देवमाणूस
“तेजस... उठ, किती वेळ अंथरुणावर अजगरासारखा पडून राहणार आहेस ?"
आळसावलेला तेजस झटक्याने अंथरुणावर उठून बसला. त्याला आज शाळेलेत जायचे नव्हते. रोजरोज शाळेत जाण्याचा त्याला कंटाळा आला होता. परंतु विजूदादा अजगर म्हटल्याने त्याला राग आला होता. घुशानेच अंथरुणावरून उठत त्याने मोठ्या भावावर डोळे वटारले होते.
“असं काय मारक्या बैलासारखं माझ्याकडे बघतोस ?” विजूने पुन्हा त्याला डिवचले होते.
“आई पहाय ग, दादा मला काय म्हणतोय ?” चिडत तेजसने आईला त्याचे नाव सांगितले.
“नको विजू... कशाला त्याचं नाव घेतोय !” स्वयंपाकघरातून आईने विजूला दटावले.
तेजस तणतण पाय आपटत रागाने स्वयंपाक घरात निघून गेला. त्याच्या माघारी विजू मात्र तोंड दाबून खुदुखुदू हसत होता. त्याला छोट्या भावाला चिडवण्यात नेहमीच मौज वाटत असे. तेजस मोठ्या गटात होता ; तेव्हा चांगला दहा वाजेपर्यंत झोपत होता. परंतु पहिलीला गेल्यापासून लवकर उठायला तो भलते नाटकं करत होता. त्यामुळे विजू त्याची खोडी काढून त्याला जागवत असे. दुसरं खोडी काढण्याचे अजून एक कारण होते, तेजस दिसायला खूप गबदुला व गोबऱ्या गालाचा होता. रागवला की त्याचे गोरे गाल व नाकाचा शेंडा खूप लाल होत असे. त्यात त्याला मस्करी बिलकुल सहन होत नसे. तो चिडतो म्हणून विजू त्याला अधिकच चिडवत असे.
बळेबळे शाळेत पाठवलेला तेजस बसमधून खाली उतरला. रांगेत तो पाठीवरचे दप्तर सांभाळत शाळेच्या वर्गात जात होता. इच्छा नव्हती तरी आईने शाळेत पाठवले म्हणून तो थोडा नाराज होता. जड पावलाने तो रांगेत वर्गात जात असताना मागून एक मुलगा विचित्र आवाजात ओरडला, “ये हाथीभाई, मुंगीभाईसारखा काय चालतोय, घोडेभाईसारखं चल ना !”
त्याच्यामागून रांगेत येणारी मुलं त्या चमत्कारिक आवाजाने खोखो हसू लागली होती. आधीच त्याच्या लठ्ठपणाला सर्व मुलं हाथीभाई म्हणून चिडवत होते. त्यात त्याला मुंगीभाई व घोडेभाई म्हणताच चांगलाच हश्या पिकला होता. त्याने रागात पाठीमागच्या मुलांकडे पाहिले. ते त्याला वाकुल्या दाखवून खिजवत होते. तो रागाने लालेलाल झाला होता, पण कुणालाच काही म्हणाला नाही. कारण त्याला माहीत होते, आपण चिडलो की ; आपले मित्र आपल्याला अजून जास्त चिडवतात. तो निमुटपणे वर्गाच्या दिशेने चालत राहिला.
आज तेजसचे अभ्यासात बिलकुल लक्ष लागत नव्हते. सकाळी-सकाळी विजूदादा त्याला अजगर व मारका बैल म्हणाला होता. शाळेत आल्यावर मित्रही हाथीभाई, मुंगीभाई, घोडेभाई असे कायकाय म्हणाले होते. त्याचं चांगलं ‘तेजस’ नाव होतं, परंतु सगळे जण आज त्याला का कुणास ठाऊक ; वेगवेगळ्या प्राण्याच्या नावाने हाका मारत होते व खिल्ली उडवत होते. आई सोडून कोणीच का आपल्याला तेजस म्हणत नाही म्हणून तो नाराज झाला होता.
“ये गाढवा, मी फळ्यावर शिकतोय, लक्ष कुठे आहे तुझे !”
शिक्षक रागावताच विचारात गढलेला तेजस भानावर आला. गोंधळून त्याने शिक्षकांकडे पाहिले. ते त्याला फळ्याकडे लक्ष द्यायला सांगत होते. त्याची कावरीबावरी मुद्रा पाहून बाकी मुले खदाखदा हसू लागली. मित्र मुद्दामून खिजवण्यासाठी हसत आहे पाहून त्याने मान खाली घातली होती. सर्वजण आज ठरवून आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांच्या नावाने हिणवत आहे असे त्याला उगाचच वाटले होते.
मधली सुट्टी होताच तेजस शाळेच्या मोकळ्या मैदानात एकटाच एका कोपऱ्यात घरून आणलेला डब्बा खात बसला. मित्रांत जेवायला बसलो तर उगाच ते आपल्याला एखाद्या प्राण्याच्या नावाने चिडवतील अशी त्याला भीती वाटली होती. तेवढ्यात चौथीच्या वर्गातील एक अनोळखी मुलगा त्याच्याजवळ येत म्हणाला, “ये छोटू... तिकडे मुलांमध्ये जेवायला बस ना, इकडे काय एकटाच भित्र्या मांजरीसारखा जेवायला बसला आहेस !”
