‘गुलमोहराचं कुकू’
नाशिकचे युवा कवी प्रशांत केंदळे यांचा बहुचर्चित
कवितासंग्रह ‘गुलमोहराचं कुकू’ वाचकास निसर्गाची सैर करत छान वाचनानंद देतो असे
म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा कवितासंग्रह निसर्गाविषयी आपुलकी निर्माण करत
माणसाच्या नकळत जाणिवा आणि नेणीवा जागृत करत सामाजिक भान देतो. निसर्गाची वेगवेगळी
रूपके वापरून गुंफलेल्या कवितांमधून कवी सहज माणसातील माणूसपण जागे करतो व निसर्गाविषयी
गोडी निर्माण करत आत्मचिंतन करायला भाग पाडतो.
‘गुलमोहराचं कुकू’ कवितासंग्रह चार विभागात
विभागलेला आहे. पहिला विभाग ‘माझ्या कवितेचा मळा’ शीर्षकाचा आहे. कवीच्या या
कवितेच्या मळ्यात वाचक म्हणून फेरफटका मारताना कितीतरी कविता ओठावर अलगद सूर धरून
गुणगुणाव्याशा वाटतात. निसर्गाचा संसर्ग झालेला कवी स्वतःच निसर्ग झाल्याचे
पानोपानी कबूल करतो. त्याच्या देहातच निसर्ग भिनलेला असल्याने त्याची कविता
निसर्गोद्गार काढत स्वतःचं वेगळेपण सिद्ध करते.
दिले कवितेने सारे
कवितेला काय देऊ
गात काळजाचे गाणे
देह सरणावर ठेवू
कवितेमुळे जगण्याला एक वेगळीच संमृद्धता आली आहे. त्यामुळे
शेवटच्या श्वास असेपर्यंत त्याला कवितेसाठी जगायचं आहे. कारण कवितेने कवी म्हणून
दिलेला सन्मान त्याला जिवापेक्षा अनमोल वाटतो, म्हणून तो स्वतःला कवितेच्या
शब्दपालखीचा भोई समजतो. शेतीमातीच्या प्रतिकांनी नटलेली प्रत्येक कविता कवी
कुणब्याच्या रुपात खूपच छान पद्धतीने परिचय करून देतो.
पाण्यापरी विहिरीच्या खोल पाख्यातून यावी
कवितेने माझ्या शब्दांना गा संजीवनी यावी
त्याच्या प्रत्येक कवितेचा
शब्द विहिरीच्या खोल पाख्यातून पाणी झिरपावे तसे आहे. असे आत्मचिंतनातून योजलेले
शब्द कवितेसाठी संजीवनी ठरतात. असा कुणबी रुपी कवी कवितेच्या मळ्यातून विठू मातीचा
देह, गाव, पाडा, सुडी, तुकोबा, कुणब्या रे गड्या अशा एक से बढकर एक कविता वाचत
वाचत वृक्षाच्या लळा लावत संग्रहाच्या दुसऱ्या भागात कधी आणून सोडतो कळत नाही.
झाडाचं व्रत घेऊन शिकत जावं देणं
साऱ्या देहाला फुटावी हिरवी हिरवी पानं
झाडे
माणसांना सावली, फळे, फुले, लाकूड व पक्ष्यांना निवारा देत असतात, त्याला फक्त
देणं माहीत असतं, त्याचं हे समर्पणाचं व्रत आपण माणूस म्हणून शिकलं पाहिजे हे
कवीने या कवितेतून सुंदर रीतीने मांडले आहे.
रोप रोप लावताना
वाटे लावतो पणती
हीच मातीची दिवाळी
हिरवी मिणमिणती
‘रोप
लावताना’ या कवितेत कवीला लावलेली रोपं पणतीप्रमाणे भासतात. त्या दिवशी मातीला
खऱ्या अर्थाने दिवाळी असल्यासारखे वाटते. जेव्हा याच रोपांची झाडे होतात ; तेव्हा मातीच्या
स्वप्नातील पाऊस होतात तर वर्तमानातील श्वास होतात. अशी ही झाडं येणारा भविष्यकाळ
उज्ज्वल ठेवायचा असेल तर जपायला हवी. बुजुर्ग, वैभव, झाड तुटताना अशा मोजक्या पण
वेगवेगळ्या कवितांमधून कवीने वृक्षांची महती खूप मार्मिकपणे मांडलेली आहे.
कवितासंग्रहाचा तिसरा विभाग ‘काळीजकळा’
आहे. या तिसऱ्या विभागात कवीने काळजातील नात्यांचा भावबंध उलगडून सांगितला आहे.
काळजात काट्याप्रमाणे खुपणाऱ्या व फुलाप्रमाणे सुखवणाऱ्या नातेसंबधावर प्रकाश
टाकला आहे. ‘माय’ या कवितेत कवी केंदळे यांनी मायबाप विषयक केलेलं वर्णन तर
अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारे आहे.
वेडी बाभूळ वाढते साय खाऊन उन्हाची
वाटे मला माझी माय लेक तशीच रानाची
कवीने जाणीवपूर्वक मायेला योजिलेली वेड्या बाभळीची प्रतिमा
खूप अर्थपूर्ण आहे. कारण बाभळीचं झाड कोणी ठरवून लावत नसते. ते स्वतःहून कुठेतरी
बांधाला उगते व बिनापाण्याचे साय खाऊन वाढते. असं हे काटेरी जिणं नशिबी असलेल्या
बाभळीत कवीला स्वतःची माय दिसते तर बाभळीच्या लाकडात घराचा आधार वाटणारा बाप
मेढीसारखा भासतो. असं मुलांसाठी आयुष्याचं सरपण केलेल्या मायबापाला जपायलाही
सांगायला कवी कवितेच्या शेवटी विसरलेला नाही. अशा नात्यांवर आधारलेल्या व
निसर्गाच्या प्रतिकांनी फुलवलेल्या कविता वाचकाच्या काळजात खूप खोल स्पर्श करून
जातात. ‘बाप लेकीची कहाणी’ या कवितेत बापाची लेकीबद्दल असलेला हळवा कोण मांडला
आहे. ‘जन्म बाईचा असा’ या कवितेत बाई कुटुंबासाठी कशी रात्रंदिवस धुपते हे सांगितले
आहे. आजी, सये, नाते, बांध, बाप कर्जात बुडला या कविता वाचक म्हणून वाचताना डोळे
पान्हावतात.
शेवटचा विभाग ‘ऊन झळा पाऊस कळा’ आहे, ऊन झळा सोसून व पाऊस
कळा झेलून वाट्याला आलेल्या परिस्थिती या विभागात मांडली आहे. ‘ऊन वाढत जाताना’ या
कवितेतील ‘ऊन वाढत जाताना आटत जातं तळं, मातीच्या आतडीचा कळू लागतो पीळ’ ओळी जीवनविषयक
सल मांडत नभाला आळवणी करताना कवी दिसतो. ‘गुलमोहराचं कुकू’ या शीर्षक कवितेत कवी
मातीसोबत पावसाला लगीन करायला सांगत भांगेत गुलमोहराचं कुकू भरत म्हणतो.
आता पावसा माताशी कर लगीन साजरं
गुलमोहराचं कुकू तिच्या भांगामधी भर
पावस आणि मातीच्या लगीन सोहळा कवीने कवितेतून खूप छान मांडला आहे. बाभळीची
पिवळी फुले म्हणजे कवीला हळद सोहळा वाटतो, वाळलेली पाने अक्षदा वाटतात. ऊन अंतरपाट
वाटतो, अशी विविध रूपके वापरून कवितेतून उभा केलेला लगीन सोहळा खरोखर कवीच्या
प्रतिभेचा उच्चांक आहे. क्षणभर वाचक खरोखर
या अनोख्या लगीन सोहळ्यात हरवून जातो. मात्र पाऊस आणि मातीचा संसार टिकला तर
आपसूकच माणसाच्या जीवनात संमृद्धता येईल असे कवीला या कवितेतून अप्रत्यक्षपणे
सुचवायचे असल्याचे जाणवते, अशा शेतीमातीशी सांगड घालत परिस्थितीबद्दल अवगत करून
देणाऱ्या कविता वाचकाला नक्कीच अंतमुर्ख करायला लावणाऱ्या आहेत. अरे नभाळ्या, खाली
भेगाळली भुई, जरा उघडीप झाल्यावर या कविता वाचकाला अक्षरश: सुन्न करतात व मनोमन
परिवर्तन घडवून आणतात.
असा निसर्गाच्या प्रतिमा, प्रतीके व रूपके वापरून साकारलेला
‘गुलमोहराचं कुकू’ कवितासंग्रह खूप मोठे संचित मांडताना दिसतो. जे वाचकाचे
आत्मभान जागे करणारे आहे, असा हा कवितेला श्वास मानणारा कवी प्रशांत केंदळे यांचा
निसर्गाच्या शब्दकळांनी फुलवलेला कवितासंग्रह नक्कीच लहानापासून थोरांपर्यंत
पसंतीस उतरणारा व दखलपात्र ठरणारा आहे. चपराक प्रकाशित असलेला ‘गुलमोहराचं कुकू’
कवितासंग्रह कवीच्या कवितेइतकाच अंतर्बाह्य सुंदर झालेला असून वाचक नक्कीच
आवृत्यांवर आवृत्या संपवतील अशी आशा करतो व कवी प्रशांत केंदळे यांना पुढील लेखनास
शुभेच्छा देतो. धन्यवाद.
आस्वादक - संजय द. गोराडे (नाशिक)
मो. नं - ९८५०६९१२१६
सर आपण इतका सुंदर लेख लिहून उपकृत केलंत त्याबाबद्दल धन्यवाद मानावे तितके थोडेच!
जवाब देंहटाएंव्व्वाह! खूप सुंदर लिहिलंय बडेभाई!💐🌹♥️👍🏼👍🏼👌🏻
जवाब देंहटाएं