणाची नजर लागायला नको म्हणून त्याच्या आईने ही काळ्या डागाची तिट तर लावली नसेल ना, बालपणी पाहिलेले चंद्रावरचे हे काळे डाग आजतागायत तसेच आहे हे पाहून वाटतं, एखाद्या पोरानं एकच सदरा रोज रोज वापरावा तसा चांदोमामा एकच अंगरखा घालून वर्षानुवर्ष फिरतो आहे. चंद्राच्या बाजूला काही अंतर राखून चमकणार्‍या ठळक चांदणीकडे पाहिलं की वाटायचं ही चांदोमामाची बायको असावी. सतत त्याच्या सोबतच असते. शिवाय एखाद्या घरंदाज बाईनं आपल्या नवर्‍यासमोर डोईवरचा पदर सावरून उभं रहावं, तशी ती आदबशीर चंद्रासमोर उभी असते.’ (पृष्ठ - १४)
अशी चंद्र-चांदण्यांची डोळ्यांवर नेहमीच भुरळ असलेला लेखक कथेच्या शेवटी खंतही व्यक्त करताना दिसतात, बालपणी अंगणात बसून आकाश न्याहाळताना त्यांना ते चांदण्यांनी खच्चून भरलेलं दिसायचं, पण वर्षागणिक चांदण्या पण घटल्या आहेत असं लिहित आजच्या पिढीची दृष्टीहीनता नकळत दर्शविताना वाटतात. आजच्या झपाट्याने होत औद्योगिकीकरणाच्या धावपळीत कुणालाही नैसर्गिक सौंदर्य पहायला वेळ नाही. फक्त आपलं कुटुंब आणि त्याचं सुख एवढेच संक्षिप्त विश्व झाले आहे. त्या पलिकडे कुणालाही काहीही दिसत नाही.  
विकसित आणि अविकसित असा दोन्ही काळाचा अनुभव असलेले लेखक आपल्या विविध कथांतून स्वतःच्या ग्रामीण शैलीत खूपच मार्मिक तुलना करताना दिसतात, या ललितकथासंग्रहात एकूण तेरा कथा असून प्रत्येक कथा काहीना काही संदेश देताना दिसते. त्यांच्या साहित्यनिर्मितीचे केंद्रस्थान हे गाव, गावाचा कारभार, गावातील माणसं, त्यांची सुखदुःख, शेती व भोवतालचा निसर्ग हे आहे. छोटेसे वाटणारे विषय पण खूपच छान पध्दतीने मांडणी करत वाचकांच्या समोर ठेवले आहे.
‘सोनपिवळ्या फुलांची बाभूळ’ या कथेत आज्यापंज्या जमान्यापासून वावराच्या मधोमध बिनकामाची जागा आडवून बसलेली बाभूळ पुर्वाजांनी सांभाळली म्हणून लेखक पण तिला जपतात. माणसांइतकं झाडांना जपणारा लेखक बाभळीविषयी कितीतरी जिव्हाळ्याच्या आठवणी सांगतात, पण तंत्रज्ञानाच्या युगात आजच्या पिढीला तिची अडचण होते, आणि ऐहिक सुखासाठी तिला निरुपोगी समजून तोडलं जातं, येथे लेखक कष्टी होत नैसर्गिक साधनसंपत्तीपैकी असलेली बाभूळही नामशेष होईल अशीही भीती व्यक्त करतात. 
‘गोष्टी रंगल्या ओठी’ ही लेखकाच्या बालवयातील गंमतीदार गोष्ट शब्दरूप व्यक्त होताना स्वतःसह सलमा आणि गुलतुरा या त्रिकोणी नात्याला खूपच सुंदर आयाम देतात. बालमैत्रिण सलमा हिच्याशी माहीत नसलेलं पण जडलेलं नातं निखालस व उत्कंठावर्धक मांडतात. दोघांच्या नात्यात धर्म-जात, लिंग, वय याचा कसलाही अडसर होत नाही, शेतात माँसोबत आलेली सलमा गुलतुर्‍याची पाने चावून ओठ लाल करण्याचा अनोखा खेळ ती आणि लेखक खेळतात. त्यानंतर त्यांना जो काही बेदम मार पडतो त्याने त्या अल्लड जिवांची कायमची ताटातूट होते. असं स्त्री-पुरुष नातेसंबंधाविषयी आकर्षण वाटावं अशा वयात ते कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता आजच्या पिढीला सहज समर्पण शिकवून जातात.  
अशाच पुढील दहा कथा लेखकाची प्रगल्भता सिद्ध करत वेगवेगळा संदेश देतात. या सर्व ललित कथा त्यांच्या बालवयातील असून वयाच्या साठाव्या वर्षीही त्यांनी छान चितारल्या आहेत. खेड्यांचं झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या काळात ज्याला खरंच खेडं अनुभवायचं असेल त्याने नक्की ‘चांदणभूल’ हा ललित कथासंग्रह वाचला पाहिजे. या पुस्तकाला विवेक उगलमुगले या चिंतनशील प्रस्तावना लाभल्याने पुस्तकाची उंची खूप वाढली आहे, मुखपृष्ठ अरविंद शेलार तर अंतर्गत सजावट दीपक दंडवते यांनी नाविन्यपूर्ण रेखाटली आहे. पन्नास वर्षापूर्वीचं लेखक विजयकुमार मिठे यांचं आयुष्य म्हणजे आजच्या पिढीसाठी पुस्तकरुपाने लाभलेला अस्सल खेड्यातला गावरान मेवाच आहे. एक वाचक या नात्याने पुस्तक शब्द रुपाने भूल पाडणार्‍या अशा जेष्ठ साहित्यिकास खूप खूप शुभेच्छा. 

पुस्तक परिचय :- 
संजय डी. गोराडे (कथा-कादंबरी लेखक)
मो. नं - ९८५०६९१२१६, नाशिक.
                                                           
               

अणीबाणी


स्वातंत्र्य असूनही पारतंत्र्यात असल्याचा अनुभव, इंग्रजाप्रमाणे थोपलेल्या जुलमी राजवटीचा भारतीयांना झालेला पुन्हा एकदा साक्षात्कार आणि हिरावलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळविण्यासाठी कित्येकांना विनाकारण द्यावी लागलेली आहुती.
विजय जोशी लिखित व चपराक प्रकाशित ‘अणीबाणी’ पुस्तक वाचले आणि अणीबाणी शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने कळला. आपण आपल्या वाट्याला थोडीजरी तणावग्रस्त परिस्थिती आली तरी सहज बोलून जातो, ‘अणीबाणी आहे का ?’ किंवा हल्लीच्या सरकारला उद्देशून हा शब्द बोलल्याचे सतत कानावर पडते आहे. मात्र ‘अणीबाणी’ पुस्तक वाचल्यावर ती व्यक्ती ‘अणीबाणी’ शब्दाचा नक्की खूप जपून वापर करेल असे वाटते. 
 अणीबाणीत ज्यांनी काही काळ तुरुंगवास भोगला व जुलमी राजवटीचा जुलूम सोसला असे विजय जोशी यांनी अनुभवातून लिहिलेले ‘अणीबाणी’ पुस्तक आजच्या पिढीला कधी काळी लोकशाहीला कलंक ठरलेल्या इतिहासाबद्दल खूप काही माहिती सांगणारे आहे. 
भारताच्या इतिहासामधील १९७५ ते १९७६ दरम्यान २१ महिने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी अणीबाणी लागू केली होती. याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारत प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. कारण अलाहाबाद उच्च न्यायलयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला होता. १९७१ च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी व यंत्रणेचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत पुढील सहा वर्ष लोकसभेची व विधानसभेची निवडणूक लढविता येणार नाही असा निकाल दिला होता. मात्र भ्रष्टाचार सिद्ध होऊही राजकीय महत्वाकांक्षेपायी इंदिरा गांधी सत्ता सोडायला तयार नव्हत्या. परिणामी अणीबाणी लागू करत जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाचपेयी, जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक राजकीय विरोधकांना त्यांनी तुरुंगात डांबले होते, तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली होती. कोणीही त्यांच्या विरोधात ब्र शब्द जरी उच्चारला तरी कारवाई म्हणून वीस कलमी कार्यक्रम त्यांनी तयार केला होता. तो असा. 
१. अणीबाणीस विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यास किंवा सत्याग्रहीस शिव्या देऊन अपमानित करणे व धिंड काढणे, २. सत्याग्रहीस विवस्त्र करून यातना देणे. ३. सत्याग्रहींना अटक केल्यानंतर त्यांना काही दिवस झोपू न देणे व उपाशी ठेवणे. ४. सत्याग्रहींच्या शरीरावर सिगारेटचे व मेणबत्यांचे चटके देणे. ५. अटक झालेल्या कार्यकर्त्यांना उलटे लटकवणे. ६. गुप्तांगात दांडा घुसवणे. ७. डोळ्यांत व गुप्तांगात लाल मिरचीची पावडर टाकून छळ करणे. ८. खुर्चीप्रमाणे उभे करून यातना देणे. ९. हातापायाची नखे उपटून काढणे. १०. विजेचे शॉक देणे. ११. झाडाला उलटे टांगून मार देणे व दहशत पसरवणे. १२. केस जोराचे उपटणे व भिंतीवर डोके आपटणे. १३. विवस्त्र करून बुटाने तुडवणे. १४. रोलर फिरवणे. १५. तळपायावर काठीने किंवा वेताने मांस येईपर्यंत मारणे. १६. इंग्रजी Z अक्षरासारख्या स्थितीत तासनतास उभे करणे. १७. अंडकोषाच्या गाठी दाबून वेदना देणे. १८. कडाक्याच्या थंडीत रात्रभर नागवे उभे करणे व थंड पाणी टाकणे. १९. झोपवून कोपरावर चालण्यास भाग पाडणे. २०. हाताच्या बोटात छडी ठेवून दाबणे  व गुडघ्यात दांडा ठेवून दाबणे. 
असे प्रकारचे अनन्वीत अमानवी अत्याचार अणीबाणीच्या काळात निरपराध जनतेवर केले गेले. तसेच महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीजसेवा खंडित केली गेली. एक प्रकारची हुकुमशाही राजवट सुरु झाली. कुणालाही आपले मत खुलेपणाने मांडता येत नव्हते किंवा आवाज उठवता येत नव्हता. असा लोकशाहीला काळींबा ठरलेला एकवीस महिन्यांचा काळ व त्याविरुद्ध दिलेली झुंज विजय जोशी यांनी ‘अणीबाणी’ पुस्तकात नेमकेपणाने मांडली आहे. 
अणीबाणी पुस्तक वाचताना अनेक गोष्टींची उकल होते. त्यात महत्त्वाची उकल पुस्तकाचे शीर्षक ‘अणीबाणी’ शब्दाबद्दल होते. इतिहासातही रूढार्थाने ‘आणीबाणी’ शब्द याप्रमाणे  वापरल्याचे निदर्शनास येते. मात्र तज्ञांच्या मते ‘अणीबाणी’ असा आहे. अणी म्हणजे निकाराची झुंज. तसेच अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या आणि सामाजिक संस्थाच्या नावांची ओळख होते, ज्यांनी अणीबाणीत स्वतःसह आपला संसार डावावर लावला व पुन्हा स्वातंत्र्य मिळविण्यास मोलाचे योगदान दिले. 
वाचक म्हणून अणीबाणी पुस्तक मला इतिहासाची नव्याने ओळख करून देणारे वाटले. कादंबरी नाही पण कादंबरीच्या अंगाने जाणारे पुस्तक असल्यामुळे ते अजिबात कंटाळवाणे वाटत नाही. किरकोळ एकदोन त्रुटी वगळता पुस्तक नव्या पिढीसाठी नक्कीच महत्त्वाचा दस्तावेज आहे. पुस्तकाला तितक्याच तोलामोलाची प्रस्तावना घनश्याम पाटील यांनी लिहिल्याने वाचक पुस्तक वाचण्यास प्रवृत्त होतो हे खासकरून नमुत करावेसे वाटते, अशा प्रत्यक्ष अनुभावावर आधारित असलेल्या ‘अणीबाणी’ या अस्सल ऐतिहासिक पुस्तकाचा वाचक भरभरून स्वागत करतील अशी आशा करतो.  लेखक  व प्रकाशकांच्या या निर्मितीला शुभेच्छा देतो. 

पुस्तक - अणीबाणी 
लेखक - विजय जोशी 
प्रकाशन – चपराक प्रकाशन 
प्रस्तावना - घनश्याम पाटील 
मूल्य - १५०रुपये.

पुस्तक परिचय – संजय द. गोराडे (नाशिक) 
मो नं – 9850691216.

सोमवार, 15 मार्च 2021

सदाशिव (भयकथा)


सासुरवाडीहून म्हणजे पिंपळगावहून चांदोरी-सायखेडामार्गे मी माझ्या गावी बारागाव पिंपरीला बाईकने जात होतो. दुपारचे दोन अडीच वाजले असतील. बाईकवर होतो तरी उन्हाच्या झळा माझं अंग होरपळून काढत होत्या, बाईकच्या वेगासोबत तर अधिकच भाजून काढत होत्या, आगीच्या भट्टीतून आपण बाईक चालवत आहोत असेच मला वाटत होते. तरी मेव्हुणा म्हणत होता, ‘दाजी ऊन खाली झाल्यावर जा !’ पण मीच ऐकले नव्हते, एक-दीड तासात गावी पोहचेल म्हणत मी भर उन्हाचे निघालो होतो. अर्धेअधिक अंतर चालून आल्यावर वाटू लागले होते ; आपण मेव्हुण्याचे ऐकायला हवे होते. डोक्यावरचा कलेला सूर्य आगीचे मोठमोठे गोळे माझ्यावर बरसवत मला ‘तावून सुलाखून निघणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खूपच दाहकपणे समजून सांगत होता. 
मी घटकाभर विश्रांतीसाठी रस्त्याने सावली शोधू लागलो. रस्त्याच्या कडेला एखादे झाड दिसते का पाहू लागलो. बाईकने बरेच अंतर कापल्यानंतर एका ठिकाणी लिंबाऱ्याच्या झाडाची सावली नजरेस पडली. शेजारीच आंब्याचेही झाड होते. दोन्ही झाडं छान हिरवीगार डाफळलेली होती. ती घनदाट थंडगार सावली पाहून मी लागलीच बाईक वळवली. बाईक स्टँडवर उभी करताना लिंबाऱ्याच्या झाडाच्या बुंद्याशी असलेला चौथरा नजरेस पडला. चौथरा कुठल्या तरी साधूसंताच्या नावाने बांधलेला दिसत होता. मी चौथऱ्यावर बसता-बसता मूर्तीच्या पायथ्याशी लिहिलेली अक्षरे वाचू लागलो, ‘सदाशिव...!’ पुढची अक्षरे तेलाने काळपट पडून दिसेनाशी झालेली होती. कोणीतरी योगी पुरुष असावेत मी अंदाज केला. भोवताली नजर टाकताच दूरदूरपर्यंत वस्ती दिसत नव्हती. असेल कशी म्हणा, सर्वत्र जिरायती मुरमाटी बरडाची जमीन होती, गवताचा तर उन्हाने वाळून पाचोळा तयार झाला होता, आडरानी आढळलेली दोन झाडे एखाद्या कल्पवृक्षासारखी मला भासली होती, मी कपाळावरचा घाम रुमालाने टिपत मोठा सुस्कार टाकला. आता मला निंबाऱ्याच्या घनदाट सावलीत खूप हायसे वाटले होते. अजून काही काळ मला सावलीचा आश्रय मिळाला नसता तर मी नक्कीच उष्माघाताचा बळी ठरलो असतो, परंतु कोण हे सदाशिव महाराज अशा विरान ठिकाणी मदतीला धावून आले अन माझ्या अंगाची होणारी काहली थांबली, मी नकळत त्यांना हात जोडले होते.
चौथरा निर्मनुष्य ठिकाणी असूनही खूप साफसूफ होता. कोणीतरी देखभाल करणारा असावा, जो चौथऱ्याची नित्य खूप आस्थेने निगा राखतो आहे. माझी सुखावलेली नजर चौथरा निहाळत असताना माझ्या कानांवर आवाज पडला, “कोण गावचं पाव्हणं म्हणायचं ?” 
मी झर्रकन आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं, समोर काष्टी धोतर नेसलेले, नेहरू शर्ट घातलेले व डोक्यावर गांधी टोपी असलेले एक पन्नाशी ओलांडलेले काळासावळे गृहस्थ मला उभे दिसले. प्रथम मी आकस्मित आलेल्या आवाजाने घाबरलो होतो, पण पटकन मी स्वतःला सावरलं. त्यांच्या काखेतली चटई पाहून तेही बहुदा उन्हाची विश्रांती करायला आले असावे. मी आदबीने उत्तर देत म्हणालो, “मी पिंप्रीचा !” 
चौथऱ्याच्या दुसऱ्या कडेला चटई अंथरत व त्यावर बुड टेकवत त्या गृहस्थांनी पुन्हा प्रश्न केला, “कोणत्या पिंप्रीचं, बारागाव पिंप्रीचं की पाटपिंप्रीचं ?” 
“बारागाव पिंप्रीचा !” त्या गृहस्थांना सिन्नर तालुक्याची बारीकसारीक माहिती दिसत होती.    
“मग इकडं कुठं ?” त्या गृहस्थांनी प्रश्न केला.  
“बसवंत पिंपळगावलां गेलो व्हुतो, तिकडून येऊन रायलो !” मी निःसंशयी  उत्तर दिलं. 
“असं असं...!” माझ्या उत्तराने त्या गृहस्थांचे समाधान झालेले दिसत होते, अधिक काही न विचारता मोठा उसासा टाकत ते पुढे म्हणाले, “या वर्षी ऊन लईच मरणाचं हाये बुवा !” 
“हो ना, गाडीवर चाललोय तरी जीव पाणीपाणी करून राहायलाय, म्हणून म्हटलं उन्हाचं घटकाभर सावलीत बसावं !” मीही दुजोरा दिला होता. 
“बसा बसा...मीही आपलं दररोज उन्हाचं येथ आराम कराया येतुया !” ते गृहस्थ चटाईची वळकुटी पसरवत म्हणाले.  
माझ्याकडे तोंड करून चटईवर एक कानी झोपलेल्या त्या गृहस्थांकडे पाहत मी म्हणालो, “करा करा... मीही थोडं थांबतो अन निघतो !”
“ऊन खाली झाल्यावरच जावा आता !” त्या गृहस्थांनीही तोच सल्ला दिला ; जो पिंपरीला निघताना मघाशी मेव्हुण्याने दिला होता.  
“हा... थोडंसं बसतो !”
दुपारची वामकुक्षी घेण्याच्या तयारीत असलेले ते गृहस्थ निद्रादेवीची प्रतीक्षा करू लागले. त्यांना जागे काही झोपलेले पाहून मी सहज प्रश्न केला, “काका, हे सदाशिव महाराज कोणी संत-महंत होते का ?” 
“पोरा, हा लहान भावाने मोठ्या भावाच्या स्मरणार्थ बांधलेला चिरा हाय, जो गेल्याच साली बांधलेला हाय !” ते गृहस्थ पुन्हा उठून बसले. 
सदाशिव महाराजांच्या मूर्तीवरून माझी नजर हटवत त्या गृहस्थांकडे पाहत उद्गारलो, “असं आहे का ते !”   
“व्ह्य.... ती खूप मोठी हकीकत हाये दोघा भावांची !”
 ते गृहस्थ सदाशिव महाराजांची हकीकत सांगू लागले. 
सदू आणि महादू दोघे भाऊ होते. सदू मोठा तर महादू लहान होता. त्यांचा शेती व्यवसाय होता. ते पारंपारिक पध्दतीने बैलांच्या मदतीने शेती करत असत. मिरगाचा पाऊस चांगलाच पडून गेल्याने इतर शेतकर्‍यांप्रमाणे सदू आणि महादूचीही शेतात बाजरीचं बियाणं पेरण्याची धावपळ सुरू झाली होती. 
बरडाच्या जमिनीत अर्ध-अधिक पेरून झालं होतं, सदू पाभरीने पुढे पेरत होता तर महादू राहाख्याने मागे ते ढाळत (सपाट करणे) होता. वावराच्या कडेला पोहचलेला महादू आऊत मागे वळवत असताना त्याचं लक्ष सहज पुढे पेरत चाललेल्या सदूच्या आऊताकडे गेले. बैलं हाकारत पेरत पुढे चाललेल्या सदूच्या दोन्ही पायांच्या मधे पांढरं-शुभ्र पात्यासारखं काहीतरी वळवळताना चमकलेले त्याला दिसले. निरखून पाहताच त्याच्या काळजात धस्स झाले. एक भला मोठा साप पाभरीच्या दात्यांमध्ये गुरफटलेला होता. पाभरीच्या दात्यांमध्ये अडकलेला तो साप आऊतासोबत फरपटत-फरपटत चालला होता. सात-आठ पावलं त्याची ती जीवघेणी फरपट तशीच चालू होती. कशीतरी सापाने स्वतःची पाभरीच्या दात्यांमधून सुटका करून घेतली ; तोच सदूचा पाय सापावर पडला. कामात मग्न सदूने सापाच्या शेपटीवर पाय देताच तो चवताळला, अन फूस करत त्याच्या उजव्या पायाला डंख मारत कडाडून डसला. चावा घेऊन पलटी झालेला साप पुन्हा सोयीचा होत जवळच असलेल्या गवतात मरणाच्या भीतीने सळसळ करत निघून गेला.
डोळ्यांदेखत सदूला झालेला सर्पदंश पाहून महादू खूप घाबरला. आता आपला भाऊ सापाच्या विषारी दंशामुळे मरणार या विचारानेच त्याच्या काळजात धडकी भरली. ती घटना इतकी निमिषार्धात घडली होते की, तो सदूला सावधही करू शकला नव्हता. कळले तेव्हा साप गवताचा आश्रय घेत गायब झाला होता. काय करावं काही त्याला सुचेना. त्या आडरानात चिटपाखरूही नजरेत पडत नव्हते, जे मदतीला धावून येईल. काय करावे ? कुणाला बोलवावे ? तो हादरून गेला होता.  
सदूचं मात्र काही झालंच नाही असं पेरणी करायचं काम चालू होतं. त्याच्या गावीही नव्हते की, आपल्याला साप चावला आहे. आऊताच्या सहा-सात तासाच्या फेर्‍या झाल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, महादूने आऊत थांबवलेले आहे, व तो चमत्कारिक नजरेने आपल्याकडे पाहतो आहे. महादूचं ते खुळ्यागत एकटक आपल्याकडे पाहणं विचित्र वाटल्याने त्याने पण आऊत थांबवून विचारणा केली, “काय रं... काय झालं, असं काय येड्यागत पाहतोया !”
साप चावूनही धडधाकट असलेल्या भावाकडे महादू अविश्वासाने पाहत होता. सापाच्या विषारी दंशाने कोणीही असो वाचण्याची सुतरामसुद्धा शक्यता नव्हती, पण सदूला काहीही झालेले नव्हते. तो विस्मय चकित होत म्हणाला, “काय नाय, असंच पाहतोया, कौतुक वाटतंया, तू लयीच पक्का हाय !” 
“म्हणजे ? समजलो न्हाय !” काम थांबवून हा काय वेड्यागत बडबडतो आहे, बोलणे विषयाशी सुसंगत न वाटल्याने सदू संभ्रमित झाला होता.  
‘सापाचं इष लगेच नायतर हळूहळू अंगात भिणत असण !’ मनात विचार येताच महादू बांधावरच्या निंबाची एक छोटी फांदी मोडून घेऊन आला. व सदूच्या समोर धरत म्हणाला, “ते राहू दे... हा निंबाचा पाला खा, कडू लागतूया का, पहा ?”
“मी जनावर हाय व्हय, निंबाचा पाला खाया !” देणं न घेणं आणि कंदील लावून येणं, मधेच नको ते खुसपट काढलेले पाहून सदू त्याच्यावर डाफरला होता.  
विषारी साप चावल्यावर निंबाचा पाला खाल्ला तर कडू लागत नाही असं महादूने कुठंतरी ऐकलं होतं. आता त्याला ते आठवताच तो लागलीच निंबाची छोटी फांदी तोडून घेऊन आला होता. मन चिंती ते वैरीही न चिंती, मनात नको-नको त्या घोंघावणार्‍या विचारांची खात्री तरी करून घ्यावी ; साप विषारी आहे की बिनविषारी. तो आग्रह करत म्हणाला, “खा तरी, आयुर्वेदिक असतुया, मी म्हणतू म्हणून खा !”
“आण !” वैतागल्यागत सदूने त्याच्या हातातून निंबाची फांदी हिसकावून घेतली. लहान मुलागत हा असा काय वागतो आहे हे त्याला अजिबात कळत नव्हते. लहान भावाचा नादानपणा पुरावायचा म्हणून त्याने निंबाचे तीन-चार पाने तोडून कचंकचं चावली. माळरान शेतातला कडूनिंब तो ; त्याच्या पानापानांत खचून कडूपणा भरलेला होता. खाताच त्याला भयंकर कडू लागला होता. तोंड वेडंवाकडं करत तो म्हणाला, “लेका किती कडू हाय, काहीपण खाया सांगतूया !”
“काही नाय... बिनइषारी हाय !” 
निंबाचा पाला खाऊन सदूचं वेडंवाकडं झालेलं तोंड पाहून महादूला गंमतही वाटली होती आणि मनाला धीरही आला होता. ‘काळ आला हुता पण येळ आली नव्हती !’ मनोमन म्हणत त्याने देवाचे आभार मानले होते. चावलेला साप एकतर बिनविषारी तरी असावा किंवा विषारी असेल तर त्याच्या विषदंती वेळेवर प्रसरण तरी पावल्या नसाव्या. मनाला समजूत घालणारे असे वेगवेगळे अंदाज तो मनात बांधत होता, मात्र त्याने एका गोष्टीची विशेष खबरदारी बाळगली होती. त्याला झालेल्या सर्पदंशाबद्दल चकार शब्दाने देखील त्याने वाच्यता केली नव्हती, कारण सदू एक नंबरचा भित्रा आहे हे त्याला चांगलेच ठाऊक होते. उगाचच तो न घडलेल्या घटनेचा व्यर्थ विचार करत बसेल आणि नको त्या गोष्टीचा धसका घेऊन अनर्थ ओढावून घेईल असे त्याला वाटले होते. 
तोंडातील निंबाच्या पानांचा हिरवा चोथा ‘थू-थू’ बाजूला थुंकत सदू म्हणाला, “निंबाचा पाला इषारी नव्हं कडू असतूया !”
“मला वाटलं, इषारी असतूया... !”
महादू गंमतीने त्याच्या अजाणतेपणाची फिरकी घेत हसत होता. त्याच्या हसण्यात भाऊ सुखरूप असल्याचा आनंद ओतप्रोत होता.  
एक वर्षानंतर 
सदू आणि महादू सालाबादप्रमाणे बरडाच्या जमिनीत बाजरीच्या बियाणाची पेरणी करत होते. अर्ध-अधिक पेरून झालं होतं. बैलांना विसावा व औतकर्‍यांना पाणी प्यायचे म्हणून औतं उभी केली होती. पाणी पिता-पिता महादूला मागच्या वर्षाची घडलेली घटना आठवली. मागच्या वर्षी या वावरात पेरणी करत असताना सदूला साप चावला होता. तो साप पाहूनच मूर्च्र्छा येईल इतका तो भयंकर होता. मात्र सदूला त्या सापाच्या दंशाने काहीही झाले नव्हते. उलट गेल्या एक वर्षात त्याला साधा तापदेखील आला नव्हता. सापाचे विष पचविणारा सदाशिव म्हणजे शंकराचाच दुसरा अवतार आहे की काय असे त्याला वाटले होते. असेही सदाशिव म्हणजे शंकराचे दुसरे नाव आहे. त्याच्या या बहादूरीचे त्याला नेहमीच कौतुक राहिले होते, पण त्याची ही बहादूरी त्याने कटाक्षाने इतरांजवळ सांगण्याचे टाळले होते. एक वर्षापासून मनाच्या कुपित बंद करून ठेवलेला भित्र्या भावाचा भीम-पराक्रम आज उघड करावा असे त्याच्या मनात आले होते, पण त्याचं साशंक मन त्याला परवानगी देत नव्हते.        
“दादा, मांगच्या वर्षी या वावरात तुझ्यासंग एक इपरीत घडले हुते. सांगितले असते, पण नग.. तू घाबरून जाशीन !” न राहूनही महादू बोलला होता.  
“नाय घाबरणार, सांग !” घटाघटा वाडग्याने पाणी पित असलेला सदू आश्वासकपणे बोलला होता.  
“नग, तू लय डरपोक हाय, मला ठाव हाय !” नकार देत महादूने मनातलं गुपित सांगायचं टाळलं होतं.  
“येक वर्षात काई झालं नाय, तर अता काय हुणार हाय ? सांग...!” सदू बेफिकीरेने बोलला होता.  
“पहाय बरं !” सदूची भयरहित मुद्रा पाहून महादूला त्याच्यातील भित्रेपणा चांगलाच कमी झालेला दिसला होता, तरी मनातले गुपित उघड करायला त्याचं मन चाचरत होते. खूप आग्रह केल्यावर अखेर टोपरा नको म्हणून तो शब्द सोडवून घेत म्हणाला, “परत मला दोष देशीन !”  
“नही देणार, सांग !” सदूला आता उत्सुकता लागली होती.   
“तू म्हणतू म्हणून सांगतूया !” त्याचा निडरपणा पाहून महादूला विश्वास आला होता. ‘येक वर्षात काई झालं नाय, तर अता हुणार हाय ?’ हे त्याचं म्हणणं त्याला पटलं होतं. जे काही व्हायचे ते तेव्हाच एक वर्षापूर्वी झाले असते. वर्षापासून मनात दडवलेलं गुह्य उघड करण्यास राजी होत तो म्हणाला, “मागच्या वर्षी याच वावरात त्या ठिकाणी एक इषारी साप तुला चावला हुता, पाहून तूही घाबरून गेला असता इतका तो मोठा हुता, पण तुला त्याच्या डसण्याने काईच झालं नही !” 
“काय सांगतूया !” ऐकूनच सदूच्या तोंडाचा धक्का बसल्यागत ‘आ’ झाला होता.   
“खरं सांगतूया... देवाशपथ !” निलकंठेश्वराप्रमाणे हलाहाल पचविणार्‍या त्याच्या धाडसाबद्दल महादू विश्वास देत कौतुकाने म्हणाला, “तू फकस्त मनाने डरपोक हाय, शरीराने नाय !” 
घडलेली हकीकत मग महादू मिठमिरची लावून रंगवून रंगवून सांगू लागला, ‘गेल्या वर्साला आपुन  दोघं या वावरात पेरणी करत हुतो... एक भला मोठा साप तुया औताखाली म्हंजे पाभरीच्या खाली आला हुता... पाभरीच्या दात्यांमधे अडकलेला इषारी साप खूप प्रयत्नांनी सुटला... पुढं तो साप तुया पायाखाली आला... तू पाय दिल्याने सापाने तुया उजव्या पायाला डंख मारला... मी खूप घाबरलू... तुला मात्र काईच झाले नव्हते... मी तुला निंबाचा पाला खाया लावला... असं वैगरे वैगरे...!’ मनात एक वर्षापासून दाबून ठेवलेलं रहस्य रित करताना किती आणि कसं सांगू असं त्याला झालं होतं. 
बराच वेळ झाला उभी केलेल्या औताची जनावरं कंटाळली होती, तरी महादू बोलायचं थांबत नव्हता. भारतातील सर्वात विषारी जातीच्या सापाचे विष पचविणारा सदाशिव त्याच्या लेखी जगातल्या सात आश्चर्यापैकीच एक होता, गर्व करावी अशी ती घटना तो कौतुकाने तोंडाला फेस येईपर्यंत सांगत होता. मात्र बोलताना एक गोष्ट तो अजूनही बिलकुल विसरला नव्हता. सदू प्रमाणापलिकडंचा भित्रा आहे. त्याला त्याच्या जिगरबाजपणाची जाणीव करून देणं गरजेचं आहे. त्याच्यात आत्मविश्वासाचं बळ भरत हिंमत वाढवणं आवश्यक आहे. नाहीतर नको तो अनर्थ व्हायचा.  
विनाकारण खांद्यावर जू घेऊन उभे असलेल्या बैलांपैकी एका बैलाने जू सांडवले तेव्हा गप्पांत दंगलेला महादू बोलायचा थांबला. वेळ बराच झालेला पाहून दोघं भाऊ काळजी करावी तसे उठले व राहिलेलं वावर पुन्हा जोमाने पेरायला भिडले. सूर्य मावळतीकडे झुकलेला प्रथमच त्यांना दिसला होता. आजच्या आज बरडाची पट्टी त्यांना पेरायची होती. हयगय न करता ठरलेलं काम पूर्ण करायला पुन्हा नेटाने ते जुंपले होते. तासातासाने पेरायचे वावर कमी होत होते. पेरत असताना सदूचे औत त्याला साप चावला होता त्या ठिकाणी पोहचले असेल-नसेल, अचानक त्याला काय झाले कुणास ठाऊक ! तो धाडकन जमिनीवर कोसळला. पाठीमागे राहाख्याने पेरलेलं वावर ढाळत असलेल्या महादूने ते उघड्या डोळ्यांनी पाहिलं, आणि हातातील औत तेथेच सोडून देत घाबरून त्याने त्याच्याकडे धाव घेतली. 
इतक्यात चांगले गप्पा मारत होतो, अचानक काय झाले त्याला ? काहीच कळायला मार्ग नव्हता. घाबरलेला महादू त्याच्याजवळ पोहचताच त्याने प्रथम त्याचा श्वास आणि नस दोन्ही हात लावून तपासून पाहिले. दोन्हीही थांबल्यासारखे भासले. घाईघाईने उठून बसवत तो त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला, पण सगळं अचेतन होतं. धावतपळत जाऊन बांधावरच्या मटक्यातले गार पाणी आणले, त्याच्या चेहर्‍यावर शिंपडले, पण अजिबात सादास प्रतिसाद मिळत नव्हता. मनात भीती होती तेच अखेर घडले होते. साप चावला आहे या हैबतीने तो गतप्राण झाला होता. आपला भाऊ जग सोडून निघून गेला आहे हे समजताच त्याने टाहो फोडला, “दा... दा...!”
पावसाने हिरवं होऊ पाहणार्‍या रानाला चिरत महादूची ह्रदयद्रावक साद कितीतरी वेळ प्रतिसाद होऊन सगळ्या रानात घुमत होती ; काळजाला चिरावी तशी. एक वर्षापूर्वी चावलेला साप पण त्याने आता सदूचा जीव घेतला होता. विनाकारण मानगुटावर बसलेलं भीतीचं भूत इतकं सगळं समजावूनही अखेर जीवघेणं ठरलं होतं.
*** 
“अशी दोघा भावांची हकीकत, म्हणून महादूनं आठवण म्हणून हा शेताच्या कडंला चिरा बांधलेला हाय !” 
ते गृहस्थ स्वतःची हकीकत सांगावी इतके त्यात गढून गेले होते. त्यांच्या प्रत्येक शब्दांगणित दोघा भावांचा पट हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहिला होता. त्यांनी इतके आत्मितेने सदाशिव महाराजांच्या शेताच्या कडेला मूर्ती स्थापनेमागची कथा ऐकवली होती की, मनात विचार आला, हे नक्कीच सदूचे लहाने बंधू महादू असले पाहिजे. चौथरा आणि चौथऱ्यावरील मूर्तीची स्थापना अलीच्या काळातील होते, त्यावरून अंदाज करत मी सहज प्रश्न केला, “तुम्ही सदाशिव महाराजांचे लहान बंधू महादू का ?”
त्या गृहस्थांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर टाळले होते, बहुतेक त्यांना माझा प्रश्न बालसुलभ व निर्थक वाटला असावा. राग आल्याने बोलायचे असूनही न बोलत ते गुळणा धरावे तसे गप्प झाले. राग आला की काय म्हणून मी माफी मागणार तेवढ्यात ते उद्गारले, “नाही, मी सदू !”
उत्तर ऐकताच भर उन्हाळ्यात माझ्या अंगावर भीतीचा काटा फुलला होता. ते अबोल गृहस्थ आणि चौथऱ्यावरील मूर्ती प्रथमच मला मिळतीजुळती भासली होती. आडरानात आपण एकटे, आपली गाठ भूताखेताशी पडली तर नाही ना ! मनात नकोनको ते विचार येताच माझ्या उभ्या अंगाला कापरे सुटले होते. तसा माझा भूताखेतावर विश्वास नाही, पण रिकामं मन भूताचं घर असतं, भीतीने मेल्याहून मेल्यासारखे झाल्याने मला ओरडताही येईना आणि पळताही येईना, माझी भावस्था ओळखून ते गृहस्थ माझ्याकडे वळून न पाहत निमुटपणे खाट्या वावराच्या बांधाबांधाने मागे हात टांगत निघून गेले. मी त्या गृहस्थांची पाठ फिरताच बाईकला किक मारत तेथून पळ काढला. बारागाव पिंपरी येईपर्यंत मी साधं मागे वळूनसुद्धा पाहिले नाही. 
त्या गृहस्थांचे नावही योगायोगाने सदाशिव असेल कदाचित किंवा मला एकटे पाहून त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न करत माझी फिरकीही घेतली असेल ; देवच जाणे. मी मात्र आजतागायत त्या मार्गाने परत कधीच गेलो नाही. जी चूक सदाशिवबाबत महादूकडून केली ; ती मी माझ्याबाबत करणे शक्य नव्हते. सौभाग्य मनातील ती धास्ती माझी जीवघेणी ठरली नाही.         
          ******** 
 
© कथा लेखक - संजय द गोराडे (नाशिक)
मो. नं - ९८५०६९१२१६
ईमेल - goradesd@gmail.com

   

 

निर्णय (कथासंग्रह)


वाचकाचे प्रबोधन करणारा 'निर्णय' कथासंग्रह

“निर्णय” म्हणजे एक धाडसच होय.
प्रत्येकाला आयुष्यात पदोपदी वेगवेगळे निर्णय हे घ्यावेच लागतात. काही निर्णय आपल्याला सुखावून जातात तर काही दुखावून जातात. काही निर्णय आपल्याला सफल करतात, तर कधी कधी घेतलेले निर्णय विफलही करतात. परंतु माणसाला आयुष्यात निर्णय घेणे अपरिहार्यच आहे हे नक्की. निर्णय घेतांना शक्यतो आपण तो आपल्या सदविवेकबुद्धीला पटेल असाच घेत असतो. अर्थातच ज्या परिस्थितीत तो निर्णय घेत असतो त्यात त्या परिस्थितीचे योग्य ते विश्लेषण केलेलं असतच. कधी कधी एखाद्या निर्णयावर येण्यासाठी तेवढा वेळही हाती नसतो आणि असलाच तर त्यावेळेस काही सुचेलच असेही नसते. पण निर्णय तर घ्यावाच लागतो. चांगला अथवा वाईट, जो काही असेल तो निर्णय घ्यावाच लागतो आणि नियतीचा तसाच रेटाही असतो. एक मात्र नक्की की, आपण घेतलेले निर्णय जर पूर्वग्रहदुषित नसतील आणि आपल्या सदविवेकबुद्धीला पटलेले असतील व तितक्यात अंतर्मनाने घेतलेले असतील तर ते निर्णय कधीच चुकत नाहीत. त्या त्या काळात ते घेतलेले निर्णय हे योग्यच असतात. कालांतराने जर का ते आपल्याला अयोग्य अथवा चुकीचे वाटत असतील तर तो त्या निर्णयाकडे पूर्वगृहदुषित होऊन बघण्यातला दोष आहे असे मला तरी वाटते.
तुम्हीं म्हणाला की अहो कामठे एवढे तत्वज्ञान कशाला पाजळताय ! जे काही असेल ते जरा स्पष्टच सांगा ना ! अगदी बरोबर ओळखलंत मित्रांनो. त्याचं कारण ही अगदी तसचं आहे. १९ ऑक्टोबर २०१९ ला चपराकच्या साहित्य महोत्सव २०१९ मध्ये चपराक दिवाळी अंकाबरोबरच अजून आठ पुस्तकांचे डॉ. प्र. चिं. शेजवलकर सर आणि पंडित वसंतराव गाडगीळ ह्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यात नाशिकचे लेखक श्री. संजय गोराडे ह्यांच्या “निर्णय” ह्या कथासंग्रहाचेही प्रकाशन झाले. नुकताच हा कथासंग्रह मी वाचला आणि त्यावर माझे मनोगत व्यक्त करण्याची सुप्त इच्छा झाली म्हणून हा लेख प्रपंच.
“कोणत्याही घटनेबाबत, धोरणांबाबत आयुष्यात ज्याला निणर्य घेता येतो त्याची यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते” असे एक वाक्य चपराक प्रकाशन चे संपादक श्री. घनश्याम पाटील सरांचे ह्या पुस्तकाची पाठराखण (ब्लर्ब) वर वाचले आणि ह्या पुस्तकाबद्दलची उत्कंठा वाढली.
त्यात ह्या पुस्तकाला “वाचकांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या कथा” अशी अतिशय समर्पक प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक आणि संशोधक, लेखक श्री. संजय सोनावणी ह्यांची लाभली आहे म्हटल्यावर ह्या पुस्तकाचे साहित्यमूल्य निश्चितच वाखाणण्याजोगे असणार ह्यात शंकाच नव्हती.
ह्या कथासंग्रहात एकूण आठ कथा अशा काही प्रसंगावर अथवा घटनांवर आधारित आहेत की ज्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात कधी ना कधी घडतच असतात किंवा आपल्या आसपास तरी घडलेल्या असतात. ह्या कथानकातून लेखक संजय गोराडे वाचकांना अतिशय समर्थपणे त्यांच्या लेखन शैलीने भारावून टाकून अगदी कथेत समरस करून टाकतात. ह्या कथा वाचतांना आपण इतके एकरूप होऊन जातो की काही काळ तो प्रसंग अथवा ती घटना आपल्याच बाबतीत घडलेली आहे असे वाटते. कथा वाचता वाचता एकवेळ तर असे वाटते की मी जर ह्या जागी असतो ना तर असाच काहीसा निर्णय घेतला असता ! वगैरे वगैरे. त्यांमुळेच ह्याचे सर्व श्रेय संजय गोराडे ह्यांना निर्विवादपणे द्यायला हवे.
“निर्णय” ही कथा तर आकस्मितपणे आयुष्याच्या एका टप्यावर आलेले अनोखे वळणच ! त्या वेळेस योग्य तो निर्णय घेतांना नात्यात आलेला ताण तणाव, संकोच, अपराधीपणाची भावना इत्यादी संजय गोराडे ह्यांनी अतिशय खुबीने लिहून वाचकांना अंतर्मुख केले आहे.
“बळीराजा” ही कथा तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची झालेली वाताहत व त्याला आत्महत्येला प्रवूत्त करणाऱ्या आपल्या समाज संस्थेला दिलेली एक चपराकच आहे. काळीज हेलावून टाकते ही कथा.
“संगत” ही कथा तर सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याला लागलेली एक कीडच व्यक्त करतांना समाज प्रबोधनही करून जाते.
“मोहमाया” ह्या कथेतून लेखकाने माणसाच्या अभिलाषी वृत्तीची अतिशय छान ओळख करून देवून अशा वृत्तीचे दुष्परिणाम दाखवून आयुष्यात निर्णय घेतांना किती गोष्टींचा विचार करायचा असतो हे सादोहरण दाखवले आहे.
“बीज” ह्या कथेतून लेखकाने अतिशय वेगळ्या समस्येवर प्रकाशझोत टाकून एक वेगळाच विषय वाचकांसमोर मांडला आहे व त्यावर विचार करायला भाग पाडले आहे.
“लोकल” ह्या कथेने कितीही कठोर माणूस असला तरी हळवा झाल्याशिवाय रहात नाही. इतकी भावविवश करणारी आणि अक्षरश: डोळ्यातून अश्रू वाहण्यास लावणारी ही कथा म्हणजे कितीही प्रतिकूल परिस्थितीत माणूस असला तरी जर का त्याचे कुटुंब त्याच्या बरोबर असेल तर तो कितीही कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकतो हे प्रतिबिंबित करण्यात संजय गोराडे ह्यांच्या लेखणीला निश्चितच यश आले आहे.
“कोन” ही कथा आयुष्यात आपल्या जोडीदाराला गृहीत धरून चालल्यावर ज्या काही समस्या उदभवतात त्यावर कसा तोडगा निघतो व योग्य तो निर्णय कसा घेतला जातो हे ही कथा वाचल्यावर कळते.
शेवटी, “बहुगुण” ही कथा “निर्णय” ह्या कथेशीच एकरूप होणारी आहे.
एकंदरीत संजय गोराडे ह्यांच्या सर्वच कथा अतिशय वाचनीय तर आहेतच परंतु त्या वाचकाला खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी होतात त्याच बरोबर ह्या कथांमधून अप्रत्यक्षरीत्या एक प्रकारचे समाज प्रबोधनही होते आहे असे मला अतिशय प्रकर्षाने जाणवले.
श्री. अरविंद शेलार ह्यांचे अतिशय सुंदर व विषयाला साजेसे मुखपृष्ठ ह्या पुस्तकाला लाभले आहे.
श्री. संजय गोराडे ह्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेछ्या देतो. तसेच चपराक प्रकाशन चे सर्वेसर्वा श्री. घनश्याम पाटील सरांना ह्या उत्तम साहित्य संपदेबद्दल धन्यवाद देतो.

वाचकांनो हे पुस्तक जरूर विकत घ्या आणि वाचा व आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना, नातेवाईकांना भेट द्या. हे पुस्तक “चपराक”च्या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध आहे:
http://shop.chaprak.com/product/nirnay/ 

कथासंग्रह - निर्णय
प्रकाशक - “चपराक प्रकाशन” 
लेखक – संजय गोराडे 
मूल्य : रू १३०/- 

पुस्तक परिचय - लेखक रवींद्र कामटे (पुणे)

रविवार, 14 मार्च 2021

‘विठूमाउली की विठोबा’ (कवितासंग्रह)




‘विठूमाउली की विठोबा’ (कवितासंग्रह)
कवी – गणेश भाकरे

अवघ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या विठ्ठलाच्या चरणावर कवितासंग्रह रूपी शब्दफुले वाहत व वाली नसलेल्या समस्त शेतकरी वर्गाच्या दुःखाची त्यात मांडणी करत कवी गणेश भाकरे यांनी ‘विठूमाउली की विठोबा’ कवितासंग्रहात शेतकऱ्याचा सुपुत्र या नात्याने अनेक प्रश्नांना समर्पक वाचा फोडली आहे, शेतकऱ्यांच्या पाचवीला बाराही मास अठरा विश्वे दारिद्र्य पुजलेले असते, ते शेतकऱ्यांचे दुःख विठ्ठलाला दिसत नाही का ? शेतकरी विठूमाउली म्हणतो, तर माउली या नात्याने त्याला लेकराचे दुःख कळायला हवे. 
कुठे अति कुठे माती कसा खेळतो रे खेळ
कुणब्याच्या डोईवर नित्य दुःखाचं आभाळ
‘करू नको पांडुरंगा’ या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे कुठे इतके अति करतो की, तेथे उपभोग घेण्यासाठी कोणी नाही, कुठे इतकी आयुष्याची माती केली आहे की, त्यांचं सगळं जीवनच मातीमोल झालं आहे, जसे कुणब्याच्या डोईवर तर नित्य दुःखाचेच आभाळ असते, असा कुणब्यासंगे नित्य खेळ खेळत असलेला हा आपपरभाव बरा नाही, कोणतीच माउली मुलाच्या जीवनात इतकं दुःख पाहून स्वस्त बसत नाही, याउलट कवी अभिमानाने स्वतःच्या जन्मदात्री माउलीचे उदाहरण देत म्हणतो, 
माझ्या चेहऱ्याच्या हावभावावरून
मायला समजतं माझ्या आयुष्यातलं दुःख
अशी माझी मायमाउली...
तिला सारं कळतं न सांगता,
पण तुला कसं कळतं नाही विठोबा...
लहानपणी सतत मायेच्या छत्रछायेखाली कवी असायचे, तेव्हा तर मायेला मुलाचं दुःख सहज  कळायचं, पण आता कामानिमित्त ते शहरवासी आहे, ते जेव्हा कधी गावी गेले तर कवीच्या आईला त्यांच्या चेहऱ्यावरील नुसत्या हावाभावावरून त्याच्या वर्तमान जीवनातलं सुखदुःख लगेच कळतं असं कवी विनम्रपूर्वक सांगतो, तसं शेतकऱ्यांसाठी विठ्ठल माउलीच्या ठिकाणी आहे, तेव्हा माउलीला लेकरांचे दुःख लगेच कळायला हवे, पण आजच्या घडीला शेतकऱ्याच्या जीवनाचे फक्त मातेरे झाले आहे, तो कधीकाळी जगाचा पोशिंदा होता, त्यालाच आता एक वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे, हा जगण्यातला दुजाभाव पाहून कवी हळहळ व्यक्त करतो आहे, दरवर्षी आषाढी कार्तिकीला शेतकरी पंढरीला पायी चालत वारीसाठी जातो, पण विठोबा तुला लेकराच्या चेहऱ्यावरचे दुःख कधीच का दिसत नाही ! खरंच, तू शेतकऱ्यांची ‘विठूमाउली आहे का ? की फक्त विठोबा !’ असा थेट प्रश्न विठ्ठलालाच विचारत कवीने कवितासंग्रहालाच शीर्षक दिले आहे, ‘विठूमाउली की विठोबा’ 
शेतकऱ्यांची हालापेष्टा पाहून कवीच्या मनात विठ्ठलाविषयी नकळत शंका उपस्थितीत झाल्याने संग्रहातील प्रत्येक रचना बळीची व्यथा अधोरेखित करते आहे, मनाला शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न सतावत असल्याने त्यांनी कवितासंग्रहाला असे उद्गारवाचक शीर्षक दिलेले दिसते आहे, ‘विठूमाउली की विठोबा’. या कवितासंग्रहात शेतकऱ्यांच्या दुःखांबरोबर आजच्या सामाजिक प्रश्नांवरही बोट ठेवले आहे, आजच्या तयार झालेल्या विषमतेचेही विविध रचनातून रास्त वाभाडे काढले आहे, यातील सर्व कविता कवीच्या जगण्यातून आल्या आहे, जगण्याची जेव्हा कविता होते ; तेव्हा ती नक्कीच वाचकाच्या काळजाचा ठाव घेणारी ठरते. 
वेदनांचे फक्त l आम्हा घरी पेव l
म्हणूनिया देव l शोधतोय ll
कुणब्याने असे काय पाप केले की, त्याच्या नशिबी फक्त दारिद्र्यच आहे, ‘कसाबाला मिळे l बिर्याणीचे ताट l तुला मात्र वाट l मरणाची ll’ हा फरक स्पष्ट करत कवीने आजच्या राजकार्त्यांचा नाकर्तेपणाही कौशल्याने खोडून काढला आहे. अभंग काव्यप्रकार अचूक हाताळत आजच्या समाज व्यवस्थेला खूप गंमतीशीर चिमटे काढले आहेत.     
कवीने कवितासंग्रहात मुक्तछंद, अष्टाक्षरी, अभंग अशा काव्यप्रकारात लेखन करत आपल्या प्रतिभेचे मार्मिक असे दर्शन घडवले आहे, कवी कामगार असले तरी ते मुळचे शेतकरी आहे, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचे कष्ट जवळून पाहिले आहे नव्हे तो स्वतः शेतकऱ्याचे जिणे जगले आहे, त्यामुळे या संग्रहातील कविता वास्तवाचा लेखाजोखा सांगणाऱ्या कविता आहे, सोबत मलपृष्ठावरची ‘विश्वास’ कविता आजच्या साहित्यिकांचे खरे रूप उघड करणारी आहे, 
मी नसेल इथं तिथं 
त्यावेळेस सांगतील जगाला माझं 
अन माझ्या कवितेचं महत्त्व
इतका कवी गणेश भाकरे यांना आपल्या लेखनावर गाढ विश्वास आहे, भले आज कवीच्या लेखणीची ताकद काहीजण जाणूनबुजून दुर्लक्षित करत असतील, पण ते ओळखून आहे संग्रहातील कवितामधील शब्दांची ताकद व महात्म्य. एक दिवस नक्की कवीच्या लेखनाला अव्हेर करणारे कौतुक करतील, इतका त्यांनी ‘विश्वास’ कवितेत सकारात्मक विश्वास मांडला आहे, 
असा हा ‘विठूमाउली की विठोबा’ कवितासंग्रह शब्ददीप प्रकाशनाने प्रकाशित केला आहे, पुस्तकाचे बाह्यरंग म्हणजे मुखपृष्ठ अरविंद शेलार यांनी रेखाटले आहे, पुस्तकाचे अंतरंग व मांडणी खूप आकर्षक आहे, वाचक नक्कीच ‘विठूमाउली की विठोबा’ कवितासंग्रहाचे स्वागत करतील अशी आशा आहे, कवी गणेश भाकरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा....  
**** 
पुस्तक परिचय - संजय गोराडे (नाशिक)
मो. ९८५०६९१२१६ 

दरवळ (वैचारिक)


दरवळ ; वाचकांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणारे पुस्तक

लॉकडाऊन खुले होताच प्रथम प्रकाशनाचा मान पटकावणारे घनश्याम पाटील लिखित ‘दरवळ’ हे कदाचित पहिलेच पुस्तक असावे. दरवळ हे वैचारिक पुस्तक आहे. भोवतालच्या अपप्रवृत्तींनी नकळत केलेले वार, त्यातून उमटलेले पण न दिसणारे कृती किंवा विचारांचे वळ दाखवून देणारे पुस्तक म्हणजे दरवळ होय. या पुस्तकात एकूण पंचवीस लेख आहेत. जे समाजातील विविध अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवितात. मुळाशी जात पुराव्यासह वास्तवाचं दर्शन करून देतात. वाचकाला अंतर्बाह्य हलवत आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात.  
प्रकाशक आणि संपादक असलेले लेखक घनश्याम पाटील यांचे दरवळ हे चौथे वैचारिक पुस्तक आहे, डॉ. द. ता. भोसले यांची प्रस्तावना असून पाठराखण डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची आहे, मुखपृष्ठ सजावट संतोष घोंगडे यांनी केलेली असून अंतर्गत मांडणीसह पुस्तकाची बांधणी अतिशय आकर्षक झाली आहे, हातात पुस्तक घेताच क्षणी वाचकाला वाचण्याचा मोह व्हावा इतके छान बनले आहे.
मराठवाड्यातील चाकूर तालुक्यातील हिंप्पळनेर गावातून आलेले लेखक घनश्याम पाटील गरिबीशी झुंजत परिस्थितीवर मात करत आज महाराष्ट्रातील आघाडीच्या चपराक या प्रकाशन संस्थेचे ते प्रकाशक आहेत, हे यश नक्कीच इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी त्यांना बरेच श्रम करावे लागले आहेत, नव्हे खूप काही गमवावेही लागले आहेत, पण त्याबद्दल ते अजिबात खंत करत नाही. उलट आयुष्यात जे करायचे राहिले आहे ; ते राहिलेलं तसेच राहू द्या म्हणत एका उदाहरणातून ते खूप मार्मिकपणे व्यक्त होत समजावतात, गाडीची समोरची काच मोठी असते आणि मागचा रस्ता दाखवणारा आरसा इवलासा असतो. मागून कोणी ठोकू नये यासाठी भूतकाळावर आरशाद्वारे लक्ष जरूर असावे, पण लांबचा पल्ला गाठण्यासाठी समोरच्या काचेतून दूरवर पहावे ; इतके ते स्वतःच्या गतायुष्यातील कटू प्रसंगांना दूर सारत जगण्याकडे सकारात्मक पाहतात व वाटचाल करतात, ते भोगलेलं दुःख चघळत बसलेले नाही. ‘चिंता करितो विश्वाची’ या समर्थांनी दिलेल्या दृष्टीचा अंगीकार करत ते सामान्यांचा आवाज बनले आहे, आपली लेखणी उपेक्षित व दबलेल्यांच्या बाजूने उभी करत कळतनकळत ते त्यांच्या मनात क्रांतीची विचारज्योत पेटवत आहे. आजवर त्यांनी शब्दांना अस्त्र मानत दिवाळीअंक, वृत्तपत्र व ब्लॉगवर विपुल लेखन केले आहे व अनेकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यापैकीच गाजलेले पंचवीस लेख लेखक घनश्याम पाटील यांनी दरवळ पुस्तकात दिले आहेत, जे वाचकाला वस्तुस्थितीची जाणीव करून देणारे आहेत.       
‘स्वतःपासूनची सुरुवात महत्त्वाची !’ या लेखात लेखक आजच्या तरुणाईमध्ये मरगळ झटकत जोश निर्माण करताना दिसतात. केवळ उपदेशाचे डोस पाजून समाज बदलत नाही, त्याची सुरुवात ही स्वतःपासून व्हायला हवी. त्यासाठी लेखकाला संस्कारमूल्यही तेवढीच महत्त्वाची वाटतात. ते संस्कारमूल्य जपण्यात आणि परिवर्तन घडवून आणण्यात आजची तरुणाई कुठेतरी कमी पडते आहे, त्याबद्दल लेखक छान मार्गदर्शन करतात. ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरं मरतात, काही वेळा माणसंही मरतात ! मात्र जिथं  संस्कारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताही मरते, त्यामुळे संस्कारांचा दुष्काळ पडू नये असे लेखकाला वाटते.                     
 ‘दुर्बल सबल व्हावेत !’ या लेखात सबल माणसांच्या दुर्बल वृत्तीचा उहापोह केलेला आहे, ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीप्रमाणे सबल दुर्बलांना अजून दुर्बल करत आहेत. हे चित्र पालटले तरच आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास होईल असे लेखकाला वाटते, हे त्यांनी काही आदर्श व्यक्तींची उदाहरणे देऊन खूप छान समजावले आहे.
‘अगम्य, अतर्क्य !’ या लेखात स्त्रियांच्या विविध रुपांवर प्रकाश टाकला आहे. स्त्री शिकली, तिने अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली, आज ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने लढते आहे, हे नक्कीच गौरवास्पद आहे, परंतु त्याच वेळी थोडेफार उणेदुणे झाले की स्त्रीया लगेच स्त्री असल्याची कवचकुंडले धारण करतात, हे लौकिक दृष्ट्या अशोभनीय आहे, सोयीनुसार बदलणारी स्त्रियांची विविध रुपं लेखकाला खूपच अगम्य आणि अतर्क्य वाटतात. 
‘धोका प्रतिक्रियावाद्यांचा !’ हा लेख वाचाळवीरांवर घणाघात करतो. लोकशाहीने आपल्याला अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा अधिकार दिला असला तरी आपण जपून विधानं करायला हवीत, आपल्या विधानाने समाजात दुही माजणार नाहीत याची काळजी घ्यायला हवीत. कोणत्याही घटनेची सत्यता पडताळून मगच आपण आपली प्रतिक्रिया द्यायला हवी असे लेखक सांगतात.  
‘क्षणिक मोहापायी !’ या लेखात प्रगतीच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारी आजची पिढी आपली भारतीय संस्कृती विसरली आहे, चंगळवाद व क्षणिक मोहापायी आपल्या संस्कृतीचा कुठेतरी ऱ्हास होतो आहे, आपल्या हिंदू धर्मशास्त्रात विवाह ही संकल्पना अत्यंत पवित्र मानली आहे, याचे भान आजच्या युवा पिढीला राहिलेले नाही. हरवलेली ती नीतीमूल्य चपखल शब्दात लेखकाने युवा वर्गाला सांगत नेमकी कान उघडणी केली आहे. 
‘ऊर्जादायी भक्तीसोहळा’ हा लेख माणसाने जीवनात येऊन एकदा तरी पंढरीची वारी करावी हे सुचवतो. पैशाच्या मागे धावणाऱ्या माणसाला खरा आनंद पहायचा असेल तर त्याने पंढरपुरी जाऊन आषाढी कार्तिकीचा ऊर्जादायी भक्तीसोहळा पहावा, त्याला नक्की जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. वारीला जायचे म्हणून एक महिनाभर अगोदर तयारी, दिंडी पंढरपुराला जात असते तेव्हा लोकांचे मुक्त अन्नदान, दिंडीची स्वयंशिस्त, गरीबश्रीमंती विसरून हरिनामात एकरूप झालेले वारकरी लेखकाने खूप छान शब्दात चितारले आहेत. 
‘दोन घडीचा डाव’ हा लेख नैराश्याने ग्रासलेले व आत्महत्याचा विचार करणाऱ्या लोकांचे समुपदेशन करतो. संकटांना पाहून हादरून जाणे व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविणे नक्कीच निंदनीय आहे, समाजासाठी आदर्श असलेल्या व्यक्तीही असा अघोरी पर्याय निवडतात ; तेव्हा त्यांच्या कमकुवत मानसिकतेचे दर्शन होते. खरेतर जीवन दोन घडीचा खेळ आहे, तो प्रत्येकाने हसत हसत खेळला पाहिजे असे लेखक तळमळीने सांगतात. 
‘साहित्यिक दहशतवाद घातक’ या लेखात दर वर्षी आयोजित होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन व अध्यक्षांचे विवादित वक्तव्य याबद्दल लेखकाने रोकठोक भाष्य करत भविष्यातील धोक्यांबद्दल सूचित केले आहे, विवादाशिवाय पार पडलेले साहित्य संमेलन ऐकवातच नाही, विनाकारण निर्माण केला जाणारा हा साहित्यिक दहशतवाद नवोदितांच्या मानसिकतेवर किती विपरीत परिणाम करणारा व साहित्यविश्वासाठी घातक ठरणारा हे सांगितले आहे. 
‘राहिलेलं राहूच द्या !’ हा लेख लेखकाने स्वतःच्या जीवनावर गुंफला आहे, अनेकांना लिहायला प्रेरित करणारे लेखक क्वचितच स्वतःबद्दल लिहितात किंवा बोलताना दिसतात. सहा पानात त्यांनी जेही काही स्वतःबद्दल लिहिले आहे ते नक्कीच ह्रदयाला स्पर्श करणारे आहे, त्यांच्या सन्यास्त जीवनाला वाचक जरूर सलाम करेल. 
असे एकापेक्षा एक सरस व सकस पंचवीस लेख दरवळमध्ये आहे, जे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक अशा विविध विषयांवर बेतले आहे, प्रत्येक विषय त्यांनी पोटतिडकीने व वाचकाला समजेल अशा सोप्या पद्धतीने मांडला आहे, त्यांचा डोळसपणा त्यांना सामाजिक बांधिलकी जपण्यास अस्वस्थ करत असावा, त्यामुळे प्रत्येक लेखाची निर्मिती खूपच आत्मितेने केली आहे. लेखाचा विषय समजावताना ते केवळ आध्यामिक दाखले देत नाही तर आजच्या समकालीन कवी-लेखक व व्हाटसअप्प-फेसबुकचे उदाहरणे दाखले म्हणून देतात, जे वाचकाला समजायला खूप मदतगार ठरले आहे, 
असे हे उपेक्षित व दबलेल्यांच्या मनावरचे ओझे हलके करणारे पुस्तक म्हणजे दरवळ आहे. जे वाचकांच्या मनातील भावनांचे प्रतिनिधित्व करते. अशी २०२० मधील घनश्याम पाटील लिखित वैचारिक दरवळ प्रत्येकाने वाचावी असा मी जरूर आग्रह करेन...! 

पुस्तक - दरवळ 
लेखक - घनश्याम पाटील 
प्रकाशन - चपराक प्रकाशन 
मूल्य - २०० रुपये.

पुस्तक परिचय - संजय द. गोराडे (नाशिक) 
 मो. - ९८५०६९१२१६              
                     
          

हजार धागे सुखाचे (कथासंग्रह)

हजार धागे सुखाचे ; वाचकाला सुखाचा आनंद देणारा कथासंग्रह

माणूस सुखाचे क्षण घटाघटा पिऊन घेतो आणि दुःखाचे क्षण चघळत बसतो. खरंतर माणसाच्या जीवनात हजार सुखांनंतर एकदा दुःखाचा क्षण येतो, परंतु तो दुःखाचा क्षण येणाऱ्या पुढच्या असंख्य सुखांना दुःखमय बनवतो. त्यामुळे माणसाला सुख क्षणिक व दुःख अगणित वाटते. असे हरवलेले ‘हजार धागे सुखाचे’ कोणते ! हे सकारात्मक जाणीव करून देणारा किरण सोनार लिखित कथासंग्रह चपराक प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. त्यांचा हा पहिलाच कथासंग्रह असला तरी पहिलारू लेखनाचे कुठलेही लक्षणे कथासंग्रहात आढळत नाही, उलट त्यांची लेखणी कथालेखक म्हणून स्वतःला सिद्ध करते. 

नाशिकस्थित किरण सोनार हे खरेतर मुळचे पत्रकार आहेत, त्यांनी अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखन केले आहेत. त्यांचे ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे - द रियल हिरो’ हे चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित आहेत. ते एक उत्तम वक्ते असून त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. कथावर्ती अरविंद गोखले हे त्यांचे आवडते लेखक आहे, त्यांच्या कथावाचनातूनच त्यांना कथालेखनाची गोडी निर्माण झाली. त्यांच्या प्रेरणेनेच ‘हजार धागे सुखाचे’ हा सुखाचा शोध घेणारा कथासंग्रह त्यांनी वाचकांच्या भेटीस आणला आहे. 

या कथासंग्रहाला ‘सर्जनाचा सुंदर प्रवास’ संबोधणारी विजया वाड यांची प्रस्तावना असून घनश्याम पाटील यांची पाठराखण आहेत. ते पाठराखण करताना म्हणतात, ‘हजार धागे सुखाचे या कथासंग्रहातील कथा वाचकाच्या मनात सुखाचा आशावाद निर्माण करतात.’ असाच काहीसा आशावाद वाचक म्हणून माझ्याही मनात निर्माण करण्याचे काम या कथासंग्रहाने केले आहेत. 

या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत, पहिली कथा ; पोरका बाप, पर्यावरण प्रेमी अण्णा पोटच्या मुलाप्रमाणे झाडांना जीव लावतात, त्यांना लहानाचे मोठे करतात, अशा मुलाप्रमाणे जपलेल्या झाडांना एक वेडगळ माणूस लाथा मारतो व शिव्या देतो, तेव्हा अण्णा विरोध करतात तर तो त्यांनाही जुमानत नाही, नाईलाजास्तव हे प्रकरण पोलिसापर्यंत जाते, अखेर अण्णा माघार घेत त्यांच्या वेडथर वागण्यामागेचे कारण जाणून घेतात, तेव्हा अण्णाबरोबर वाचकही अवाक झाला नाही तर नवलच. 

दुसरी कथा ‘अनमोल श्वास’, या कथेत लहानगा स्वामी आईवडिलांकडे वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून कुत्र्याच्या पिल्लाची मागणी करतो, ते सहपरिवार कुत्र्याचे पिल्लू घ्यायला जातात, परंतु कुत्र्याच्या पिल्लाची किमंत न परवडणारी असते. कुत्र्याच्या पिल्लासाठी हटून बसलेल्या स्वामीला पाहून दुकानदान एक अपंग कुत्रं त्यांना फुकट देतो, त्यावर स्वामीने दिलेले उत्तर व कृती थक्क करणारी आहेत. 

‘नजरेतून शिक्षा’ या तिसऱ्या कथेत भूमिहीन पुंडलिक दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून जीवन जगत असतो. त्याची पत्नी मंजुळाला स्वतःची जमीन असावी असे वाटते, तसा त्यांचा आदिवासी या नात्याने एका प्लॉटवर कोर्टात दावाही चालू असतो, ही कथा वाचकाच्या मनात सरकारी व्यवस्था व राजकारण्यांबद्दल प्रचंड संताप निर्माण करते. 

‘अनपेक्षित पाऊलवाटा’ या कथेत इंजिनिअरींगची पदवी मिळविलेला मयूर नोकरी मिळत नाही म्हणून हतबल होत नाही, मिळेल ते काम करून अनपेक्षित वाटणारी स्वतःची पाऊलवाट तो अपेक्षेप्रमाणे निर्माण करतो. त्याची ध्येयपूर्ती व मेहनत नक्की आजच्या नवयुवकांना प्रेरणा देणारी आहे. 

‘इरपाची लढाई’ ही कथा सरकारी यंत्रणा आणि नक्षलवादी या दुहींच्या कैचीत सापडलेलं गाव आणि त्या गावातील सुशिक्षित इरपा यांच्यावर बेतली आहे. गावातील अठरा विश्वे दारिद्र्य पाहून इरपाला गावासाठी काहीतरी करावेसे वाटते, परंतु सरकारी अधिकारी व नक्षली यांची दहशत त्याच्यासाठी अडचणीची ठरते. तरीही इरपा गावासाठी असे काम करतो, जे आजपर्यंत कोणीच केलेले नसते, या कथेतून लेखकाने सामाजिक बांधिलकीचा छान संदेश दिला. 

‘शाळेची खिचडी’ ही कथा गरीब घरीतील गणेशच्या जीवनावर चितारली आहेत. इयत्ता चौथीतील शिकणारा गणेश शिक्षकांना चोर वाटतो, परंतु वस्तुस्थिती जाणताच शिक्षकांबरोबर वाचकही नकळत भावनाविभोर होतो. कधी कधी परिस्थितीवरून मत बनवणं कसं फोल असतं हे या कथेत लेखकाने छान प्रत्यास आणून दिले आहेत. 

‘स्कार्फवाली बाई’ ही कथा नवराबायकोच्या घरगुती वादावर गुंफली आहेत. विनाकारण बायकांची नवऱ्याबद्दलची संशयी वृत्ती किती निरर्थक असते हे या कथेतून खूपच मनोरंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहेत. भांडणाचे कारण जाणताच  वाचकही स्तंभित होतो. 

‘हजार धागे सुखाचे’ ही शीर्षक कथा आहेत. ही कथा नोकरी गमावलेल्या रणजीतच्या जीवनावर आधारित आहेत. आधुनिक लाइफस्टाइल जगत असलेल्या रणजीतला नोकरी शोधूनही मिळत नाही, तेव्हा त्याला खूप नैराश्य येते. परंतु या नैराश्यमय काळातही मनाला उभारी देणारी एक घटना घडते, व रणजीतला जगण्याची एक सकारात्मकता निर्माण करते. या कथेतून लेखकाला दुःखातही सुख पेरलेले असते हे सांगायचे आहे. 

अशा या मध्यमवर्गीयांची जीवनाशैली ते नक्षलीपर्यंत गुंफलेल्या आठ कथा वाचकाला छान हलकाफुलका सुखाचा आनंद देतात. लेखकाकडे कथालेखनाची हातोटी आहे, त्यामुळे ते वाचकाला कथा वाचनास खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांची कथा लेखनाची निवेदनशैली पाल्हाळीक नसून मोजकी व प्रभावी आहे. त्यांनी प्रत्येक कथेला अंतसमयी छान कलाटणी दिली आहे, जी वाचकाला सुखद धक्का देते. विषय साधेसे परंतु कथा मांडणी  उत्कंठावर्धक असंल्याने कथासंग्रह वाचनीय झाला आहेत. चपराकने प्रकाशक म्हणून अंतर्बाह्य कथासंग्रहाची सजावट खूपच आकर्षक केली आहे, संतोष घोंगडे यांनी कथासंग्रहाला साजेसे मुखपृष्ठ दिले आहेत. वाचक नक्कीच किरण सोनार यांच्या ‘हजार धागे सुखाचे’ या कथासंग्रहाचे भरभरून स्वागत करतील यात शंका नाही. 

पुस्तक - हजार धागे सुखाचे (कथासंग्रह) 
लेखक - किरण सोनार
प्रकाशक - चपराक प्रकाशन, 
पुणे / मूल्य - १०१ रुपये.   
        
पुस्तक परिचय - संजय द. गोराडे (नाशिक)

तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट (कादंबरी)


तीर्थरुप : एक प्रांजळ आत्मकथन!
       जन्मदाता...! वडील, बाप, तात, पिता... तीर्थरुप अशा विशेषणांनी सजलेले एक रुप! प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असणारे व्यक्तिमत्त्व! आपल्या अपत्याच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावणारा तो बाप! तरुण वयात पत्नीच्या निधनानंतरही तिने प्रसवलेल्या अपत्यांना सावत्र आईचा जाच सहन करायला लागू नये म्हणून आजीवन एकटा राहून पत्नीने अर्धवट सोडलेला संसार फुलविणारा, मुलांची आई आणि बाबा अशी दुहेरी भूमिका कर्तव्य निष्ठेने पार पडणारा माणूस आपण अनेकदा पाहिला आहे, अनेकांनी अनुभवला आहे परंतु या सर्व भूमिकांना छेद देणाराही एक बापच असू शकतो, नव्हे तो नाशिक येथील लेखक संजय गोराडे यांनी प्रत्यक्ष सहन केलाय हे आपल्याला गोराडे यांच्या पहिल्याच आत्मनिवेदनपर कादंबरीतून वाचायला आणि अनुभवयाला मिळते. समाजात शानशोक करणारी, पत्नीला छळणारी, वडिलोपार्जित संपत्तीची उधळण करणारी माणसे नवीन नाहीत परंतु लेखकाच्या जीवनात आलेले बाप हे पात्र काही वेगळेच आहे.
       तीर्थरुप! किती चांगल्या अर्थाने आपण वापरतो. तीर्थ ही संकल्पनाच मोठी आदरयुक्त अशी आहे. धार्मिकदृष्ट्या पवित्र आहे. वेगवेगळ्या धार्मिक स्थळी असणाऱ्या तीर्थामध्ये स्नान केल्याने, तीर्थ प्राशन केल्यामुळे पापांचा नाश होतो, एक वेगळे समाधान मिळते, जीवन सफल होते, जीवनाचा उद्धार होतो असे मानणारा एक फार मोठा वर्ग आपल्या अवतीभवती असतो. अशा पवित्र तीर्थाचे रुप म्हणजे तीर्थरुप! आपले जन्मदाते! आपल्या अपत्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे, संसाररुपी सागरात आपल्या संततीची नौका यशस्वीपणे पैलतीरी पोहोचविणारा एक आदर्श नावाडी! 
     परंतु लेखक संजय गोराडे यांना पित्याच्या बाबतीत आलेले अनुभव या सर्वांना छेद देणारे आहेत. ते त्यांनी स्वतः भोगलेले आहेत त्यामुळे ते लिहिताना त्यात अस्सल जिवंतपणा आला आहे. हे रंगविलेले कथानक नाही तर अनुभवलेले, भोगलेले, सहन केलेले असे कथानक आहे. कथानक लिहायचे म्हणून कुठेही कृत्रिमता येऊ दिलेली नाही.
       'तीर्थरुप : वनवासी जीवनाची गोष्ट' हे शीर्षक घेऊन येणारी संजय गोराडे यांची ही पहिलीच आत्मनिवेदनपर कादंबरी आहे असे वाटत नाही कारण या कथानकात कुठेही नवखेपणाच्या, पहिलेपणाच्या खुणा जाणवत नाहीत. एखाद्या सिद्धहस्त लेखकाच्या लेखनीतून प्रकटलेली ही गोष्ट असावी असा भास होतो. लेखकाच्या नावे याआधी 'निर्णय' हा वाचनीय नि दर्जेदार कथासंग्रह आहे. आपले दुसरे पुस्तक तेही थेट आत्मकथा म्हणून मांडताना लेखक कुठेही कचरला नाही उलट सर्वसाधारणपणे आत्मकथन करताना त्यात जीवनातील काही गोष्टी समाजापुढे येऊ नये अशा असतात. अनेकांच्या तारुण्यात जडलेले प्रेम आणि नंतर झालेला प्रेमभंग हा नंतर आलेल्या सहचारिणीच्या कानावर जाऊ नये, गेला तरी हातचे राखून जावा अशी साधारणपणे एक भूमिका असते. लेखक गोराडे या भूमिकेलाही छेद देतात.
       गुरुवर्य प्रा. राम शेवाळकर हे त्यांनी लिहिलेल्या 'पाणीयावरी मकरी' या आत्मचरित्रात काय लिहितात हे उद्धृत करण्याचा मोह होतो....
      'विवेचनाच्या ओघात काही आत्मपर उल्लेख स्वाभाविकपणे आले असले, तरी विनोबांना आत्मलेखन मानवत नाही. त्यांच्या मते तसा प्रयत्न केला तर ती आत्मकथेऐवजी अनात्मकथा होईल. विनोबा आत्मा या शब्दाचा विचार आत्मवस्तू या अर्थाने करीत. आपण त्या शब्दाच्या गूढ व व्यापक आशयाला 'स्व'पुरते मर्यादित करून ठेवले आहे. 'स्व'ची कथा लिहिता येईल; पण ते आत्म्याचे चरित्र होणार नाही. आत्म्याचा शोध घेणे जितके अवघड आहे तितके 'स्व'चा शोध घेणे नाही. 'स्व'चा शोधसुद्धा आपण प्रामाणिकपणे व पूर्णपणे घेत नाही. पूर्णपणे घेतला तरी तो तसाच्या तसा निवेदन करण्याची धिटाई सर्वांमध्ये नसते. त्यांचा भर जे आहे ते झाकण्यावर अधिक असतो...'
       प्रा. शेवाळकर यांच्या वरील निवेदनातील धिटाई लेखक संजय गोराडे यांनी दाखवली आहे म्हणून ते अभिनंदन आणि कौतुकास पात्र आहेत. एकतर प्रत्यक्ष जन्मदात्याचे वर्णन आणि स्वतःचे प्रेम त्यांनी जाहीरपणे मांडले आहे. सुरवातीलाच लेखक एका कविसंमेलनातील एका कवितेचा संदर्भ देऊन लिहितात, 'कवी राजेंद्र उगले यांनी कदाचित वेगळ्या अर्थाने कविता केली असेल पण मी मात्र कवितेचा शब्दाशी अर्थ घेत तीर्थरुपांच्या आठवणीने व्यथित झालो होतो. त्यांच्यामुळे क्षणात आमच्या वाट्याला आलेल्या वनवासी जीवनाची एकेक गोष्ट आठवू लागली होती...'
     प्रत्यक्ष 'पित्यामुळे वनवास'  या शब्दांमुळे हे पुस्तक हातात घेतल्यानंतर शीर्षक वाचून वाचकांची जी एक मनोभूमिका तयार होते तिला धक्का बसतो कारण 'तीर्थरुप: वनवासी जीवनाची गोष्ट!' या शीर्षकामुळे वाचकांना असे साहजिकच वाटू लागते की, नायकाच्या वडिलांनी त्यांच्या संसारासाठी, अपत्यांसाठी जे सोसलं, जे भोगलं, दुसऱ्या शब्दात जो वनवास भोगला त्या कष्टांचे वर्णन, पित्याचा चांगुलपणा याचे दर्शन या कथानकात असेल परंतु लेखकाच्या वरील वाक्याने वाचकांचा दृष्टिकोन बदलतो. एवढे सारे असूनही लेखक ही आत्मकथा आपल्या दादांच्या अर्थात तीर्थरुपांच्या चरणी अर्पण करतात. कादंबरीचा शेवटही लेखक आईवडिलांचे ऋण व्यक्त करून करताना लिहितात,
         'आज मागे वळून पाहतो तेव्हा मनात विचार येतो, आपल्याला इतकं लढायचं बळ कोणी आणि कसं दिलं! आपसूकच वनवासी बनवून गेलेली 'ब' आठवते व दुराव्याने वागणारा 'बा' आठवतो अन् आपोआपच सारं काही विसरून मन त्यांच्या चरणावर लीन होते.'
        आईच्या बाबतीत लेखक अतिशय हळवे आहेत. त्यांचा हळवेपणा ठिकठिकाणी जाणवतो. ते म्हणतात, 'चार वर्षांचा असताना हरवलेली 'ब.' आज चव्वेचाळीशीचा झालो तरी डोळ्यांना एक आस होती, 'येईल कुठूनतरी माझी ब... रडताना पाहून पुसेल तिच्या पदराने माझे डोळे... करेल बोबड्या बोलात खोटं खोटं सांत्वन... म्हणेल, आता मी नाही जाणार तुला टाकून कुठे...!'
        वडील बिघडले कुठे, कधी आणि कुणामुळे याचा शोध घेताना लेखक म्हणतात...
 'दादांचं बोलणं आणि राहणीमान पुढाऱ्याला लाजवील असे होते. १९७४मध्ये ते सरपंच निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले होते तेव्हापासून त्यांना सगळं गाव 'मेंबर' नावाने संबोधत होतं परंतु काही कु लोकांच्या संगतीने त्यांना जुगार आणि गांजाची लत जडली होती...' 
समाजात सर्वत्र दिसणारं चित्र लेखकाने उजागर केले आहे. कुणी समोर जात असेल, प्रगती करीत असेल तर त्याचे पाय ओढण्याची वृत्ती सर्वत्र दिसून येते. विविध प्रकार अवलंबून एखाद्या चांगल्या माणसाला संपविण्याचा, त्याला जीवनातून उठविण्याचा कुटील डाव खेळणारी वाकबगार माणसे राजकारणात अधिक असतात. स्वतःच्या साम्राज्याला कुणी भविष्यात आव्हान देणारा जन्मुच द्यायचा नाही असा हिंस्र विचार करणारी माणसं सज्जनाला वेळीच संपवतात कदाचित संजय यांच्या वडिलांबाबतही असेच घडले असणार परंतु त्यामुळे एका खात्यापित्या घराला त्या घटनेने वनवासाची दुःखे भोगायला लावली हे ठसठशीत सत्य नाकारून चालत नाही. त्यानंतर ज्या घटना घडल्या त्या साऱ्यांचा बालवयातील लेखकाच्या मनावर खोल परिणाम झाला आणि कदाचित पित्याविषयीचा तिरस्कार, नकारात्मक भावना जन्माला आली असणार. आपला बाप म्हणजे व्यसनी, मारकुटा असा एक दृढ समज बालमनावर कोरल्या गेला. हे वयच असे असते की, या वयात जे समोर दिसते, जे अनुभव येतात ते आजन्म संगतीला राहतात. 'आळसभिकारी' हा शब्द लेखकाची आई नवऱ्यासाठी वापरते तेव्हा सारे काही यात सामावले आहे. तिला कोणत्या संकटांचा, छळाचा सामना करावा लागला हेही समजू शकते.
       आईचा मृत्यू! कोणत्याही वयातील लेकरासाठी अत्यंत क्लेशदायक, दुःखदायक प्रसंग! लेखक चार-पाच वर्षांचे असताना त्यांना पोरके करून आई निघून गेली... कायमची! आईच्या आयुष्याची अखेर लेखकाने जणू स्वतःच्या पेनमध्ये शाईऐवजी अश्रू टाकून लिहिली आहे की काय असे वाटते कारण आईच्या मृत्यूचा तो प्रसंग वाचताना वाचकांच्या भावनाच ओल्या होत नाहीत तर नकळत अश्रूही प्रसवतात...
       सर्वत्र दुःखाचे डोंगर सर करताना, लेखक आठव्या इयत्तेत शिकत असताना त्यांच्या साहित्यिक जीवनाचा श्रीगणेशा झाला. संजय गोराडे यांनी 'शेंड्या आणि गोंड्या' ही एकांकिका लिहिली. ह्या विनोदी एकांकिकेचे शिक्षकांनी तोंडभरून कौतुक केल्याची नोंद लेखक अभिमानाने करतात. 
        प्रकाशक घनश्याम पाटील यांनी चपराक प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित केलेल्या या आकर्षक 
पुस्तकाला सिद्धहस्त चित्रकार संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठ लाभले आहे. तसेच घनश्याम यांनी या पुस्तकाची पाठराखणही मोजक्या परंतु आशयघन शब्दात केली आहे. लेखक मनोगतात लिहितात त्याप्रमाणे ही कादंबरी लिहिण्यासाठी लेखकाला प्रेरित करणारे डॉ. राहुल अशोक पाटील यांची सविस्तर आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. या साऱ्या बाबी या कादंबरीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. कागद, छपाई आणि मांडणी हे चपराकचे वैशिष्ट्य यानिमित्ताने ठळकपणे जाणवते.
        जीवनात असाही एखादा प्रसंग येतो की, एखाद्या व्यक्तिबद्दल आपले मत पुन्हा एकदा तपासून पहावे वाटते. त्या व्यक्तिकडे सकारात्मकतेने पहावेसे वाटते. लेखकाचेही असेच होते. आजीवन निष्ठुर वाटणारा बाप क्षणार्धात दुधाच्या सायीसारखा मऊ वाटतो आणि लेखकाला वाटते, 'बच्या पश्चात मला कधीच वनवासी वाटले नव्हते. मी फक्त 'ब'च्या मातृत्वाचा भुकेला होतो पण दादांच्या वैकुण्ठगमनाने मला पूर्ण वनवासी केले आहे...!' या वाक्यात पुस्तकाच्या शीर्षकाचा खराखुरा अर्थ दडला आहे.
         एकंदरीत संजय द. गोराडे यांची ही आत्मकथनपर कादंबरी सत्याचे, प्रामाणिकपणाचे, धाडसाचे पदर लेवून येत असल्यामुळे ती वाचनीय झाली आहे. एका बैठकीत वाचून हातावेगळी करावी अशी उत्कंठावर्धक आहे. साधीसरळ अशा शब्दांची गुंफण असल्यामुळे मनात घर करणारी अशीच आहे. संजय गोराडे यांच्या आगामी लेखनास अनंत शुभेच्छा! वयाचे अर्धशतक गाठत असलेल्या या लेखकाकडून एकापेक्षा एक सकस ग्रंथाची निर्मिती व्हावी ही सदिच्छा!
                                                                ००००
तीर्थरुप: वनवासी जीवनाची गोष्ट:  कादंबरी
लेखक     :- संजय द. गोराडे
प्रकाशक  :- घनश्याम पाटील
                   चपराक प्रकाशन, पुणे. (७०५७२९२०९२)
मुखपृष्ठ    :-  संतोष घोंगडे, पुणे
पृष्ठसंख्या :- १६८
किंमत      :- ₹२५०/-
परिचय     :- नागेश सू. शेवाळकर, पुणे
                   (९४२३१३९०७१)

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...