तेजसला एकटेच कोपऱ्यात जेवायला बसलेले पाहून त्या अनोळखी मुलाला सहानुभूती वाटली होती. म्हणून त्याने आपुलकीचा सल्ला दिला होता. परंतु त्याला तेजसच्या मनस्थितीची बिलकुल कल्पना नव्हती. मांजरीसोबत त्याची तुलना करताच तेजसला खूप राग आला होता, परंतु तो मुलगा खूप मोठा असल्याने त्याने त्याचा राग आतल्या आत गिळून टाकला होता.
दुपारी शाळा सुटताच तेजस काहीसा नाराजीने घरी परतला होता. घरात पाऊल टाकताच त्याला हॉलमध्ये आई आणि वडील बसलेले दिसले. वडील त्याच्याकडे पाहून आनंदाने म्हणाले, “आला माझा वाघ शाळेतून, कसा गेला बाळा आजचा दिवस ?”
वडील पण वाघ म्हणताच तेजस रडकुंडीला आला होता. त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत तो सरळ आतल्या घरात निघून गेला. वडील रोजच त्याला कौतुकाने वाघ म्हणत असत, परंतु आजचे त्यांनी वाघ म्हटलेले त्याला आवडले नव्हते.
शाळेतून आल्या-आल्या वडिलांच्या गळ्यात पडणारा तेजस सरळ आतल्या घरात निघून गेलेला आईला खटकले होते. त्याच्या त्या कृतीकडे ती अचंबित नजरेने पाहत राहिली होती. शाळेत काहीतरी बिनसले असल्याची तिला कल्पना आली. त्याच्या पाठोपाठ आतल्या खोलीत येत ती म्हणाली, “काय रे तेजू...काय झालं ?”
तेजस दप्तर पुस्तकाच्या कपाटात ठेवत नाराजीच्या सुरात उद्गारला, “आई, मी प्राण्यासारखा दिसतो का ग ?”
त्याच्या प्रश्नाने चकित होत आईने विचारलं, “का रे बाळा, तुला असं कोण काय म्हणालं ?”
“सकाळी विजुदादा मला अजगर आणि मारका बैल म्हणाला, शाळेत गेलो तेव्हा मित्र हाथीभाई, मुंगीभाई आणि घोडाभाई म्हणत होते, वर्गात पण सर गाढव म्हणाले, मधल्या सुट्टीतही एक मुलगा भित्री मांजर म्हणाला, मी या सगळ्या प्राण्यांचा मिळून बनलो आहे का ग ?” निरागस तेजसने रडवेल्या स्वरात मनातली सल आईला विचारली.
“नाही बाळा !” त्याच्या नाराजीचे कारण लगेच आईच्या लक्षात आले. प्रेमळ हात पाठीवर फिरवत ती त्याला म्हणाली, “तू तर माझा छान मुलगा आहेस !”
“मग मला का सर्वजण प्राण्यांच्या नावाने चिडवतात !” तेजसच्या बालमनाला प्रश्न पडला होता.
“बेटा तू एक हुशार मुलगा आहेस, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस !” आईने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.
“नाही आई, खरं सांग... मी त्यांच्यासारखा वागतो का ?” तेजसचे डोळे भरून आले होते.
“त्याचं असं आहे बेटा !” त्याला दुखावलेलं पाहून आई समजावून सांगू लागली, “सकाळी आपण जास्त वेळ अंथरुणात झोपलो की ; त्याला अजगरासारखं झोपणं म्हणतात. कारण अजगर हा आळशी प्राणी आहे, तसंच मारका बैल, हत्ती, मुंगी, घोडा, मांजर यांच्याबद्दल आहे, जेव्हाही माणूस चुका करतो ; तेव्हा त्याला अशा प्राण्यांच्या नावाने टोकलं जातं !”
“म्हणजे देवाने माणूस सगळ्या प्राण्यांचा मिळून बनवलाय का ग आई ?” तेजसच्या बालमनाला भलताच प्रश्न पडला होता.
“नाही बाळा, माणसाला देवाने खूप खास बनवलं आहे, पण हल्ली तो या प्राण्यांसारखा वागू लागला आहे, तो विसरून गेला आहे आपण माणूस आहोत ते, त्याने जर ठरवलं ना... तर तो माणसाचा देवमाणूससुद्धा होऊ शकतो !”
“आई... मग मला पण देवमाणूस व्हायचं आहे !” तेजस ठामपणे उद्गारला.
त्याच्या डोळ्यात एक अलौकिक तेज चमकलेले आईला दिसले. समाधान पावल्यागत ती पुढे म्हणाली, “तर आजपासून अजगरासारखं अंथरुणात झोपून राहायचं नाही, कोणी काही बोललं तर मारक्या बैलासारखं पाहायचं नाही, सर्व कामे घोड्याच्या जलद वेगाने करायची ; मुंगीसारखे हळूहळू करायचे नाही आणि कोणतेही काम असू दे ; मांजरीसारखं घाबरायचं नाही, वाघासारखं पुढे होऊन करायचं, कारण जो प्राणी असतो त्याच्यात दुर्गुण असतात आणि जो माणूस असतो त्याच्यात सद्गुण असतात, सांग... तुला माणूस व्हायचं की प्राणी ?”
“माणूस... मी मोठा झालो की, छान माणूस बनेल !”
“माझा हुशार बाळ !”
तेजस आनंदाने आईच्या गळ्यात पडला, कारण त्याच्यातील दुखावलेल्या माणसाला आनंद झाला होता. त्याने मनोमन ठरवून टाकले, ‘मोठा झाला झालो की ; मी असा माणूस बनेल, ज्याचा आईवडिलांना पण अभिमान वाटेल...!’
*****
© लेखक संजय द. गोराडे (नाशिक)
मोबाईल :- ९८५०६९१२१६.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें